Homeब्लॅक अँड व्हाईटखाडीच्या काठालगत असलेलं...

खाडीच्या काठालगत असलेलं ‘ते’ मारुतीचं देऊळ!

हनुमान जयंती नुकतीच साजरी झाली. लहानपणी मुंबईत, कन्नमवार नगरमध्ये राहत असताना देवळात जायचे प्रसंग फार येत नसत. आमची शाळा हेच आमचं देऊळ होतं. तसं पाहायला गेलं तर कन्नमवार नगरमध्ये देवळं नव्हतीच. संपूर्ण कन्नमवार नगरमध्ये एकच देऊळ होतं आणि ते होतं मारुतीचं. सम संख्येच्या इमारतींची रांग संपल्यानंतर शेवटची बिल्डिंग होती १९०. या बिल्डिंगमध्ये एका बाजूला चौथ्या मजल्यावर माझा मित्र नितीन घाटे राहायचा. दुसऱ्या बाजूला शाळेतले काही सवंगडी राहायचे. बिल्डिंग नंबर १९०कडून थोडंसं तिरकं चालत गेलं की, हे मारुतीचं देऊळ लागायचं. लांबून देवळाचा घुमट आणि कळस दिसायचा. देऊळ अगदी खाडीच्या काठाला लागून होतं. म्हणजे देवळाच्या मागच्या बाजूला उभं राहिलं तर समोर थेट खाडी दिसायची.

गावाकडे गेलं तर नदीकिनारी देवळं असतात. पण विक्रोळी मात्र वेगळीच होती. इथे देऊळ होतं ते खाडीच्या किनारी. आणि तेही मारुतीचं देऊळ. देवळाच्या समोर प्रशस्त मैदान होतं. या मैदानात मोठी मुलं कबड्डी खेळायची. त्यात बरेचसे राज्य कबड्डी स्पर्धेत भाग घेतलेले तरबेज कबड्डीपटूसुद्धा असायचे. त्यामुळे कबड्डीच्या स्पर्धा किंवा प्रॅक्टिस पाहायला खूप मजा यायची. प्रतिस्पर्ध्याचा गडी बाद करण्यासाठी त्याच्या राज्यात जाऊन, शेवटपर्यंत चिवटपणे दम धरून ठेवणारे आणि विद्युतवेगाने चढाई करणारे कबड्डीपटू पाहिले की डोळ्याचं पारणं फिटायचं.
शक्तीची देवता असलेल्या मारुतीच्या देवळासमोर मैदानी खेळ खेळले जाणे हा एक सुयोगच होता आणि नुसती कबड्डी नाही तर काहीजण कोपऱ्यात व्यायामसुद्धा करायचे. एकूणच मारुतीच्या देवळाच्या बाहेर विक्रोळीकर बलोपासना करायचे.

संपूर्ण कन्नमवार नगर हनुमान जयंतीच्या दिवशी या मारुतीच्या देवळात यायचं. हनुमान भक्तांची भरपूर गर्दी व्हायची. देवळाच्या बाहेर जत्राच भरायची. हार-फुलं, पेढे-बत्तासे, दिवे-अगरबत्तीचे छोटेछोटे स्टॉल्स लागायचे. लाऊड स्पीकरवर मारुती स्तोत्र लागायचं. तेव्हा हनुमान चालीसा लोकांना एवढा माहित झाला नव्हता. टी.व्ही.वर रामायण मालिका लोकप्रिय झाल्यानंतर “हनुमान चालीसा” लोकप्रिय झाला. त्याकाळी दादा कोंडके मात्र प्रचंड लोकप्रिय होते. त्यामुळे त्यांच्या “तुमचं आमचं जमलं” या सिनेमातलं लोकप्रिय गाणं “अंजनीच्या सुता, तुला रामाचं वरदान, एकमुखाने बोला, बोला जय जय हनुमान..”, हे गाणं मात्र सतत ऐकवलं जायचं.

तसं पाहायला गेलं तर मारुतीचं देऊळ म्हटलं तरी या देवळात अन्य देवी-देवतांच्या मूर्ती-तसबीरीसुद्धा होत्या. बऱ्याचशा देवळांमध्ये असंच असतं. मुख्य देवाच्या नावाने देऊळ असतं. पण अन्य देवीदेवतांच्या मूर्ती, तसबिरीही असतात. मालाडमध्ये तर “साईधाम” नावाच्या साईबाबांच्या देवळात शंकराच्या पिंडीबरोबरच गणपती, विठ्ठल रखुमाई, दत्त, लक्ष्मीनारायण, संतोषीमाता, मारुती, शनि, नवग्रह, नागदेवता, अक्कलकोटचे स्वामी समर्थ, गजानन महाराज अशा सगळ्यांच्या मूर्ती आहेत. सोमवार ते शनिवार कोणत्या ना कोणत्या देवाची पूजा करायला भक्त मंडळी येत असतात. उत्तर भारतात प्रत्येक गावात मारुतीचं देऊळ असतंच असतं. महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा गावात एक छोटसं मारुतीचं देऊळ असतं. ग्रामदेवतेबरोबरच एखादं शंकराचं देऊळ आणि एखादं मारुतीचं देऊळ असतं. देवळाच्या पारावर गप्पा मारण्यासाठी मंडळी जमतात. मंगळवार आणि शनिवार या दोन दिवशी मारुतीच्या देवळात बरीच गर्दी जमते. मारुतीला रुईच्या पानांची माळ आणि तेल वाहण्याची पद्धत आहे.

खरंतर शनिवार हा शनिदेवाचा वार. पण शनिदेवाला प्रसन्न करायचं असेल तर मारुतीला प्रसन्न करावं लागतं असं म्हणतात. मारुती ही शक्तीची देवता आहे. स्वराज्य मिळवण्यासाठी शक्तीची उपासना आवश्यक होती. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु रामदास स्वामी यांनी जागोजागी मारुतीच्या देवळांची स्थापना केली. त्यात चाफळचा वीर मारुती, हिंगणवाडीचा मारुती, पारगावचा मारुती, शिराळ्याचा मारुती, बहे बोरगावचा मारुती, माजगावचा मारुती, उंब्रजचा मारुती या देवळांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील तरुणांमध्ये व्यायामाची आवड निर्माण व्हावी म्हणूनसुद्धा समर्थ स्वामी रामदासांनी मारुतीच्या देवळांची स्थापना केली. पुणे जिल्हा हा त्याच्या वेगळेपणासाठी प्रसिद्ध आहे. म्हणूनच पुणे शहरातल्या मारुतीच्या देवळांना असलेली नावं मोठी गमतीशीर आहेत. जिलब्या मारुती, डुल्या मारुती, बटाटा मारुती, भांग्या मारुती, उंट मारुती, पत्रा मारुती या नावाने प्रसिद्ध असलेल्या मारुतीच्या देवळांमागे काही ना काही दंतकथा आहेत.

ब्रह्मदेवाकडून वरदान प्राप्त झालेले वायूपुत्र भगवान श्री हनुमान यांच्याशिवाय रामायण पूर्ण होत नाही. असं म्हणतात की, महापराक्रमी भगवान श्री हनुमान हे एकटेच रावणाचे पारिपत्य करू शकत होते. परंतु सत्य-असत्याची आणि धर्म-अधर्माची लढाई असलेल्या रामायणात भगवान श्री हनुमान ह्यांना सर्वश्रेष्ठ रामदूताची महत्त्वाची भूमिका ही ईश्वरी योजना होती. महाभारतात युद्धाच्या वेळी, भगवान श्री हनुमान अर्जुनाच्या रथावर बसून त्याचे रक्षण करत होते. त्यांनी रथावर बसून प्रचंड गर्जना केली, ज्यामुळे शत्रू घाबरून गेले आणि पांडवांना विजय मिळवता आला. अर्जुनाच्या रथाचे नाव ‘कपीध्वज’ होते. महाभारतात युद्ध संपल्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला रथावरून उतरायला सांगितले. त्यानंतर ते स्वतःसुद्धा उतरले. रथावर असलेल्या भगवान श्री हनुमान यांना भगवान श्रीकृष्णानी इशारा करताच भगवान श्री हनुमान अंतर्धान पावले. त्याबरोबर अर्जुनाचा दिग्विजयी रथ जळून खाक झाला.

भगवान श्री हनुमान अर्जुनासारखंच आपल्या सर्वांचं सदैव रक्षण करो ही प्रार्थना.

मनोजवं मारुततुल्यवेगंl जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं।।

वातात्मजं वानरयूथमुख्यंl श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये।।

Continue reading

सोन्याची झळाळी पाहून भुलू नका! खरेदी करा जपूनच!!

सोन्याला अनेकदा सुरक्षित गुंतवणूक मानले जाते, कारण सर्वसाधारणपणे ते राजकीय आणि आर्थिक अनिश्चिततेच्या काळात सुरक्षा कवच (Hedge) म्हणून काम करते. जागतिक व्यापार युद्धाच्या भीतीमुळे आणि अमेरिकेची अर्थव्यवस्था मंदीकडे ढकलली जाण्याची शक्यता जागतिक भांडवली बाजाराला वाटत असल्यामुळे सध्या सोन्याच्या किंमती...

मृत्यूवरील गडगडाटी हास्य अजरामर करणारा मनोज कुमार!

१९७०च्या मध्यावर मनोज कुमार दिग्दर्शित आणि अभिनित 'रोटी कपडा और मकान' आला. मनोजकुमारव्यतिरिक्त, या चित्रपटात शशी कपूर, अमिताभ बच्चन, झीनत अमान, मौसमी चॅटर्जी आणि प्रेमनाथ होते. मनोज कुमार हिरो असला तरी यातले अमिताभ बच्चन आणि प्रेमनाथ खूप भाव खाऊन...

गुड बाय मिस्टर जिम्मी विक्रोळीकर..

तीन महिन्यांपूर्वी पेपरात बातमी वाचली 'अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिम्मी कार्टर यांचं निधन झालं..' आणि मन भूतकाळात गेलं. १९७७मध्ये आमचं कुटूंब गिरगावातून विक्रोळीत इमारत क्रमांक १७६मध्ये राहायला गेलं. जूनमध्ये आम्ही मुलं विकास हायस्कूलचे विद्यार्थी झालो. मी पाचवीत प्रवेश घेतला.आमचे सख्खे...
Skip to content