पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी सांगितलेल्या ‘एकात्म मानवदर्शन’ या तत्त्वाने विश्वकल्याणाचे उद्दिष्ट साधता येईल. त्यासाठी समाजात अध्यात्माचे धडे देणाऱ्या धर्मगुरूंनी आपल्या संयुक्तिक भाषेत जनतेला जागरूक करावे, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे अखिल भारतीय संघटन महामंत्री व्ही. सतीश यांनी केले.
पं. दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानवदर्शन हीरक महोत्सवांतर्गत सर्वधर्मीय अध्यात्मिक साधकांच्या संवादाचा विशेष कार्यक्रम मुंबईच्या रुईया महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्ही. सतीश यांनी हे आवाहन केले. पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या ‘एकात्म मानवदर्शन’ या तत्त्वज्ञानाच्या ऐतिहासिक व्याख्यानाला साठ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुंबईतील अनेक धार्मिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले.
यावेळी अध्यात्माचा ‘एकात्म मानवदर्शन’ या तत्त्वावर परिणाम या विषयावर भाजपचे अखिल भारतीय सहसंघटन मंत्री शिवकुमारजी यांनी अध्यात्मिक साधकांशी संवाद साधला. यावेळी शिवकुमारजी यांनी स्पष्ट केले की, पंडितजींचे “एकात्म मानवदर्शन” हे संपूर्ण मानवजातीसाठी उपयुक्त तत्त्वज्ञान आहे, ज्यात व्यक्तीचा सर्वांगीण विकास, समाजाच्या समरस रचना आणि पर्यावरणाशीही सुसंवाद (जपणूक) समावेश असून अध्यात्मिक साधकांनी याचा प्रसार आपापल्या धार्मिक संस्थांमध्ये करावा. एकात्म मानवदर्शन हे शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा यांच्या संयोगातून “वसुधैव कुटुंबकम्”, “सर्वे भवंतु सुखिनः” यासारख्या मूल्यांच्या आधाराने विश्वकल्याण साधता येते, हे शिवकुमारजी यांनी यावेळी उपस्थितांना पटवून दिले.
पं. दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानवदर्शन हीरक महोत्सव समितीचे अध्यक्ष आणि कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही यावेळी विविध धार्मिक आणि संप्रदायाच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी लोढा यांनी सांगितले की, एकात्म मानवदर्शन केवळ मनात न राहता, ते खऱ्या अर्थाने जनतेपर्यंत पोहोचले पाहिजे. देशाला पुढे नेण्यासाठी समाजातल्या प्रत्येक घटकांमध्ये हे तत्त्वज्ञान प्रसारित होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमात यशोदाबाई गोविंद गंगाधर फडके चॅरिटेबल ट्रस्ट, जगतगुरु नरेंद्र महाराज यांचे आयुयायी, बौद्ध भंतेजी, प्रजापती ब्रह्मकुमारी समुदाय, अध्यात्मिक गुरू अनिरुद्ध बापू यांचे प्रतिनिधी तसेच श्रीमत् रामचंद्र मिशन, युथ फॉर नेशन फाउंडेशन आणि सद्गुरू वामनराव पै संस्थेचे प्रतिनिधीही यावेळी उपस्थित होते.