Sunday, September 8, 2024
Homeन्यूज अँड व्ह्यूजएकदिवसीय क्रिकेट विश्वचषक...

एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेची ‘ती’ रया गेली!

१९९०च्या दशकात “ब्रिटानिया खाओ वर्ल्ड कप जाओ”सारख्या जाहिराती दोन-तीन महिनेआधीच क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे बिगुल वाजवायच्या. सोबत भारतीय खेळाडूंच्या शीतपेयांच्या जाहिरातींचे शहरांतील मोठाले होर्डिंग्ज, रंगीत टीव्हीच्या जाहिरातीतून होणारा ऑफर्सचा भडिमार देशभरात वर्ल्डकप फिवर पसरविण्यास पुरेसा ठरायचा. १९८३च्या विश्वचषकानंतर आशियाई देशात खऱ्या अर्थाने क्रिकेटचे लोण फोफावले.

पाश्चात्य देशांना क्रिकेटच्या प्रसारापेक्षा वर्ल्डकप नावाच्या कुंभमेळ्यात मोठया लोकसंख्येच्या प्रगतशील देशांची बाजारपेठ, ही व्यापाराची मोठी संधी होती. टेलिव्हिजनवर क्रिकेटच्या लाईव्ह टेलिकास्टच्या दरम्यान केल्या जाणाऱ्या जाहिरातींच्या भडीमाराने थंड पेय, टीव्ही, गाड्या अशी अनेक उत्पादने विक्रीचे उच्चांक गाठू लागली. जाहिरातींच्या वधारलेल्या भावामुळे थेट प्रक्षेपणाच्या व्यवहारातून क्रिकेटमध्ये प्रचंड पैसा येऊ लागला. भारतासारख्या क्रिकेटवेड्या देशात तर क्रिकेट विश्वचषक हा नवा कुंभमेळा बनून गेला.

जाहिरातीतून भारत यावेळी विश्वचषक जिंकणार असे आभासी चित्र उभे करुन कोट्यवधी भारतीयांना स्वप्नांच्या दुनियेत नेऊन दूरचित्रवाहिनीला खिळवून ठेवायचे व त्यायोगे करोडोंची उलाढाल करायची हे तंत्र चांगले विकसित झाले. प्रत्यक्षात १९८३नंतर विश्वचषक जिंकायला भारताला २०११पर्यंत वाट पाहावी लागली असली तरी मधल्या काळात प्रत्येकवेळी भारत जिंकणार असे रेखीव चित्र उभे करुन विश्वचषकाचे निमित्त साधून धंदा चौपट करण्यात भांडवलदार यशस्वी झाले.

हा भाग थोडा बाजूला ठेवला तर त्याकाळी वर्ल्डकपची चातकाप्रमाणे वाट पाहणारे क्रीडाप्रेमीदेखील गल्लोगल्ली सापडायचे. वेळापत्रकाचे कात्रण भिंतीवर लावण्यापासून महत्त्वाच्या मॅच सार्वजनिक ठिकाणी दाखविण्याची व्यवस्था करेपर्यंत सर्व सोपस्कार फार आधीपासून केले जायचे. कुठची मॅच कोणत्या वारी इथपासून सुट्टी, संघाची स्ट्रेटेजी इथपर्यंतचा चर्चा सलूनपासून नाक्यापर्यंत रंगायच्या. महिनाभर आधीपासून वर्तमानपत्रांचे रकाने वर्ल्ड कपसंबंधी विशेष लेखांनी भरायचे. कुतूहल वाढविण्यासाठी या साऱ्या गोष्टींना महत्त्व होते.

यंदाची क्रिकेट विश्वचषक स्पर्धा कालपासून सुरू झाली आहे. आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे जागतिक क्रिकेटवर सर्वार्थाने अंकुश असलेला भारत या कुंभाचे यजमानपद भूषवतोय. तरीदेखील या विश्वचषक स्पर्धेबद्दल खेळाचा मोठा चाहतावर्ग असणाऱ्या देशात पूर्वीसारखे कुतूहल, उत्सुकता, जोश का पाहयला मिळत नाही? अतिक्रिकेट, आयपीएल, की जाहिरात व्यवसायांच्या बदलेल्या संकल्पना? त्याकाळात चार वर्षांनी येणाऱ्या वर्ल्ड कपच्या मध्ये ठराविक देशांचे दौरे आणि तिरंगी स्पर्धा वगळल्यास फार भरगच्च कार्यक्रम नसायचा. दरवर्षी आयपीएलसारख्या दोन महिने सतत सामन्यांचा अतिरेक करणाऱ्या लीगनंतर क्रिकेटची खरी मजा कमी झाली.

क्रिकेट खेळाडूंचे कसब आणि त्यांच्या खेळाच्या अकर्षणापेक्षा मॅचदरम्यान ऑनलाईन जुगाराची चटक अधिक हावी झाली. स्मार्ट फोनमुळे एकत्र क्रिकेटचा आनंद लुटण्याची मजा कालबाह्य झाली. टी ट्वेण्टीच्या झटपट फॉरमॅटच्या तुलनेत दिवसभर शंभर ओवर्स टीव्हीसमोर बसणे दुरापास्त झाले. हेदेखील एकदिवसीय विश्वचषकाची लोकप्रियता कमी होण्याचे एक कारण म्हणावे लागेल.

सर्वच क्षेत्रात कालानुरुप बदल होत असतात व ते स्वीकारावेदेखील लागतात. त्याप्रमाणे क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या नव्या अवतारातील बदलही जग स्वीकारेल. पैशाचा ओघदेखील नवनवीन पर्यायातून वृद्धींगत होईल. मात्र विश्वचषक नावाच्या जत्रेच्या निमित्ताने अनुभवायला मिळणारा निखळ आनंद, चैतन्य आणि उत्साहाची सर आताच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगात राहिली नाही, एवढं मात्र नक्की!

Continue reading

परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्राची बाजी!

गेले दोन वर्षं सातत्याने परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक 1वर असलेल्या महाराष्ट्रात 2024-2025, या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतसुद्धा सर्वाधिक गुंतवणूक आली आहे. एप्रिल ते जून 2024 या पहिल्या तिमाहीत एकूण 70,795 कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. थोडक्यात सांगायचे...

उद्यापासून श्री गणेशोत्सव!

उद्यापासून गणेशोत्सव! गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या वातावरणामुळे भाविकांमध्ये आंनद आणि उत्साह संचारतो. श्री गणेशचतुर्थी हा हिंदूंचा मोठा सण आहे. श्री गणेश चतुर्थीला, तसेच श्री गणेशोत्सवाच्या दिवसांत गणेशतत्त्व नेहमीच्या...

अनुराधा पौडवाल यांची नवी भक्तीमय स्वरभेट अर्पण!

गणेशोत्सवाचे औचित्य साधून आदि शंकराचार्य रचित ‘गणेश पंचरत्न’ या गणपतीच्या श्लोककाव्याची स्वरभेट लोकप्रिय ज्येष्ठ पार्श्वगायिका पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांनी कोट्यवधी भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या मुंबईतील श्री सिध्दीविनायक मंदिरात मंगळवारी सकाळी श्रींच्या चरणी अर्पण केली. श्री सिध्दीविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर,...
error: Content is protected !!
Skip to content