राज्य टीबी मुक्त करण्याचा राज्याच्या आरोग्य मंत्र्यांचा संकल्प मिशन मोडवर पूर्ण करूया, असे आवाहन राज्याचे आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार यांनी केले. आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई येथे आयोजित “टीबीमुक्त पंचायत” अभियान उपक्रमाचा शुभारंभ आयुक्त धीरज कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. रायगड जिल्ह्यातील दहा गावांमध्ये “टीबीमुक्त पंचायत” अभियानाची सुरूवात करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२५ सालापर्यंत “टीबीमुक्त भारत” करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. पंतप्रधानांच्या या महत्त्वाकांक्षी योजने अंतर्गत देशभरातील १००० पंचायतींना टीबीमुक्त करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील “टीबीमुक्त पंचायत” अभियानाची सुरूवात रायगड जिल्ह्यातून करण्यात येत आहे. JSW foundationच्या सहकार्याने रायगड जिल्ह्यातील दहा गावांमधील सुमारे दहा हजार नागरिकांची तपासणी करून टीबी रुग्णाचा शोध, निदान, उपचार व निर्मूलन करण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यातील अभियानाच्या यशानंतर राज्यभर “टीबीमुक्त पंचायत” अभियान राबवण्यात येणार आहे.

या अभियानाला “द युनियन साऊथ इस्ट आशिया (USEA) यांचे तांत्रिक सहकार्य लाभणार असून JSW foundation CSRमधून आर्थिक मदत होणार आहे. या बैठकीत MY LABचे handy x-ray मशीन तसेच, खोकल्याच्या आवाजावरून टीबी निदान करणाऱ्या एपचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
कार्यक्रमास राज्याच्या टीबी विभाग सहसंचालक डॉ. सुनिता गोल्हाईत, सहसंचालक रुग्णालय डॉ. विजय कंदेवाड, सहाय्यक संचालक डॉ. अशोक रणदिवे, Jsw foundationचे आशिष जैन, USEA संस्थेचे प्रबोध भाम्बल, शंकर दापकेकर, इंडिया हेल्थ फंडचे माधव जोशी व गुरविंदर तसेच ठाणे, रायगड, पालघर व रत्नागिरी जिल्हा क्षयरोग अधिकारी तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

