Homeहेल्थ इज वेल्थमानसोपचार यंत्रणेच्या उभारणीसाठी...

मानसोपचार यंत्रणेच्या उभारणीसाठी मुंबईत सर्वेक्षण सुरू

केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयातर्फे देशातील विविध महानगरांमध्ये मानसिक आरोग्य सर्वेक्षण प्रातिनिधिक स्वरुपात हाती घेण्यात आले आहे. मुंबई महानगरातील या सर्वेक्षणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय व बाई य. ल. नायर धर्मादाय रुग्णालयाची निवड करण्यात आली आहे. या सर्वेक्षणामध्ये विशेष सॉफ्टवेअरने आपोआप निवडलेल्या ३ हजार ६०० व्यक्तिंची सुमारे ३० ते ४० मिनिटे मुलाखत घेण्यात येईल.

त्यादृष्टीने मुंबईत वस्ती पातळीवर पोहोचून सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मानसिक आजारांचे प्रमाण ठरवून त्याआधारे मानसोपचार यंत्रणा उभारणी व तिचे बळकटीकरण करण्याची गरज निश्चित करणे, यासाठी हे सर्वेक्षण अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे.

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे देशातील पहिले राष्ट्रीय मानसिक आरोग्य सर्वेक्षण सन २०१५-१६ मध्ये करण्यात आले. यासाठी राष्ट्रीय मानसिक आरोग्य आणि मज्जासंस्था विज्ञान (NIMHANS – National Institute of Mental Health & Neurosciences) या संस्थेची मध्यवर्ती समन्वय केंद्र म्हणून निवड करण्यात आली होती. या सर्वेक्षणात देशातील १२ राज्यांचा समावेश होता. या सर्वेक्षणानुसार, मनोविकारांचे आजीवन प्रमाण हे शहरी भागात १४ टक्के तर ग्रामीण भागात १० टक्के इतके आढळले. ज्यात चिंता (नर्व्हस), नैराश्य (मूड डिसऑर्डर), अति मद्यसेवन यांचा समावेश होता. यातील बहुतेक आजारांसाठी उपचारांची गरज व प्रत्यक्ष उपलब्धता यातील तफावत ६० टक्क्यांहून अधिक आढळली होती. औषधे, मानसोपचारतज्ञ, मानसशात्रज्ञ व मानसोपचार परिचारिका यांची मोठी कमतरता सर्वच राज्यांमध्ये आढळून आली.

पहिल्या सर्वेक्षणामध्ये आढळलेली ही निरीक्षणे लक्षात घेऊन केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयाने देशातील महानगरांमधील परिस्थिती जाणून घेण्याचा उद्देशाने दुसरे सर्वेक्षण हाती घेतले आहे. यामध्ये मुंबई, दिल्ली, हैद्राबाद, बेंगळुरु, चेन्नई व कोलकाता या महानगरांमध्ये हे सर्वेक्षण राबवण्याचे निश्चित केले आहे. मुंबई महानगरातील सर्वेक्षणासाठी महापालिकेच्या टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय व बाई य. ल. नायर धर्मादाय रुग्णालयाची निवड करण्यात आली आहे. नायर रुग्णालयाचा मनोविकृतीशास्त्र विभाग व जनऔषध वैद्यकशास्त्र विभाग यांनी संयुक्तपणे हे सर्वेक्षण नुकतेच सुरू केले आहे.

यामध्ये वस्ती पातळीवर सर्वेक्षण करण्यासाठी १ मुख्य समन्वयक आणि ७ क्षेत्रीय कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. हे कर्मचारी घरोघरी जाऊन विशेष सॉफ्टवेअरच्या मदतीने निवडलेल्या निवडक कुटुंबातील व्यक्तींच्या मुलाखती घेतील. मुलाखतीसाठी संमती दिल्यानंतर त्या व्यक्तींच्या मुलाखती घेण्यात येतील. सर्वेक्षणासाठी मंत्रालयाने ठरवून दिल्यानुसार सुमारे ३ हजार ६०० व्यक्तिंची मुलाखत यामध्ये घेतली जाईल. एका व्यक्तीच्या मुलाखतीस सुमारे ३० ते ४० मिनिटांचा अवधी लागेल. समाजातील सर्व स्तरांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात येणार असून कोविडमुळे झालेल्या मानसिक परिणामांसंबंधी प्रश्नही यात समाविष्ट केले आहेत. ऑगस्ट/सप्टेंबर २०२३पर्यंत म्हणजे येत्या ८ ते ९ महिन्यांच्या कालावधीत हे सर्वेक्षण पूर्ण करण्यात येईल.

नायर रुग्णालयातील मानसोपचारतज्ज्ञ, रोगप्रतिबंधक आणि सामाजिक वैद्यकशास्त्र तज्ज्ञ व महापालिकेचा सार्वजनिक आरोग्य विभाग एकत्रितरित्या महाराष्ट्र व मुंबईतील मानसिक आरोग्यसेवेच्या स्थितीचा आढावा घेतील व आरोग्यसेवेतील त्रुटींचे प्रमाण निश्चित करतील. या सर्वेक्षणामुळे महानगरांतील मानसिक आजारांचे प्रमाण ठरवून मानसोपचार यंत्रणा उभारणी व तिचे बळकटीकरण करण्याची गरज निश्चित करता येणार आहे. हे सर्वेक्षण करण्याच्या दृष्टीने मुलाखतीसाठी आपल्या घरी कर्मचारी आल्यास त्यांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन यानिमित्ताने करण्यात येत आहे.

Continue reading

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...

केशव उपाध्ये भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तर डावखरे, राणे सरचिटणीस!

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कोडगे, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्ये, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, चैतन्यबापू देशमुख, प्रिया शिंदे, सुजय विखे पाटील आणि अर्चना पाटील चाकुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचवेळी प्रदेश सरचिटणीस म्हणून आमदार निरंजन डावखरे, योगेश सागर, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश...
Skip to content