महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्हा रूग्णालयात, उप जिल्हा रूग्णालयात, प्राथमिक आरोग्य केंद्रात तसेच दवाखान्यात उष्माघात (सन स्ट्रोक) क्लिनिक सुरू करण्यासाठी राज्य सरकारने तातडीने पुढाकार घ्यावा, अशी सूचना राज्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केली आहे.
यापूर्वीही अशा प्रकारचे क्लिनिक सुरू करण्यात आली होती. सध्याचे वाढते तापमान पाहता संपूर्ण राज्यभर असलेल्या सरकारी दवाखान्यात तसेच रूग्णालयात उष्माघाताने त्रस्ता झालेल्या रूग्णांवर तातडीने उपाय करण्याची सोय उपलब्ध करावी. त्याचवेळी प्रत्येक ठिकाणी उष्माघातापासून बचाव करण्यासाठी लोकांनी कोणती काळजी घ्यावी हे स्पष्ट करणारे फलक प्रदर्शित केले जावेत. वेगवेगळ्या माध्यमांतूनही ही माहिती दिली जावी. त्यामुळे जनतेला स्वतःचा बचाव करणे सोपे जाईल, असेही ते म्हणाले.

लोकांनी शक्यतो दुपारी १२ ते ४ या वेळेत बाहेर पडणे टाळावे, डोक्यावर टोपी वा रूमाल बांधावा, थोड्या थोड्या वेळाने पाणी, सरबत पिणे आवश्यक आहे. अशा सूचना राज्यशासनाच्या प्रसिद्धी खात्याकडून लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण येथे विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. या क्लिनिकमधल्या स्टाफला विशेष ट्रेनिंग द्यावे, अशी सूचनाही डॉ. दीपक सावंत यांनी केली.
उष्माघात आणि त्यापासून होणारे मृत्यू रोखण्यासाठी लोकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. मुंबईत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना व हेल्थ पोस्टवर अशा रूग्णांवर प्राथमिक उपचार करून क्रिटीकल पेशन्टना महानगरपालिका रूग्णालयांत पाठवल्यास रूग्णालयांवरही अतिरिक्त ताण येणार नाही, असेही ते म्हणाले.

