Tuesday, September 17, 2024
Homeटॉप स्टोरीपंतप्रधान मोदींची अशी...

पंतप्रधान मोदींची अशी माफी मान्य नाही!

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने देशभरातील शिवप्रेमींच्या भावना संतप्त असल्याने पंतप्रधान नरेंद्न मोदींनी माफी मागितली. पण ही माफी मागतानाही त्यांच्या चेहऱ्यावर मग्रुरी होती. आम्हाला अशी माफी मान्य नाही, असे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

मालवणमध्ये शिवरायांचा पुतळा कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीने मुंबईत हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत मोर्चा काढत सरकारला जोडे मारो आंदोलन केले. त्यावेळी ते बोलत होते. पंतप्रधानांनी पुतळा पडला म्हणून माफी मागितली, की भ्रष्टाचार झाला म्हणून, की भ्रष्टाचाराला पांघरूण घालण्यासाठी माफी मागितली? महाराजांचा अपमान करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही. देशाचे प्रवेशद्वार गेट वे ऑफ इंडियाच्या साक्षीने या शिवद्रोह्यांना गेट आऊट ऑफ इंडिया केल्याशिवाय गप्प बसू नका, असे आवाहनही ठाकरे यांनी केले.

यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, मालवणच्या राजकोट किल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वाऱ्यामुळे पडला असे विधान मुख्यमंत्र्यांनी केले. गेट वे ऑफ इंडियासमोरचा पुतळा अनेक वर्षांपासून आहे. राज्यातही अनेक भागात असे पुतळे आजही भक्कमपणे उभे आहेत. ते कोसळले नाहीत. भ्रष्टाचारामुळे राजकोटच्या किल्यावरील पुतळा कोसळण्याची घटना घडली.

भाजपा सरकारने कमिशनखोरी व भ्रष्टाचार करून छत्रपती शिवरायांचा अपमान करण्याचे पाप केले आहे. मालवणमध्ये शिवरायांचा फक्त पुतळाच पडलेला नाही तर महाराष्ट्र धर्म पायदळी तुडवला व महाराष्ट्राचा अवमानही केला गेला. विधानसभा निवडणुकांचा काळ असल्याने पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली. पण हे पाप अक्षम्य आहे. या चुकीला माफी नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

या मोर्चात शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, छत्रपती शाहू महाराज, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड, चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, संजय राऊत, सुप्रिया सुळे, अनिल देशमुख, आदित्य ठाकरे, अतुल लोंढे आदी सहभागी झाले होते. हुतात्म्यांना अभिवादन करून हा मार्चा गेट वे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत पोहोचला.

1 COMMENT

  1. खरेच ओढून ताणून मागितल्यासारखी माफी वाटते. नाहीतर पहिल्याच दिवशी मागितली असती. निवडणूक असल्यामुळे माफी मागण्या शिवाय पर्यायच नाही.

Comments are closed.

Continue reading

बुधवारी खुली राहणार भायखळ्यातली ‘राणीची बाग’!

मुंबईतल्या भायखळा (पूर्व) येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय (म्हणजेच पूर्वीची राणीची बाग) येत्या बुधवारी, १८ सप्टेंबरला जनतेकरिता खुले राहणार आहे. त्याऐवजी हे उद्यान दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवार, १९ सप्टेंबर रोजी बंद ठेवण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाकडून प्रसिद्ध...

यापुढे ‘बाबू’ ठरवणार, सणवार कधी साजरे करायचे ते?

यापुढे मुहूर्त, रितीरिवाज, चालीरीती, परंपरा अशा सर्व बाबींना तिलांजली दिली जाणार आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या मनात येईल त्याप्रमाणे या महाराष्ट्रातील जनता सण, उत्सव साजरे करेल असे एकूण चित्र दिसते. आज होणारी ईद असो किंवा गणेशोत्सव, सरकारी बाबू म्हणतील त्याप्रमाणे हे...

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची कोलांटउडी! 

दारू घोटाळ्यात अडकलेल्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या अटींवर कोणतेही भाष्य न करता जनतेचा कौल मागण्यासाठी आपण मुख्यमंत्रीपद सोडत असल्याचा आव आणत त्यांनी जनतेच्या भावनेला हात घालण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जाते. नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी...
error: Content is protected !!
Skip to content