Homeपब्लिक फिगरमहिलांवर हात टाकणाऱ्या...

महिलांवर हात टाकणाऱ्या शिवसैनिकांना देणार ‘शिवथाळी’!

शिवसेनाभवनावर जाऊन निषेध करणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या महिला कार्यकर्त्यांवर हल्ला करणाऱ्या शिवसैनिकांचे हात-पाय आम्ही विसरणार नाही. त्यांच्या प्रसादाची परतफेड कशी करायची हे आम्ही शिवसेनेतच शिकलो आहोत. योग्य वेळी त्यांना शिवथाळी दिली जाईल, असा इशारा भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिला.

महिलांवर लपूनछपून हल्ला करणाऱ्या शिवसेनेचा निषेध करतच त्यांनी या पत्रकार परिषदेला सुरूवात केली. शिवसैनिकांच्या या हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, सेनाभवन मराठी माणसाचे आहे, पवित्र आहे. तेथे हल्ला करायला आलेल्या कार्यकर्त्यांना आम्ही शिवप्रसाद दिला आहे. पुढे शिवथाळी देऊ.. या राऊतांना सेनाभवनाची इतिहास तरी माहित आहे का? जेव्हा शिवसेनाभवन उभे राहिले तेव्हा हेच राऊत लोकप्रभेत काम करत शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर एकदम खालच्या पातळीची टीका करत होते. माझ्याकडे सर्व अंक आहेत. छापू का ते काय म्हणत होते ते.. ‘प्रहार’मध्ये.. माझ्यासारख्या शिवसैनिकांनी पैसे गोळा करून, वर्गणी काढून हे सेनाभवन बांधले. तुमचे योगदान काय? तुम्ही नोकरी करत होता. नंतर कधी शिवसैनिक झालात, कधी नेते.. आम्हाला माहित नाही काय, असा सवाल राणे यांनी केला.

शिवथाळीही सरकारचीच

शिवथाळीही तुमची नाही. ती सरकारची आहे. राहिला प्रश्न प्रसादाचा. हिंदू धर्मात आम्ही देवदेवतांना पवित्र मानतो. त्यांच्या समोर नैवेद्य ठेवतो आणि मग त्यातला काही भाग प्रसाद म्हणून वाटतो. तुम्ही प्रसाद शब्द वापरून हिंदुत्वाची, देवदेवतांची चेष्टा केली आहे, हे लक्षात ठेवा. तुमचे नेते, आताचे मुख्यमंत्री हिंदुत्वाला तिलांजली देऊनच मुख्यमंत्री झाले. त्यामुळे तुम्हाला हिंदुत्वाचे महत्त्व सांगण्याचा अधिकारच नाही. संजय राऊत यांनी दाखवलेला हा पुळका फक्त स्वार्थासाठी आहे. दादागिरीची भाषा तुम्ही करू नका. आम्ही फक्त शिवथाळीच नाही तर नॉनव्हेज बिर्यानीही खायला घालू, हे लक्षात ठेवा. स्वतःला सांभाळा. आपल्या वाट्याला कधी बिर्यानी येईल ते सांगता येत नाही, असेही ते म्हणाले.

ही शिवसेना शिवसैनिकांची नाही. ज्यांनी शिवसेनेसाठी आयुष्य वेचले. हालअपेष्टा काढल्या..  त्यांना आजपर्यंत काही मिळाले नाही. ही उद्धव, आदित्य यांची सेना आहे. जिवाची पर्वा न करता ज्यांनी काम केले ते सत्तेत कुठेच नाहीत. आज फक्त लाभ उठवणाऱ्यांची सेना आहे. महिलांना असभ्य न बोलणाऱ्या, त्यांच्यावर हात न टाकणाऱ्या कडवट शिवसैनिकांना वर्धापनदिनाच्या शुभेच्छा, अशा शब्दांत राणे यांनी खऱ्याखुऱ्या शिवसैनिकांना वर्धापनदिनाच्या शुभेच्छाही दिल्या.

ही बिनशिंगाची शिवसेना

कुडाळमध्ये पेट्रोलपंपावर आंदोलन करणारे वैभव नाईक याच थाळीतली एक भाजी आहेत. आपल्यालाही कधी शिवथाळी मिळेल हे ओळखून ते पळाले. तुमच्यासाठी शिवसेनाभवन मंदिर असेल तर अयोध्येतील श्री राम मंदिर आमचे श्रद्धास्थान आहे. आमची अस्मिता आहे. सोनियासेना या नात्याने त्यावर टीका करता, हे आम्ही सहन करणार नाही. आले अंगावर म्हणणाऱ्या शिवसेनेला शिंगे आहेत कुठे, असा सवाल करत नारायण राणे म्हणाले की, ही बिनशिंगांची शिवसेना आहे. फटके देणारी शिवसेना केव्हाच संपली. आता फक्त पैसे जमव शिवसेना राहिली आहे. महिलांवर हल्ला करणाऱ्या शिवसैनिकांना भाजपा स्टाईलने उत्तर दिले जाईल. आणि जेव्हा राणे त्यात उतरतात तेव्हा पळणाऱ्यांना पळण्यासाठी जागाही शिल्लक ठेवत नाही, हे सर्वांना माहित आहे.

महिलांवर हल्ला करणाऱ्या शिवसैनिकांची पाठ थोपटणाऱ्या मुख्यमंत्र्यांना याची कशी परतफेड होईल हे कळणारही नाही. देवदेवतांनाच वाटते आता यांना जास्त वेळ बसवणे योग्य नव्हे. त्यामुळे तेच त्यांना बाजूला सारतील, असेही ते म्हणाले.

सिंधुदूर्गात फक्त दोन डॉक्टर..

सिंधुदूर्गात फक्त दोन डॉक्टर आहेत. एक त्वचेचा आणि दुसरा दातांचा. हे दोन डॉक्टर कोरोनावर उपचार करणार. आज एक हजार लोक फक्त सिंधुदूर्गात मेले आहेत. रत्नागिरी आणि सिंधुदूर्गात मिळून पावणेतीन हजार जण कोरोनामुळे दगावले. नर्स नाहीत, वॉर्डबॉय नाहीत, औषधे नाहीत, ही अवस्था आहे. आरोग्यमंत्री भेट देत आहेत तेव्हा त्यांना कळेल, ते पाहतील, असेही राणे यांनी सांगितले.

Continue reading

प्री आणि पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी 31 जानेवारीपर्यंत करा अर्ज

मुंबई शहर जिल्ह्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी प्री-मॅट्रिक (इ. 9वी व 10वी) व पोस्ट-मॅट्रिक (इ. 11वी ते पदव्युत्तर / व्यावसायिक अभ्यासक्रम) शिष्यवृत्तीच्या लाभासाठी एनएसपी (नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर) येत्या 31 जानेवारीपर्यंत सादर करावेत, असे इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, मुंबई शहरचे सहाय्यक संचालक रविकिरण पाटील यांनी कळविले आहे. केंद्र...

मकर संक्रांत म्हणजे काय?

मकर संक्रात या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. भारतीय संस्कृतीत हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक जीव ‘तीळगूळ घ्या, गोड बोला’ असे म्हणून जवळ येतो. हा सण तिथीवाचक नाही. मकर संक्रांतीचा...

कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञानाची माहिती

देशातील अव्वल बायोडायव्हर्सिटी आणि विविध पिकांची उत्पादनक्षमता असलेल्या नंदुरबार जिल्हा व परिसरातील कष्टाळू व प्रयोगशील शेतकऱ्यांना शहादा येथे नुकत्याच झालेल्या ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनासारख्या आयोजनातून नवतंत्रज्ञानाचे उपयुक्त मार्गदर्शन मिळते. त्याचा उपयोग करून नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक गट क्रांती...
Skip to content