Homeमाय व्हॉईसराज ठाकरे ठरले...

राज ठाकरे ठरले ‘दुर्दैवी’!

देशभरात पहलगाममधील पर्यटकांवरील हल्ल्यानंतर  शोक-संतापाची जी त्सुनामी उठली, त्यात अनेक विषय बाजूला पडले आणि ते अगदीच सहाजिक होते. काश्मीरमध्ये भयंकर रक्तपात घडला तोवर महाराष्ट्रात एक वेगळाच विषय गाजत होता. तो होता ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या शक्यतेचा. गेली वीस वर्षे एकमेकांना पाण्यात पाहणारे, सध्याच्या राजकारणात थोडे बाजूला पडलेले, दोन राज्यस्तरावरचे पक्ष एकत्र आले, तर काय होईल? याच्या चर्चा मराठी मनांमध्ये, मराठी माणसांमध्ये, रंगत होत्या. पण काश्मीरमध्ये पर्यटकांचे रक्त सांडल्यानंतर तो विषय माध्यमांमधून हरवूनच गेला आहे. टाळीसाठी राज यांनी हात पुढे केला. त्याला उद्धव यांनी आधी अटी-शर्तींसह व नंतर निखळ, सकारात्मक प्रतिसादही दिला. इतके कळेपर्यंत तो विषय माध्यमांतून गायब झाला. या अर्थाने राज ठाकरे पुन्हा थोडे ‘दुर्दैवी’च ठरले आहेत.

मुळात राज हे कलावंत आणि प्रभावी वक्ते. आजही ते बोलणार म्हटल्यानंतर लाखो लोक ऐकायला उत्सुक असतात. त्यांच्या सभांना प्रचंड गर्दी तर जमतेच, पण त्यांचा प्रेक्षकवर्ग मोठा असल्याने साऱ्या वृत्तवाहिन्या राज यांचे कार्यक्रम हमखास लाईव्ह दाखवतातच. पण तरीही त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार काही निवडून येत नाहीत. मते वाढत तर नाहीतच उलट प्रत्येक निवडणुकीत ती कमीकमी होताना दिसतात. मातोश्रीच्या ठाकरेंची स्थिती सध्या काहीशी तशीच आहे. 2022च्या फुटीनंतर पक्षाला उतरती कळा लागली आहे. मूळचे ऐतिहासिक नाव व पक्षचिन्ह उरले नाही. रोज काही जुने सहकारी पक्ष सोडून जाताना दिसत आहेत. मते व निवडून आलेल्या आमदारांची संख्या घटलेली आहे. विरोधी महाविकास आघाडीत भवितव्य आहे का? की पुन्हा एकदा सत्तेत जाणे शहाणपणाचे ठरेल? असा काहीसा विचार त्यांच्या निकटवर्तीयांत कायम सुरु असतो.

या दोघा ठाकरे बंधुंचा “टाळी द्या व टाळी घ्या”, हा सिलसिला आता सुरु झालेला नाही. 2009पासून वेळोवेळी दोन्ही शिवसेना एकत्र येतील का याची चर्चा सुरु होती. 2014ला तर जेव्हा भाजपाने उद्धव यांच्याशी युती तोडली तेव्हा तर बाळा नांदगावकरांच्या नेतृत्त्वात मनसे नेत्यांचे एक शिष्टमंडळ राज यांनी मातोश्रीवर धाडले होते. पण त्याहीवेळी टाळी काही वाजलीच नाही. मध्येमध्ये दोघांच्याही हितचिंतकांमध्ये, माध्यमांमध्ये यावर चर्वितचर्वण सुरु राहिले. हा विषय आता पुन्हा निघाला कारण, राज ठाकरेंनी एका मुलाखतीमध्ये, “महाराष्ट्राच्या हितासाठी ठाकरे बंधुंनी एकत्र यावे”, हा विचार मांडला हे महत्त्वाचे. महेश मांजरेकर या विख्यात नट व दिग्दर्शकांचे व राज यांचे चांगले संबंध आहेत. मांजरेकरांनी, वास्तवमे ट्रूथ, नावाचा कार्यक्रम डिजिटल फलाटावर सादर केला. त्यात राज यांनी हे सांगितले. ही मुलाखत रेकॉर्ड झाल्यानंतर आठ-पंधरा दिवसानंतर प्रसारित झाली. नेमके त्यावेळी राज ठाकरे परदेशात सुट्टीसाठी गेले होते. त्यांच्या टाळीला प्रतिसाद देऊन उद्धवही सहकुटूंब परदेशात सहलीला गेले. आता पुढच्या सप्ताहात दोघेही परतल्यावर पुढे काय होते हे पाहणे रंजक ठरेल. तसे दोघा ठाकरेंचे व्यक्तीगत संबध 2005च्या मानाने पुष्कळच सुधारलेले आहेत. अनेक कौटुंबिक कार्यक्रमात ते एकत्र दिसले. पण राजकीय व्यासपीठावर ते एकत्र आले नाहीत. दोघे एकत्र लढले तर काय बहार उडेल, असा विचार त्यांच्या समर्थकांमध्ये तरळत राहिला, इतकेच.

ठाकरे

राज ज्या शिवसेनेमधून फुटून बाहेर पडले ती शिवसेना आता तशी उरलेली नाही. पुलाखालून भरपूर पाणी वाहूनही गेले आहे. राजकारणही पुष्कळ बदलले आहे. जेव्हा बाळासाहेब ठाकरे हयात होते, तेव्हा उद्धव यांच्या वाढत्या महत्त्वाविरुद्ध भांडून राज ठाकरेंनी मातोश्री सोडली होती. 2005च्या अखेरीकडे शिवसेनेत तडे पडत आहेत हे दिसू लागले होते. त्याआधी 2003च्या अखेरीकडे महाबळेश्वर येथे शिवसेनेचे जे प्रमुख पदाधिकाऱ्यांचे शिबीर झाले होते त्यात उद्धव ठाकरेंची निवड कार्याध्यक्षपदावर झाली आणि तो ठराव राज ठाकरेंनीच मांडला होता. उद्धव मुंबई मनपात सेनेचे नेतृत्त्व करतील. तिथली पक्षाची धोरणे उद्धव ठरवतील तर नाशिक, पुणे अशा शिवसेनेच्या अन्य भागातील महानगरपालिकांचे नेतृत्त्व राज यांच्याकडे राहील अशी व्यवस्था बाळासाहेब ठाकरेंनी लावून दिलेली होती. दोघा चुलत भावांमध्ये होणारे वाद व सत्तासंघर्ष टळावा यासाठी हा प्रयत्न होता. पण वाद वाढलेच.

“उद्धव व त्यांचे काही सहकारी, बडवे बनून बाळासाहेबरूपी विठ्ठलाचा व सामान्य शिवसैनिकाचा संपर्क होऊ देत नाहीत”, असा आरोप करीत डिसेंबर 2005च्या मध्यावर राज यांनी, शिवेसना सोडून देतो, अशी भूमिका जाहीर केली. त्यावेळी त्यांच्यासमवेत शिवसैनिकांचा व राज्याताली दुसऱ्या-तिसऱ्या फळीतील सेना नेत्यांचा मोठा जत्थाही बाहेर पडला. शिवेसनेत उभी मोठी फूट त्यावेळी पडली. त्याआधी काही काळ नारायण राणे शिवेसनेतून बाहेर पडले होते. उद्धव व त्यांचे निकटचे सहकारी मिलिंद नार्वेकर या दोघांवर टीका करतच राणेही बाहेर पडले होते. डिसेंबर 2005मध्ये राज यांनी सेना सोडली व 2006च्या मार्चमध्ये त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नावाने स्वतंत्र पक्ष स्थापन केला. पण त्यांना मतदारांची साथ म्हणावी तशी अजिबातच लाभली नाही.

बाळासाहेब ठाकरेंनी 1966मध्ये स्थापन केलेल्या शिवेसनेत भुजबळ, राणे व राज यांच्यानंतरची चौथी मोठी उभी फूट 2022च्या जूनमध्ये पडली. पक्षाचे मूळ नाव व गाजलेले धनुष्यबाण हे निवडणूकचिन्ह दोन्ही ठाकरे घराण्याच्या हातातून निसटले. उद्धव ठाकरे आता शिवसेना उबाठा या पक्षाचे प्रमुख असून त्यांचे निवडणूक चिन्ह मशाल आहे. या पक्षाची स्थिती सध्या निवडणुकांत घसरते आहे. 2024मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुका आणि सहाच महिन्यांनी पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुका यात सेना उबाठाचा मतदार मोठ्या प्रमाणात पक्षापासून बाजूला गेलेला दिसला. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमधून लढलेल्या उद्धव ठाकरेंना जवळपास साडेपंचाण्ण्व लाख मतदारांचे समर्थन लाभले होते. हे प्रमाण अखंड शिवेसनेच्या आधीच्या मतांच्या टक्क्याजवळ जाणारे होते. एकूण मतदानाच्या 16.52 टक्के इतकी मते तेव्हा सेना उबाठाने घेतली. त्यांचे नऊ खासदार आज लोकसभेत आहेत. पण पाठोपाठ ऑक्टोबर 2024मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत ठाकरेंची मते 64 लाखांपर्यंत खाली आली. मतांचा टक्का 9.96  इतका खाली आला. त्यांची आमदारांची संख्या मविआमध्ये सर्वाधिक जरी राहिली असली, तरी ही संख्या पूर्वीच्या पन्नास व सत्तर आमदारांच्या तुलनेत आता फक्त 20 इतकी खाली आली आहे. उलट ठाकरेंपासून फुटून निराळे झालेल्या व आपणच खरी शिवसेना आहोत हा दावा न्यायालयीन प्रक्रियांत तसेच जनतेच्या दरबारातही खरा ठरवणाऱ्या एकनाथ शिंदेंच्या शिवेसनेने आमदारांची संख्या 54 इतकी राखली आणि खासदारही सात निवडून आणले. ते सत्तेत आहेत तर ठाकरे आता दिल्लीत आणि मुंबईतही विरोधी बाकांवर आहेत.

ठाकरे

मतांच्या अशा गणितात राज ठाकरे हे एक यशस्वी नेते म्हणता येतील का याची शंका आहे. त्यांच्या मनसे पक्षाने अनेकदा धोरणे बदलली. कधी मोदींची भलावण केली, तर कधी मोदींना दूषणे दिली. पण दोन्ही स्थितीत त्यांना लोकसभा व विधानसभांमध्ये अपयशच आले. 2009चा अपवाद वगळता एकदाही त्यांना ना चांगली मते पडली, ना चांगल्या संख्येने आमदार निवडून आणता आले. महानगरपालिकांच्या मागील निवडणुकातही त्यांची कामगिरी काही शहरांत बरी आणि बहुसंख्य शहरांत सुमार राहिली. आज त्यांच्या पक्षाकडे एकही आमदारकीची वा खासदारकीची जागा नाही. त्यांना पडणाऱ्या मतांमध्येही सातत्याने घसरणच होते आहे. राज ठाकरेंनी स्थापनेनंतर प्रथम 2007मध्ये मुंबई मनपाची निवडणूक लढवली तेव्हा त्यांच्याकडे सात नगरसेवक होते. ही संख्या पुढच्या 2012 व 2017च्या निवडणुकीत फारशी बदलली नाही. उलट निवडून आलेले नगरसेवक पक्ष सोडून सत्तेच्या वळचणीला मातोश्रीकडे गेलेले दिसले.

मनसेने 2009च्या विधानसभा निवडणुकीत 25 लाख म्हणजे 5.71 टक्के मते घेतली. त्या एकाचवेळी त्यांचे तेरा आमदार निवडून आले. तो उच्चांक राहिला. पुढच्या दोन्ही विधानसभा निवडणुकांत ही संख्या फक्त एक राहिली आणि 2024ला शून्य झाली.  प्रत्येक निवडणुकीत राज यांची मतेही घसरती रहिली. 2014ला 3.16 टक्के (16.65 लाख), 2019ला पुन्हा घसरून 2.25 टक्के (16.42 लाख), तर ताज्या 2024च्या निवडणुकीत 1.55 टक्के (10.02 लाख) इतकी मनसेची मते कमी झालेली आहेत. अशा स्थितीत दोन्ही पराभूत व घसरत्या मतसंख्येच्या पक्षांची बेरीज झाली तरी ती भाजपा आघाडीचा पराभव करण्याइतकी मोठी होऊ शकेल का?  टाळीसाठी हात पुढे आले आहेत. कदाचित जागावाटपांच्या अटी-शर्तींंचे पूल पार करून आणि फुगलेल्या अहंकाराच्या भिंती ओलांडून, निवडणूक आघाडीच्या दिशेने जाताना टाळी वाजेलही. पण त्या टाळीचा आवाज किती मोठा राहील, हा प्रश्न उरणारच!  

Continue reading

शासनाच्या वैधानिक समित्यांना धुळे प्रकरणाचे ग्रहण!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परवा काही निवडक आमदारांना, राजकीय नेत्याने यशस्वी कसे व्हावे याचे एक गुपित सांगितले. विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात वैधानिक समित्यांच्या एकत्रित उद्घाटन समारंभासाठी हे आमदार जमले होते. ते सारे विविध समित्यांचे सदस्य तसेच समितीप्रमुखही होते. फडणवीसांनी त्यांना...

शरद पवारांच्याच काळात सहकारी साखर कारखान्यांना घरघर!

देशातील साखर उद्योगात महाराष्ट्र आघाडीवर आहे. साखरेचे उत्पादन तसेच ऊसाखालचे क्षेत्र यात उत्तर प्रदेश प्रथम क्रमांकावर आहे. देशातील एकूण ऊसाखालच्या क्षेत्राच्या चाळीस टक्के क्षेत्र उत्तर प्रदेशातील आहे. महाराष्ट्राचा क्रमांक त्यानंतर लागतो. देशातील एकूण ऊस क्षेत्रापैकी 28 टक्के क्षेत्र आपल्याकडे...

पंचायत, पालिकेतल्या ओबीसी प्रतिनिधींची संख्या घटणार?

भारत पाकिस्तान समरप्रसंग सुरु होण्याच्या अवघा एक दिवस आधी सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आणि त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण बदलून गेले. पण दुसऱ्याच दिवशी भारताने ऑपरेशन सिंदूरची सुरुवात केली. आधी आपण पाकव्याप्त काश्मीरमधील आणि प्रत्यक्ष पाकिस्तानातील दहशतवादी केंद्रे,...
Skip to content