मुळात ईव्हीएम मशीन कुठल्याही मोबाईलला जोडला जात नाही. कोणताच ईव्हीएम मोबाइलनं ऑपरेट होत नाही. राहुल गांधी परदेशात टेक्नॉलॉजीवर भाषणं देतात. त्यांना याची माहिती नाही का?, असा सवाल शिवसेनेचे उपनेते संजय निरूपम यांनी आज एका पत्रकार परिषदेत केला.
उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे रविंद्र वायकर अवघ्या ४८ मतांनी निवडून आल्यानंतर वायकर यांच्या मेव्हण्याने निवडणूक कर्मचाऱ्यांच्या मोबाईल फोनचा वापर करून ईव्हीएम मशीन हॅक केल्याचा दावा शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून केला जात आहे. राहुल गांधी, अदित्य ठाकरे अखिलेश यादव यांनी तसे ट्विटही केले आहे. त्यानंतर निरूपम यांनी हे आरोप फेटाळून लावले.

ईव्हीएम मोबाईलने अनलॉक केला गेला असे सांगितले जात आहे. निकालाच्या दिवशीदेखील असेच खोटे आरोप करण्यात आले. दोन हजार मतांनी अमोल कीर्तिकर जिंकले असे सांगण्यात आले. मात्र प्रत्यक्षात तसे काहीच नव्हते. यानंतर ईव्हीएम मशीनवर कीर्तिकर याना एक मत जास्त मिळाले म्हणून ते विजयी म्हणून घोषणा करण्यात आली. हे सारे माध्यमांवर चालू होते. त्यावेळी पोस्टल मते मोजण्यात आलेली नव्हती. पोस्टल मते मोजल्यावर वायकर विजयी झाल्याचे स्पष्ट झाले, असे त्यांनी सांगितले.
कोणीतरी तिथे मोबाईल घेऊन गेले होते असे सांगण्यात आले आहे. आता हा मोबाईल कुणाचा होता? वायकर यांच्या मेहुण्याचा आहे का? याची चौकशी करायला हवी. एक ईव्हीएम मशीन या मोबाइलला जोडण्यात आले होते. त्यावर ओटीपी आला होता. मूळात ईव्हीएम मोबाईलला जोडताच येत नाही. त्याला इंटरनेट नसते. त्यामुळे ओटीपीने ते ऑपरेटच करता येत नाही. ज्यांना पंतप्रधान बनण्याची इच्छा आहे तेदेखील असे बोलतात हे हास्यास्पद आहे, असे निरूपम म्हणाले.