महाड तालुक्यातल्या तळये गावात दरड कोसळून ३६ जणांचा मृत्यू झाला. हृदय हेलावणारी अशी घटना या गावात घडली. मी आता त्या गावातच आहे. आमच्या सोबत माजी मंत्री गिरीष महाजन, आमदार निरंजन डावखरेसुद्धा उपस्थित आहेत. काल सायंकाळी ४ वाजता ही घटना घडली, पण आज दुपारपर्यंत प्रशासनाचा एकही अधिकारी, किंबहुना गावाचा तलाठीसुद्धा घटनास्थळी पोहोचला नाही, हे इथल्या ग्रामस्थांचे दुर्दैव आहे, असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सांगितले.
मुंबईहून पाऊसपाण्याची तमा न बाळगता अत्यंत खडतर प्रवास करत अत्यंत बिकट परिस्थितीत मार्ग काढत रस्ते मार्गाने दरेकर तसेच भारतीय जनता पार्टीचे हे नेते महाडच्या तळये गावापर्यंत पोहोचले. त्यानंतर तेथील परिस्थितीचा आढावा त्यांनी घेतला. त्यानंतर प्रसिदधीमाध्यमांशी ते बोलत होते.
आज सांगतात संपर्क साधू शकत नाही. नेटवर्क प्रॉब्लेम आहे. परंतु दळणवळणेला चालना देत महाड येथून बोटीने येण्याची आवश्यकता होती. एनडीआरएफची टीम उशिरा पोहोचली. ठाणे येथून तरुण मुलं मदतीला आली. दिलासा देण्याचं काम त्या तरुणांनी केलं, ग्रामस्थांना स्थलांतर करत त्यांनी तेथून बाहेर काढले. परंतु प्रशासकीय अधिकारी पोहोचला नाही ही शरम वाटणारी गोष्ट आहे, असे त्यांनी सांगितले.
अनेक दिवसापासून हवामान अधिकाऱ्यांनी रेड अलर्ट दिला असून आम्हीसुद्धा सांगितलं होते की, कोकणात सुविधा बळकट करा. त्यांना अगोदरच स्थलांतरित करण्यात आले नाही. त्यामुळे हे जीव गेले. अगोदरच जर टीम आली असती तर आज हे निष्पाप जीव वाचले असते. परंतु प्रशासनाची एव्हढी बेपर्वाई ज्यांनी लोकांचे जीव घेण्यापर्यंत कधीच काही पाहिलं नाही. सरकार ५ लाख देतील, १० लाख देतील. परंतु गेलेले जीव परत येणार नाही, असेही दरेकर म्हणाले.
प्रशासनाचा प्रतिनिधी आतापर्यंत पोहोचले नव्हते. आता टीम आणि प्रशासकीय कर्मचारी पोहोचले. त्यामुळे नंतर मदत करण्यापेक्षा पंचनामे करून घ्या, मदत पुरवा आणि त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करा, असे आवाहन प्रविण दरेकर यांनी राज्य सरकारला केले.