४० दिवसांचा अल्टिमेटम संपूनदेखील आरक्षणाबाबत सरकार निर्णय घेऊ शकलं नाही. म्हणून जरांगे यांनी पुन्हा उपोषणाला सुरुवात केली आहे. आता यापुढे ट्रिपल इंजिन खोके सरकार काय मार्ग काढणार आहे, हे पाहावं लागेल. छत्रपती शिवाजी महाराज यांची मुख्यमंत्री यांनी सभेदरम्यान मराठा आरक्षणासंदर्भात शपथ घेतली. कदाचित त्यांच्याकडे मार्ग असावा. सध्याच्या सरकारमध्ये पॉलिसी पॅरालिसीस आहे. पॉलिसी लेव्हलला ते काहीच काम करताना दिसत नाहीत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली.
काल मुख्यमंत्र्यांचे भाषण ऐकलं. त्या भाषणात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन शब्द दिलेला आहे. आता या आरक्षणाबाबत ते काय निर्णय घेतात हे आपण पाहूयात. आता २४ तासांत ते काय निर्णय घेतात. कदाचित त्यांच्याकडे जादूची कांडी असावी. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. छत्रपतींची शपथ घेऊन ते सांगत आहेत तर त्यांच्याकडे कदाचित मार्ग असावा. कदाचित २४ तासांत मराठा आरक्षणाबाबत ते निर्णय घेतील असं मला वाटतं, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
चंद्रशेखर बावनकुळे जरी सत्तेत असलेल्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असले तरी त्यांचा दिवस राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचं नाव घेतल्याशिवाय मावळत नाही. त्यातच सर्व उत्तर आहे. भाषणाला मुद्दे नसतानादेखील भाषण करणं ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसाठी लाजिरवाणी बाब आहे. ज्यांना २००४मध्ये काय घडलं याचं वास्तवदेखील माहित नाही. याबाबत बोलण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
ललित पाटील प्रकरणाबद्दल बोलायचं झाल्यास महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांचा हा पराभव आहे. मी गृहमंत्र्यांवर आरोप करत नसून हे सर्व समोर दिसत आहे. या सर्व गोष्टींना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत. एक नागरिक, एक लोकप्रतिनिधी म्हणून मी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना विनम्रपणे प्रश्न विचारत आहे की, ललित पाटील प्रकरणामधील नावे तुम्ही समोर आणणार होतात आणि त्यावेळी मीही शब्द दिला होता की ड्रग्जविरोधात जर तुम्ही लढाई लढणार असाल तर आमचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे. गेले आठ ते दहा दिवस फडणवीस या सर्व प्रकरणाला टाळत आहेत, अशी टीकाही सुळे यांनी केली.

