मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशील स्वभावाचा अनुभव पुन्हा एकदा पाहायला मिळाला. काल दुपारी मुख्यमंत्री ठाण्याहून मुंबईत विधान भवनाकडे येत असताना घाटकोपरनजीक दोन जैन साध्वींचा अपघात झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता आपला ताफा थांबवून मुख्यमंत्री त्यांच्या मदतीसाठी धावून गेले.
घाटकोपर येथे रमाबाई आंबेडकर नगर रोडपाशी मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा पोहोचला असता त्यांना हा अपघात झाल्याचे निदर्शनास आले. प्रचंड वेगात असूनही मुख्यमंत्र्यांनी आपला ताफा थांबवला आणि ते या महिलांच्या मदतीसाठी धावून गेले. या जैन साध्वींची गाडी उलटल्याने त्यांना दुखापत झाल्याचे कळल्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता मुख्यमंत्र्यांनी आपल्या कॉन्व्हॉयमधील रुग्णवाहिका पुढे बोलावून त्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करायला सांगितले. तसेच त्याठिकाणी तैनात असलेल्या महिला पोलीस आणि वाहतूक पोलिसांना त्यांच्यासोबत जाऊन त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश दिले.
मुख्यमंत्र्यांनी पदाचा बडेजाव सोडून गरजेला धावून जाण्याचा आपला बाणा कायम ठेवल्याचे या घटनेमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. नुसतं अर्थसंकल्पात तरतूद करणे आणि होर्डिंग लावणे एव्हढ्यापुरताच नव्हे तर प्रत्यक्ष गरज पडेल तेव्हा मदतीला धावून जाणारा भाऊराया मुख्यमंत्र्यांच्या रूपाने महाराष्ट्राला मिळाला असल्याचे या घटनेमुळे पुन्हा एकदा दिसून आल्याच्या भावना येथील महिलावर्गात व्यक्त होत आहेत.