Homeटॉप स्टोरीमंगळवारी पंतप्रधान मोदी...

मंगळवारी पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांना देणार 20 हजार कोटी!

पंतप्रधान नरेंद्र मोदी पीएम-किसान योजनेअंतर्गत सुमारे शेतकऱ्यांकरीता 20,000 कोटी रुपयांचा 17वा हप्ता येत्या 18 जूनला त्यांच्या वाराणसी भेटीत जारी करणार आहेत. यावेळी ते 30,000पेक्षा जास्त बचत गटांना कृषी सखी म्हणून प्रमाणपत्रे प्रदान करतील.

केंद्रीय कृषी आणि ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. उत्तर प्रदेश सरकारच्या सहयोगाने केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय, हा कार्यक्रम आयोजित करणार आहे. उत्तर प्रदेशचे राज्यपाल, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तर प्रदेश सरकारच्या मंत्र्यांसह इतर मान्यवर यावेळी उपस्थित राहतील.

आज देशातील धान्याचे भांडार शेतकरी भरत आहेत. यापूर्वीही कृषी आणि शेतकरी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक पावले उचलली गेली आणि आताही पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पंतप्रधानांनी सर्वप्रथम शेतकऱ्यांसाठी किसान सन्मान निधीचा 17वा हप्ता जारी करण्याचे ठरवले आहे. तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्या पहिल्या कार्यक्रमात, पंतप्रधान वाराणसी येथून केवळ एक बटण क्लिक करून पीएम किसान योजनेअंतर्गत 9.26 कोटींपेक्षा जास्त लाभार्थी शेतकऱ्यांना 20,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा बहुप्रतीक्षित 17वा हप्ता वितरित करतील.

शिवराज सिंह चौहान म्हणाले की किसान सन्मान निधी ही 24 फेब्रुवारी 2019 रोजी सर्व प्रकारची जमीन धारण करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजांची पूर्तता करण्यासाठी सुरू करण्यात आलेली केंद्र सरकारची योजना असून, यासाठी उच्च उत्पन्न स्थितीचे काही अपवादात्मक निकष लागू आहेत. लाभार्थ्यांची नोंदणी आणि पडताळणी यामध्ये पूर्ण पारदर्शकता राखून, भारत सरकारने आतापर्यंत या योजनेअंतर्गत देशभरातील 11 कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांना 3.04 लाख कोटी रुपयांचे वितरण केले आहे. आता जारी केल्या जाणाऱ्या रकमेसह, योजनेच्या प्रारंभापासून लाभार्थ्यांना हस्तांतरित केलेली एकूण रक्कम 3.24 लाख कोटी रुपयांच्यावर पोहोचेल, असेही चौहान यांनी सांगितले.

18 जून रोजी शेतकऱ्यांच्या समृद्धीबरोबरच विकसित भारताच्या संकल्पाला यश मिळू लागेल, कारण या दिवशी अनेक केंद्रीय मंत्री देशातील 50 कृषी विज्ञान केंद्रांना भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यांच्यामध्ये विभागाच्या विविध योजनांबाबत जागृती करणार आहेत. देशभरातील सुमारे 2.5 कोटी शेतकरी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी 732 कृषी विज्ञान केंद्रे 1 लाखाहून अधिक प्राथमिक कृषी सहकारी संस्था आणि देशभरातील 5 लाख सामायिक सेवा केंद्रेदेखील या कार्यक्रमात सहभागी होतील, असे ते म्हणाले.

पंतप्रधानांनी तीन कोटी लखपती दीदी बनवण्याचा संकल्प केला आहे. त्यापैकी सुमारे एक कोटी लखपती दीदी बनल्या आहेत. आणखी 2 कोटी बनवायच्या आहेत. कृषी सखी हा त्याचाच एक पैलू आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी अनेक भगिनींना प्रशिक्षण देण्यात आले आहे, जेणेकरून त्या शेतकऱ्यांना शेतीच्या विविध कामांमध्ये हातभार लावू शकतील आणि वर्षाला सुमारे 60-80 हजार रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकतील, असे चौहान म्हणाले.

Continue reading

तासाभरातच तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री! ९ आमदारही घेणार शपथ!!

तमिळनाडूच्या राजकारणात एक ऐतिहासिक क्रांती घडत आहे. अभिनेता विजय यांच्या नेतृत्त्वाखालील 'तमिझगा वेत्री कळघम' (टीव्हीके) पक्षाने सत्तेसाठी आवश्यक असलेले पाठबळ मिळवले आहे. बहुमताचा ११८ हा जादुई आकडा गाठण्यासाठी आवश्यक असलेले समर्थन मित्रपक्षांकडून मिळाल्याने, आता थोड्याच वेळेत म्हणजे सकाळी १०...

11वी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेच्या नियमित कॅप फेरी-1चे वेळापत्रक घोषित

महाराष्ट्रातल्या इयत्ता 11वीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेअंतर्गत शैक्षणिक वर्ष 2026-27साठी नियमित कॅप फेरी-1चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने हे जाहीर केले आहे. आज, 8 मे रोजी इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेशअर्जाचा भाग-1 आणि...

मतदारांना भुरळ घालण्यासाठी बाळगली 1,400 कोटींची अवैध सामग्री

भारतात 2024 साली लोकसभेसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांपासून, नुकत्याच झालेल्या आसाम, केरळम्, पुदुच्चेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांच्या विधानसभा निवडणुका तसेच 5 राज्यांमधल्या 7 विधानसभेच्या पोटनिवडणुकांदरम्यान मतदारांना भुरळ घालण्यासाठी तब्बल 1,400 कोटी रुपयांहून अधिक किमतीची बेकायदेशीर सामग्री बाळगली होती....
Skip to content