गेल्या १५/२० वर्षात ठाणे रेल्वेस्थानकाचा बराच विस्तार झाला. फलाटही वाढले तसेच लोकल आणि इतर गाड्यांची संख्याही वाढली हे मान्य केलेच पाहिजे. या प्रमाणात स्थानक परिसरातील सोयीसुविधा मात्र कासव गतीने वाढत आहेत. याविरूध्द ठाणेकरांच्या मनात रोष आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वगळता ठाणे रेल्वेस्थानकाकडून प्रचंड प्रमाणात महसूल रेल्वेला पर्यायाने केंद्र सरकारला मिळत असूनही या स्थानकाचे स्वरूप गलिच्छ आणि ओंगळवाणेच राहिलेले आहे.
प्रचंड गर्दी हे परिसराचे खरे दुखणे आहे. त्यातच हल्ली या परिसराला भिकारी आणि बेवारस लोकांनी जणू गराडाच घातलेला दिसत आहे. भिकाऱ्यांचे नंदनवन असल्यासारखीच परिस्थिती आहे. अगदी रिक्षा थांब्याच्या जागेपासून भिकारी दर्शन देत असतात. जे दर्शन देत नाहीत ते थांब्याच्या मागे अस्ताव्यस्त पडलेले असतात. नाशिक टॅक्सी थांब्याच्या टपरीवर चक्क एक भिकारी पहुडलेली दिसत आहे तसेच आतील फलाट क्रमांक एकवर बसण्याच्या जागेवर चक्क एका प्रवाशाने झोप काढायची ठरवल्याचे दिसत आहे. रेल्वे पोलिस व्हॅनशेजारीच एक बेवारस झोपलेला दिसत आहे. त्या रिक्षा थांब्याची ही दुर्दशा झालेली आहे. आतील बाजूच्या अनेक लाद्या उखडून गेलेल्या आहेत तर तेथे असलेला एक आधार खांब ‘स्वच्छतेचा’ पुरस्कार आपल्याला कधी मिळेल याच्या प्रतीक्षेत आहे. या परिसरातील रस्त्यांबांबत काय बोलावे? समतल म्हणजे काय हे त्या अभियंत्याला जणू माहीतच नसावे असे खेदाने म्हणावे लागत आहे.

महाव्यवस्थापकांच्या भेटीबाबत एक किस्सा समजला. गेल्या सुमारे २० वर्षात एकाही महव्यवस्थापकाने या स्थानक परिसराची एकदाही पाहणी केलेली नाही. एक अधिकारी म्हणाला की, महाव्यवस्थापकांना कर्जत/लोणावळा येथे जायचे असेल तेव्हाच फक्त ते स्थानकाची बसल्या जागीच फ्लायिंग पाहणी करतात. ठाणे, कल्याण परिसरातील एकाही खासदाराला याबाबत प्रश्न विचारावासा वाटत नाही. यातच रेल्वेकडून ठाण्याचा अपमान का होतो याचे कारण दडले असल्याचे एका ज्येष्ठ प्रवाशाने सांगितले. ठाणे रेल्वेस्थानक परिसराची अशीच दुरवस्था कायम राहिली तर कधीतरी प्रवाशांचा संताप अनावर होईल हे मात्र निश्चित!

