मेडटेक मित्र, हे एक असे व्यासपीठ आहे जे देशातील तरुण प्रतिभावंतांना त्यांचे संशोधन, ज्ञान, तर्कशास्त्र इत्यादीं क्षेत्रात पाठबळ देत नियामक मान्यता मिळविण्यात मदत करेल. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी ‘मेडटेक मित्र’ या वैद्यकीय तंत्रज्ञान क्षेत्रातील नवप्रवर्तक आणि प्रगत आरोग्य सेवा उपाययोजनांच्या सक्षमीकरणाच्या धोरणात्मक उपक्रमाचा दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून शुभारंभ करताना काल ही माहिती दिली. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रा. एस. पी. सिंग बघेल आणि नीती आयोगाचे आरोग्य सदस्य डॉ. व्ही. के. पॉलही यावेळी उपस्थित होते.

वैद्यकीय उपकरण क्षेत्र भारताच्या आरोग्यसेवा क्षेत्राचे एक आवश्यक आणि अविभाज्य घटक आहे. विकसित भारताच्या दृष्टीकोनाचा पाठपुरावा करत, 2047पर्यंत देशातील आरोग्य परिदृश्य बदलण्याच्या दृष्टीकोनातून भारत आरोग्याबाबत समग्र दृष्टीकोनाचा अंगीकार करत असल्याचे डॉ. मांडवीय यांनी सांगितले. भारताचे वैद्यकीय तंत्रज्ञान क्षेत्र 80 टक्क्यांपर्यंत आयातीवर अवलंबून आहे हे लक्षात घेऊन, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी यावर भर दिला की, देशात वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी, उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना आणि वैद्यकीय औषध पार्कसाठी गुंतवणूक, वैद्यकीय तंत्रज्ञान संशोधन धोरण आणि वैद्यकीय तंत्रज्ञान संशोधन प्रोत्साहन योजनेसह या क्षेत्राने अभूतपूर्व प्रगती केली आहे. या सहयोगात्मक उपक्रमामुळे परवडणारी, दर्जेदार वैद्यकीय तंत्रज्ञान उपकरणे आणि निदानांचा स्वदेशी विकास सुलभ होईल. परिणामी या क्षेत्राचे आयात अवलंबित्व लक्षणीयरीत्या कमी होईल असे ते म्हणाले. या क्षेत्राची वाढ आणि क्षमता अधोरेखित करत, 2030पर्यंत भारत 50 अब्ज डॉलर्सचा उद्योग बनेल असा विश्वास आहे असे डॉ. मांडवीय म्हणाले.

या उपक्रमाची प्रशंसा करताना प्रा. एस. पी. सिंग बघेल म्हणाले, मेडटेक मित्र हे भारतातील उदयोन्मुख उद्योजक आणि नवसंशोधकांसाठी एक व्यासपीठ आहे. हे एका परिसंस्थेपेक्षा, एक समुदाय आहे. हा क्रांतिकारी बदलाचा अग्रदूत आहे.

नवोन्मेषी संकल्पना प्रकाशात आणण्यात नवप्रवर्तकांना भेडसावणारी आव्हाने अधोरेखित करताना, डॉ. व्ही. के. पॉल यांनी वैद्यकीय मूल्यमापन आणि नियामक अनुपालनासाठी नवप्रवर्तकांना हातभार लावण्यात मेडटेक मित्राची भूमिका अधोरेखित केली. मेडटेक मित्र, उदयोन्मुख स्टार्ट-अप्सना सक्षम करेल आणि नवोन्मेष सुलभता, संशोधन आणि विकास सुलभता, आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यासाठी सेवा प्रदान सुलभता सुनिश्चित करेल, यावर त्यांनी भर दिला.


