१९७०च्या मध्यावर मनोज कुमार दिग्दर्शित आणि अभिनित ‘रोटी कपडा और मकान’ आला. मनोजकुमारव्यतिरिक्त, या चित्रपटात शशी कपूर, अमिताभ बच्चन, झीनत अमान, मौसमी चॅटर्जी आणि प्रेमनाथ होते. मनोज कुमार हिरो असला तरी यातले अमिताभ बच्चन आणि प्रेमनाथ खूप भाव खाऊन गेले. ऑक्टोबर १९७४ रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट त्या वर्षातला सर्वात मोठा हिट चित्रपट ठरला. आणि त्याला शेवटपर्यंत ऑल टाईम ब्लॉकबस्टरचा दर्जा मिळाला. या सिनेमाचा साउंडट्रॅक संगीत चार्टवर वर्चस्व गाजवत राहिला. १९७५मध्ये, मनोजकुमारचा ‘संन्यासी’ लागला. मनोज कुमारच्या आगळ्यावेगळ्या अभिनयामुळे आणि सुपरहिट गाण्यांमुळे त्याला प्रेक्षकांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला आणि तो ब्लॉकबस्टर बनला. १९७६मध्ये मनोज कुमारच्या ‘दस नंबरी’ या अॅक्शन-क्राइम चित्रपटाने त्याच्या ब्लॉकबस्टर चित्रपटांची हॅटट्रिक पूर्ण केली. १९७७मध्ये, त्याचा ‘शिर्डी के साई बाबा’ हिट झाला.
१९८१मध्ये मनोज कुमारने मोठ्या हिमतीने दिलीप कुमार, हेमा मालिनी, शशी कपूर, परवीन बाबी आणि शत्रुघ्न सिन्हा असे मोठे स्टार्स घेऊन “क्रांती” काढला. यात मनोज कुमारचं दिग्दर्शन अप्रतिम होतं. त्याचा रोलसुद्धा भाव खाणारा होता. म्हणूनच क्रांती, हा सिनेमा १९८१मध्ये बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक लोकप्रिय ठरला. हा १९८०च्या दशकातील सर्वात यशस्वी चित्रपट होता. ‘उपकार’ आणि ‘रोटी कपडा और मकान’नंतर मनोज कुमारचा तिसरा ऑल टाईम ब्लॉकबस्टर चित्रपट होता. “क्रांती”ची क्रेझ इतकी होती की दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि हरियाणासारख्या ठिकाणी “क्रांती” ब्रँडचे टी-शर्ट, जॅकेट, बनियन विकणारी दुकानं निघाली. अगदी “क्रांती” अंडरवेअर्ससुद्धा विकली जात होती. १९८१ हे वर्ष या हिंदी सिनेमांसाठी खूप महत्त्वाचं होतं. नसीब, लावारिस, एक दुजे के लिए, लव्ह स्टोरी आणि मेरी आवाज सुनोसारख्या सुपरहिट सिनेमांच्या पार्श्वभूमीवर क्रांतीचं यश उठून दिसणारं होतं. क्रांती मनोजकुमारच्या कारकिर्दीतला शेवटचा यशस्वी हिंदी सिनेमा ठरला.
मी मनोज कुमारचे अनेक जुने-नवे पिक्चर पाहिले. पण मला मनोज कुमारचे मनापासून आवडलेले पिक्चर्स म्हणजे पूरब पश्चिम, उपकार, शहीद आणि क्रांती. या सगळ्या पिक्चर्समधली गाणी खूपच छान होती. किंवा असं म्हणू की या गाण्यांमुळेच मला मनोज कुमार आवडायचा. कधीकधी आपल्याला गाणी खूप आवडतात म्हणून त्या गाण्यातले अभिनेतेही आवडतात. तसंच काहीसं मनोज कुमारच्या बाबतीत होतं. उपकारमधलं “मेरे देश की धरती सोना उगले.. उगले हीरे मोती..” हे गाणं म्हणजे आपलं “स्टेटमेंट ऑफ नेशन” ठरावं इतकं जबरदस्त आहे. आयुष्यातल्या प्रत्येक २६ जानेवारीला आणि १५ ऑगस्टला हे गाणं ऐकलं नाही असं कधीच झालं नाही. “क्रांती”मधलं “लाख गहरा हो सागर तो क्या? प्यार से कुछ भी गहरा नही” हे गाणं म्हणजे नितीन मुकेशचे स्वर, हेमामालिनीचा उत्कट अभिनय आणि मनोज कुमारचे गंभीर भाव यांचं अद्भुत मिश्रण आहे. महेंद्र कपूरच्या पहाडी आवाजातलं “है प्रीत जहाँ की रीत सदा, मैं गीत वहाँ के गाता हुँ, भारत का रहने वाला हुँ.. भारत के गीत सुनाता हुँ” हे गाणं पडद्यावर पाहताना बंद गळ्याचा जोधपुरी कोट घातलेला मनोजकुमार प्रचंड सुंदर दिसतो. गाणं ऐकून आपला उर भरून येतो तो वेगळाच.

१९९०मधल्या २६ जानेवारीला टी.व्ही.वर मनोज कुमारच्या शहीद पिक्चरमधलं गाणं दाखवत होते. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना फाशी देण्याच्या सीनवरचं हे गाणं होतं. देशासाठी मरायला निघालेल्या भगतसिंग, राजगुरू, सुखदेवपैकी राजगुरू जेलरला म्हणतो “डिपटी साहब, इनके गालो पर काला टीका लगा दिजिये. कही नजर ना लग जाये…” आणि गाणं सुरू होतं…
“मेरा रंग दे बसंती चोला…
मेरा रंग दे बसंती चोला…
जिस चोले को पहन…
शिवाजी खेले अपनी जान पे…
जिसे पहन झांसी की रानी…
मिट गई अपनी आन पे…
आज उसी को पहन के निकला…
हम मस्तो का टोला…
मेरा रंग दे बसंती चोला…
जेव्हा कॅमेरा मनोज कुमारच्या चेहऱ्यावर अर्ध्या मिनिटाकरता स्थिरावतो, तेव्हा मनोज कुमारच्या चेहऱ्यावरचे मंद स्मितहास्याने सुरू होणारे भाव बदलत जातात आणि ते मृत्यूची मस्करी करणाऱ्या गडगडाटी हास्यात रूपांतरित होतात. मरायला निघालेली व्यक्ती इतकी हसू कशी शकते?? असा मला प्रश्न पडला. अंगावर काटे उभे राहिले. डोळे पाण्याने भरले. अंग गरम झालं. हसतहसत मनोज कुमार अलगदपणे गाण्याच्या ओळी म्हणतो…
“जिस चोले को पहन शिवाजी खेले अपनी जान पे…”
हे म्हणताना तो अभिनय करत नसतो. त्याच्यात एक दिव्य आत्मा प्रविष्ट झालेला असतो. तो असतो स्वातंत्र्यासाठी हसत फासावर चढणाऱ्या शहीद भगतसिंग याचा आत्मा… होय. तो साक्षात भगतसिंगच असतो… तो मनोज कुमारचा अभिनय नसतो. शहीदमधल्या या गाण्यातल्या अर्ध्या मिनिटात मनोजकुमार हा संपूर्ण हिंदी चित्रपटसृष्टी गिळंकृत करतो. आजवर यूट्यूबवर हे गाणं मी शंभरवेळा पाहिलंय, ऐकलंय. पण गाणं पाहताना प्रत्येकवेळा धमन्यांमधलं रक्त उसळून बाहेर पडतंय असं वाटतं. डोळ्यात अंगार फुलतो. या गाण्याने माझ्या आयुष्यात अक्षरशः क्रांती घडवली. माझा जीवनाविषयीचा दृष्टिकोनच ३६० डिग्री बदलला.
असं म्हणतात की… “शहीदों पर आँसू नही बहाते…”
भारतमातेसाठी बलिदान करणारा महान क्रांतिकारक शहीद भगतसिंग पडद्यावर साक्षात साकार करणारा मनोज कुमार दोन दिवसांपूर्वी ४ एप्रिलला आपल्यातून निघून गेला.
जय हिंद मनोज कुमार…
भारत माता की जय…