Homeपब्लिक फिगरनाना पटोलेंच्या मते...

नाना पटोलेंच्या मते शरद पवार आजही ‘दगाबाज’?

राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडीमध्ये आम्ही आहोत. पण, २०१४ सालचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून शेवटच्या क्षणी झालेला धोका आम्ही विसरू शकत नाही. त्यामुळे आम्ही आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवण्याची तयारी आतापासूनच करत आहोत आणि ही तयारी चालूच राहणार, असे सांगत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज पुन्हा राष्ट्रवादीला आपले लक्ष्य केले.

लहान माणसांच्या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया देत नाही, असे सांगत नाना पटोले यांना उडवून लावणाऱ्या शरद पवार यांनी काल काँग्रेसच्या नेत्यांकडे नाराजी व्यक्त करूनदेखील आज पुन्हा २०१४चा मुद्दा उकरून काढत नाना पटोले यांनी पवार यांची प्रतीमा आजही  ‘दगाबाज’ अशीच आहे, असे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, असा सूर काँग्रेस तसेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उमटत आहे.

नाना पटोले यांनी स्वबळाची भाषा करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यावरून महाविकास आघाडीत नाराजी वाढली असतानाच नाना पटोले यांनी मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांकडून आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप केला होता. काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांनी मुंबईत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन महाविकास आघाडीतली धुसफूस शमवण्याचा प्रयत्न केला. नंतर त्यांनी शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेटही घेतली. अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यावेळी उपस्थित होते. परंतु पटोले त्यांच्याबरोबर चर्चेला गेले नाहीत. आज मात्र, पटोले यांनी या बैठकीसाठी आपल्याला निमंत्रणच नसल्याचे सांगितले. त्यामुळे महाविकास आघाडीतल्या या दोन पक्षांमधील समन्वय किती ढिसाळ आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.

पटोले

या बैठकीत पवार यांनी काँग्रेसच्या नेत्यांना आपल्या पद्धतीने समज दिल्याचे कळते. काँग्रेस पुढच्या निवडणुका स्वबळावर लढणार असेल तर त्यांनी आताच ते स्पष्ट करायला हवे. पक्षाचा निर्णय तसा झाला आहे का, पटोले यांना तसे अधिकार दिले आहेत का, आपला पक्ष वाढविण्याचे अधिकार प्रत्येकाला आहे. परंतु सत्तेत असताना सहकारी पक्षांवर टीका करून वातावरण दूषित करता कामा नये, असे पवार यांनी काँग्रेसच्या नेत्यांना सुनावले, असे कळते.

पवार यांच्या या भूमिकेनंतर काँग्रेस नमते घेईल असे वाटत असतानाच आज पुन्हा पटोले यांनी स्वबळाची भाषा केली. २०२४ साली महाराष्ट्रात काँग्रेस हाच नंबर एकचा पक्ष असेल, हा आमचा अजेंडा आहे. आणि २०१४मध्ये राष्ट्रवादीने दिलेला धोका लक्षात घेता आयत्या वेळी पुन्हा त्यांनी तशी भूमिका घेतली तर आम्ही काय करायचे? त्यामुळे आम्ही आतापासूनच स्वबळाची तयारी करत आहोत, असे स्पष्ट केले. मात्र, हे करताना त्यांनी राष्ट्रवादीने २०१४ साली दिलेल्या धोक्याचा उल्लेख केल्याने पवार संतप्त झाल्याचे बोलले जाते. याचे पडसाद महाविकास आघाडीत उमटतील, अशीही चर्चा आहे.

दरम्यान, शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी काँग्रेसला नवसंजीवनीची गरज असल्याचे म्हटले आहे. राऊत यांच्या या वक्तव्याचाही परामर्ष घेताना पटोले यांनी, काँग्रेस मरणासन्न अवस्थेत अजिबातच नाही. संजीवनी नेत्यांकडे नाही जनतेकडे असते असे सुनावले आहे.

Continue reading

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...

म. गांधीजींच्या गावातच गुजरात सरकारकडून मद्यविक्रीला परवानगी!

महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये इतिहासात पहिल्यांदाच गुजरात सरकारकडून, एका आलिशान हॉटेलला मद्यविक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. गुजरात राज्य उत्पादन शुल्क आणि प्रतिबंध विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात वादाला तोंड फुटले असून, गांधीवादी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी याविरोधात...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी पूर्णपणे डिजिटल, जुनी पद्धत बंद!

कल्पना करा, तुमच्या कुटुंबातील एखाद्या गरीब रुग्णाला महागड्या उपचाराची गरज आहे. पूर्वीच्या काळात नातेवाईकांना मंत्रालयापर्यंत धावपळ करावी लागायची, कागदपत्रांची रास भरावी लागायची, दलालांच्या जाळ्यात अडकावे लागायचे आणि उपचारात विलंब होऊन रुग्णाची स्थिती बिघडायची. पण आता ती सगळी कहाणी संपली!...
Skip to content