Homeडेली पल्सअवघ्या ३ महिन्यांतच...

अवघ्या ३ महिन्यांतच नितीश कुमार यांचा बिहारला बायबाय?

अवघ्या तीन महिन्यांपूर्वी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून दहाव्यांदा शपथ घेणारे नितीश कुमार आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. येत्या १६ मार्चला होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीच्या माध्यमातून ते राज्यसभेवर जाण्याची शक्यता असून त्यांचे पुत्र निशांत कुमार बिहार सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून सहभागी होतील तर मुख्यमंत्रीपदी भारतीय जनता पार्टीच्या चेहऱ्याची वर्णी लागू शकते.

नोव्हेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्त्वाखाली निवडणुकांना सामोरे जात घवघवीत यश मिळवले. या निवडणुकीच्या वेळेपासूनच नितीश कुमार यांच्या आजारपणाची चर्चा होती. ७५ वर्षीय नितीश कुमार यांना स्मृतीभ्रंशाचा आजार आहे. त्याचवेळी ते आपले पुत्र निशांत कुमार यांना आपला उत्तराधिकारी म्हणून पुढे आणतील, अशी अटकळ होती. परंतु घराणेशाहीला नैतिकदृष्ट्या विरोध करण्याच्या प्रयत्नात हे झाले नाही. भाजपानेही आपण नितीश कुमार यांच्याकडील मुख्यमंत्रीपद हिसकावून घेतल्याचा आरोप टाळण्यासाठी नितीश कुमार यांनाच बिहारच्या मुख्यमंत्रीपदी बसवले. २० नोव्हेंबर २०२५ रोजी नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण त्यांचा आजार दिवसेंदिवस बळावत आहे. त्यामुळे आज सकाळी भाजपाचे अध्यक्ष नितीन नवीन यांनी पाटण्यात नितीश कुमार यांची भेट घेत त्यांना राज्यसभेवर जाण्याचा सल्ला दिला. बिहारचे मुख्यमंत्रीपद तुमच्या जनता दल युनायटेड पक्षाकडेच राहू द्यावे, जदयुच्या भवितव्याकरीता आपण मुलगा निशांत कुमार यांना राजकारणात सक्रीय करावे, असा सल्ला नितीन नवीन यांनी दिल्याचे कळते.

त्यानंतर, नितीश कुमार यांनी आपल्या पक्षातील ज्येष्ठ नेते लल्लन सिंह, संजय झा, मंत्री श्रवण कुमार आदींशी दीर्घ चर्चा केली. नितीश कुमार कुशवाह समाजाचे आहेत. या समाजावर असलेली पक्षाची पकड टिकवून ठेवायची असेल तर त्यांनी आताच निशांत कुमार यांना राजकारणात आणावे. बिहार सरकारमध्ये त्यांचा समावेश करावा, पक्षाच्या संघटनेतही महत्त्वाचे पद द्यावे, यावर सर्वांचे एकमत झाले. राज्यसभा निवडणुकीसाठी उद्या उमेदवारीअर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे उद्या नितीश कुमार आपला राज्यसभेचा उमेदवारीअर्ज दाखल करतील, असे समजते. निशांत कुमार नवखे असल्यामुळे त्यांना थेट मुख्यमंत्रीपदी बसवले जाणार नाही. त्यामुळे जदयुमधली गटबाजी उफाळू शकते. त्यामुळेच निशांत कुमार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद सोपवून भाजपा मुख्यमंत्रीपद आपल्याकडे घेण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

आखाती युद्धामुळे देशात यंदा हापूस स्वस्त?

आखातात इराण, अमेरिका आणि इस्त्रायलच्या युद्धामुळे यंदा आंबा निर्यातीला चांगलाच फटका बसण्याची शक्यता असून त्यामुळे देशात यंदा हापूस स्वस्तात मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या फळे, भाजीपाला आणि इतर कृषी उत्पादनांची हवाईमार्गे होणारी निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे. ही...

इराणचे प्रमुख खामेनेई ठार, पुत्र मोजतबा उत्तराधिकारी!

गेल्या काही दिवसांपासून तोंडी असलेला अमेरिका-इराण संघर्ष आता प्रत्यक्षात उतरला. काल सकाळी अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्त कारवाई करत इराणच्या सर्व प्रमुख ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले. इराणच्या सहा शहरांवर हल्ले करण्यात आले. यात इराणचे प्रमुख नेते तसेच परमाणू केंद्रांना लक्ष्य करण्यात...

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...
Skip to content