दिवाळीत दीपोत्सव साजरा करताना मुंबईकरांनी पर्यावरणाचाही विचार करावा. फटाके उडविताना/फोडताना लहान मुलांची काळजी घ्यावी. फटाक्यांमुळे ध्वनी आणि वायूप्रदूषण होणार नाही, याबाबत दक्ष राहवे, असे आवाहन बृहन्मुंबई महापालिका आणि मुंबई अग्निशमन दलाने केले आहे. दुर्दैवाने आग किंवा तत्सम प्रसंग उद्भवल्यास तत्काळ १०१ किंवा नागरी मदत सेवा संपर्क क्रमांक १९१६ यावर संपर्क साधावा, असे आवाहनही अग्निशमन दलाने केले आहे.
प्रकाशाचा सण म्हणून दीपोत्सव अशी ओळख असणारा दिवाळीचा सण मुंबईकरांनी अधिकाधिक पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करावा. दिवे लावताना व फटाके फोडताना आपल्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी. काही वेळा उत्साहाच्या भरात नकळत आगीच्या दुर्घटनांना निमंत्रण दिले जाते. त्यामुळे आगीच्या दुर्घटना वाढण्याची शक्यता असते. अशा प्रकारच्या दुर्घटनांचे प्रमाण कमी करण्याकरीता योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन पालिकेने केले आहे.
फटाके फोडताना/उडवितांना घ्यावयाची काळजी
१. सुती कपडे परिधान करावेत.
२. मुलांपासून फटाके लांब ठेवावेत. फटाके फोडताना मोठ्यांनी मुलांसोबत राहवे.
३. फटाके फोडताना नेहमी पादत्राणे वापरावीत.
४. फटाके फोडताना / उडवताना पाण्याने भरलेली बादली जवळ ठेवावी व कोणाला भाजल्यास तत्काळ त्यावर भरपूर स्वच्छ पाणी ओतावे.
५. फटाके फोडण्यासाठी अगरबत्ती व फुलबाजीचा वापर करावा.
फटाके फोडताना/उडविताना पुढील बाबी टाळाव्यात
१. इमारतीत व जिन्यावर, तसेच टेरेसवर (गच्ची) फटाके फोडू नयेत.
२. फटाके पेटवण्यासाठी काडेपेटी किंवा लायटरचा वापर टाळावा.
३. झाडे, ओव्हरहेड विद्युत तारा किंवा उंच इमारतीजवळ हवेत उडणारे फटाके फोडू नयेत.
४. खिडक्यांच्या पडद्याजवळ पणत्या / दिवे लावू नयेत.
५. विजेच्या तारा, गॅस पाईपलाईन किंवा वाहनांजवळ, वाहनतळाच्या ठिकाणी फटाके फोडू नयेत.
६. घर, इमारत, परिसर इत्यादी ठिकाणी विद्युत रोषणाई करताना अधिकृत इलेक्ट्रिशिअनची मदत घ्यावी. निर्धारित क्षमतेपेक्षा अधिक क्षमतेचे विद्युत भार होणार नाही, याची काळजी घ्यावी.