Tuesday, March 11, 2025
Homeमाय व्हॉईसकिती काळ काँग्रेस...

किती काळ काँग्रेस ईव्हीएमवर खापर फोडणार?

महाराष्ट्राच्या निवडणुकीचे निकाल एक महिन्यापूर्वी लागल्यापासून काँग्रेसची घालमेल सुरु आहे. त्यांना निवडणुकीतल्या पराभवाचीच अपेक्षा होती, तसे सर्वेक्षण काँग्रेस नेत्यांच्या हाती मतदानाच्या महिनाभर आधी आलेले होते. कदाचित पराभव दिसत होता, पण तो इतका मोठा व इतका लाजिरवाणा असेल याची कल्पना आलेली नसावी! मोठे मोहरे गळले. बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाणांपासून अनेक दिग्गजांना मतदारांनी घरी बसवले आणि आधीच्या 14व्या विधानसभेत असणारी काँग्रेस आमदारांची 44 ही संख्या थेट निम्म्यापेक्षाही खाली कोसळली. हा पराभव पचवणे कोणालाही जडच असणार, यात शंका नाही.

पराभवासाठी कारणे तर शोधावीच लागतात. पण स्वपक्षात काय उणिवा होत्या, नेत्यांचे कुठे चुकले, उमेदवारी देताना किती घोळ झाले, मित्रपक्षांना जागा सोडताना काय चुका झाल्या, मित्रपक्षांनी काँग्रेसच्या किती जागा ढापल्या, पळवल्या या सर्वांवर विचार करणे सोडून काँग्रेसने पराभवासाठी एक सोयीचा शत्रू शोधला. ते म्हणाले की, ईव्हीएमध्येच घोळ आहे, घोटाळा झालेला आहे आणि आता ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवरचे मतदान आम्हाला हवे आहे. निवडणूक यंत्राबरोबरच निवडणूक प्रक्रियेवरही काँग्रेसने ठपका ठेवला व आयोगावरच दुगाण्या  झाडायला सुरूवात केली. मतदारांची संख्या रातोरात शंकास्पदरीत्या वाढवली गेली असा काँग्रेसचा आरोप होता. हरयाणा निवडणुकीत असेच धक्कादायक निकाल आले तेव्हा काँग्रेसने असाच थयथयाट केला होता. जयराम रमेश व त्यांची टीम ईव्हीएम घोटाळ्यावर आणि निवडणूक यंत्रणेवर आरोप करण्याच्या कामाला तेव्हापासूनच लागलेली होती.

काँग्रेस

खरेतर लोकसभा निवडणुकीचे दाखले देत काँग्रेस विधानसभा निवडणूक निकालावर थयथयाट करत सुटलेली आहे. पण मुळात लोकसभेत त्यांचा विजय झाला होता, असे ते कसे म्हणू शकतात, हाच सवाल आहे. देशस्तरावर काँग्रेसला खासदारसंख्येचे शतकही पार करता आले नाही. अर्थात काही राज्यातील निम्याहून अधिक लोकसभेच्या जागा ते जिंकू शकले हे मात्र खरे आहे. त्यात हरयणातली पन्नास टक्के व महाराष्ट्रातील तीस टक्के जागांवरचा काँग्रेसचा विजय हा त्या पक्षाची कॉलर ताठ करणार होता यातही शंका नाही. पण महाराष्ट्रात मिळालेल्या 17 जागांवरील विजयाचे विष्लेषण काँग्रेसने धडपणाने केले का? तर नाही! महाराष्ट्रातील त्यांची गेल्या तीन निवडणुकांतील ही सर्वोत्तम कामगिरी म्हणावी लागेल. पण त्यातल्या अनेक जागा काठावर निवडून आल्या होत्या.

धुळ्यासारख्या मतदारसंघांतील चित्र पूर्णतः फसवे होते, हे कोणाच्याही लक्षात येईल. तिथे सहा विधानसभा मतदारसंघांपैकी पाच ठिकाणी माहयुतीचे डॉ. भामरे यांना मताधिक्य दिसले. पण एका मालेगाव ग्रामीण मतदारसंघांत आधीच्या पाच मतदारसंघांतील महायुतीच्या मतांपेक्षा चार हजार अधिक मते महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांना पडली होती. डॉ. भामरेंना अन्य पाच मतदारसंघांत मिळून 1 लाख 92 हजार मते आहेत, तर एकट्या मालेगावातून बच्छाव यांना 1 लाख 96 हजार मते पडली आहेत! हा चमत्कार मुस्लीम मतदारांनी घडवलेला आहे. पण मुस्लीम समाजाचे प्राबल्य असणारे किती विधानसभा मतदारसंघ राज्यात आहेत आणि त्यातील किती ठिकाणी काँग्रेसला विजयाची शक्यता दिसली हा प्रश्न काँग्रेस नेत्यांनी स्वतःला विचारायला हवा. समाजवादी पक्षाच्या आमदारांनी आता जाहीर केले आहे की, खरेतर मुस्लीम समुदायाने काँग्रेस, उबाठा सेना व शरद पवारांपेक्षा महायुतीच्या उमेदवारांना अधिक मते विधानसभेत टाकली आहेत.

काँग्रेस

काँग्रेसने हरयाणामध्ये आरोप केला होता की, मतदानयंत्रावरील बॅटरी जिवंत असण्याचे प्रमाण निरनिराळे होते यातच काळेबेरे होते. जिथे बॅटरी 90 टक्के वा त्यापेक्षा अधिक उपलब्ध असल्याचे दिसले त्या मतदारसंघांमध्ये भाजपाचे उमेदवार जिंकले आणि जिथे बॅटरी अधिक संपली होती तिथे काँग्रेसचे उमेदवार जिंकत होते. त्यावर तपशीलवार तांत्रिक स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने जारी केले तेव्हा काँग्रेसवाले गप्प बसले. आता महाराष्ट्र निवडणुकांबाबत काँग्रेसने निवडणूक यंत्रणेवर ठेवलेला ठपका आणि मतदानाचा टक्का वाढला कसा, त्यात काळेबेरे आहे असा जो मुख्य आरोप केला आहे त्याला सविस्तर व सणसणित उत्तर आयोगाने दिले आहे.

निकालानंतर सात-आठ दिवसांतच काँग्रेसचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ दिल्लीत आयोगापुढे गेले. तिथे त्यांनी जे निवेदन दिले त्याला मुद्देसूद उत्तर आयोगाने जारी केले आहे. हे साठ पानांचे तांत्रिक माहितीने ठासून भरलेले उत्तर, आयोगाच्या वेबासाईटवरही उपलब्ध आहे. जिज्ञासूंनी ते जरूर वाचावे. यात आयोगाने स्पष्ट केले आहे की राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये संध्याकाळी पाच ते रात्री साडेअकरा या वेळेत वाढलेला मतांचा टक्का ही सामान्य बाब असून मतदानाच्या प्रक्रियेमध्ये कोणताही गैरप्रकार झालेला नाही. संध्याकाळी ५ ते ६ या एका तासात सुमारे ७६ लाख मतदान कसे झाले असा सवाल केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात काँग्रेसने विचारला होता. तसेच, मतदानाच्या थोडाच काळ आधी मतदारयादीत मोठ्या प्रमाणावर भर घालण्यात आली असाही आरोप काँग्रेसने केला होता. काँग्रेसचे म्हणणे आहे की, पन्नास मतदारसंघांमध्ये अचानक प्रत्येकी पन्नास हजार मते वाढली. या पन्नास जागांपैकी 47 ठिकाणी महायुतीचे उमेदवार जिंकले. महायुतीच्या फायद्यासाठी आयोगाने आमचे मतदार याद्यांमधून उडवले व यांचे मतदार ऐनवेळी घुसवले, अशी एक थिअरी या आरोपात काँग्रेसने मांडली होती.

काँग्रेस

त्यावर आयोगाने सांगितलेले उत्तर गमतीदार आहे. कोणताही अभ्यास न करता काँग्रेसवाले ठोकमठोक आरोप करत होते, असेही यातून स्पष्ट दिसते. मतदारयादीतून मतदारांची नावे मनमानी वा स्वैरपणे वगळली वा ती समाविष्ट केल्याचा आरोप आयोगाने फेटाळला. जुलै ते नोव्हेंबर या पाच महिन्यांमध्ये सुमारे ४७ लाख मतदारांची भर याद्यांमध्ये पडली. ५० मतदारसंघांमध्ये सरासरी ५० हजार नव्या मतदारांना सामील केले गेले व त्यातील ४७ मतदारसंघांमध्ये महायुतीचा विजय झाला, असा आरोप काँग्रेसचा होता. काँग्रेसची ही माहिती चुकीची असून फक्त सहा मतदारसंघांमध्ये एकूण ५० हजार मतदारांची भर पडली, असा दावा आयोगाने केला आहे. मतदारयादी तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये सर्व राजकीय पक्षांना सहभागी करून घेतले जाते व ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शी असल्याचेही आयोगाने नमूद केले आहे. निवडणूक प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर सर्व राजकीय पक्षांना विश्वासात घेतले जाते. घाऊक पद्धतीने मतदारांची नावे वगळण्यात आलेली नाहीत. प्रत्येक मतदारसंघात सरासरी २७७९ नावे वगळली. यात निधन, स्थलांतर किंवा दुबार मतदारांचा समावेश होता,असे निवडणूक आयोगामे स्पष्ट केले आहे.

संध्याकाळी ५ वाजल्यानंतर 76 लाख मते कशी वाढली असा काँग्रेसचा सवाल होता. 5 वाजता मतांचा टक्का ५८.२२ होता, तो रात्री ११.३० वाजता ६५.०२ टक्के झाला. आयोगाने घोषित केलेली मतांची अंतिम टक्केवारी ६६.०५ इतकी होती. हा वाढीव टक्का एकत्रित मतांची आकडेवारी असते. त्यामध्ये कोणतीही चूक वा गैरप्रकार झालेला नाही. प्रत्यक्षात झालेल्या मतदानाची टक्केवारी बदलणे अशक्य असते. प्रत्येक उमेदवाराच्या मतदान केंद्रावरील प्रतिनिधीला ‘१७-क’ अर्ज देणे बंधनकारक असते. मतदानाची प्रक्रिया थांबल्यानंतर मतदान केंद्रावरच मतांची आकडेवारी असलेला ‘१७-क’ हा अर्ज दिला जातो. ‘१७-क’मधील अर्जामध्ये नंतर कोणताही बदल केला जात नाही, असे आयोगाने ठणकावले आहे. व्होटर टर्नआऊट एपवर साडेपाच वाजता प्रसिद्ध करण्यात आलेली मतांची टक्केवारी त्यावेळी उपलब्ध झालेल्या माहितीवर आधारित असते. अनेकदा सर्व मतदान केंद्रांवरील आकडेवारी विविध कारणांमुळे तत्काळ उपलब्ध होत नाही. ती उशिरा पोहोचत असल्यामुळे रात्री साडेअकरा वाजता मतांची टक्केवारी वाढलेली दिसते, असा युक्तिवाद आयोगाने केला आहे. सर्व पक्षांच्या प्रतिनिधींसमोर होणाऱ्या या मतदान प्रक्रियेवर निवडणूक आयोगासारख्या स्वायत्त यंत्रणेने मांडलेली वस्तुस्थिती पाहून यानंतर तरी काँग्रसने शहाणे व्हावे व निकालानंतरचे खरेखुरे आत्मपरीक्षण करावे.

Continue reading

पंगा घेणं नीलमताईंसाठी नवं नाही!

पूर्वी मातोश्रीवर दोन मर्सिडीज गाड्या पोहोचल्या की एक पद मिळत होते, हे मी पाहिलेले आहे, माझा स्वतःचा अनुभव नाही, अशा अर्थाचे उद्गार विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी काढले. ज्या अ. भा. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून त्या हे बोलल्या,...

अडचणींचे डोंगर संपल्यानंतरच लागते आस्थेची बुडी!

अडचणींचे डोंगर संपल्यानंतरच लागते आस्थेची बुडी!, असे म्हणतात ते उगाच नाही. प्रयागराज क्षेत्राच्या नैनी तटावरील अरैल घाटावर पहाटे साडेपाच-सहा वाजता आम्ही चाललो होतो, तेव्हाही तिथे आमच्या आजुबाजूने किमान दोन-तीन हजार लोकं चालत होते. काही घाटाच्या दिशेने मार्गक्रमण करत होते....

अमेरिकेतले बेकायदेशीर नागरीक हे भारतातल्या बांगलादेशींसारखेच!

अमेरिकेचे नवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचे खरे रूप जगाला दाखवायला सुरुवात केली आहे. जगभरातील जे लोक अमेरिकेत बेकायदा राहतात त्यांना मायदेशी परत पाठवण्याचे वचन ट्रम्प यांनी निवडणूक प्रचारात दिले होते. सत्तेवर येताच त्याच्या पूर्ततेची पावले टाकायला त्यांनी सुरूवात...
Skip to content