Homeचिट चॅटपुराणिक चषकावर अखेर...

पुराणिक चषकावर अखेर ‘वेंगसरकर’चे नाव!

पूनम राऊत आणि श्वेता कलपाथी यांनी वैयक्तिक अर्धशतकांसह दुसर्‍या विकेटसाठी केलेली ८२ धावांची भागिदारी आणि रेशमा नायकने २२ धावांत टिपलेल्या ३ विकेटस् या कामगिरीच्या जोरावर दिलीप वेंगसरकर फाऊंडेशनने राजावाडी क्रिकेट क्लबचे जेतेपद राखण्याचे स्वप्न १८ धावांनी धुळीस मिळवले आणि प्रकाश पुराणिक स्मृती चषक महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेवर आपले नाव कोरले. गेल्या वर्षी प्रथमच झालेल्या या स्पर्धेत राजावाडीने स्पोर्टस् फिल्डचा पराभव करत बाजी मारली होती.

माहिम ज्युवेनाईल स्पोर्टस् क्लब आणि शिवाजी पार्क जिमखान्याने प्रकाश पुराणिक यांच्या स्मरणार्थ महिला क्रिकेटला प्रोत्साहन आणि त्यांच्या खेळाला मानाचा मुजरा करण्यासाठी आयोजित केलेली टी-२० क्रिकेट स्पर्धा संस्मरणीय ठरली. महिला खेळाडूंची फटकेबाजी आणि विजयासाठी केलेला थरारक संघर्ष पाहाण्याची मेजवानी मुंबईकरांना लाभली. स्पर्धेच्या साखळी सामन्यांप्रमाणे अंतिम सामनाही जोरदार झाला.

दिलीप वेंगसरकर फाऊंडेशनच्या १५४ धावांचा पाठलाग करताना वृषाली भगतच्या ५६ धावांची झुंजार खेळीने सामन्यात चुरस आणली. रेश्मा नायकने  किमया राणे (०) आणि सलोनी कुष्टे (११) यांनी बाद करून सनसनाटी निर्माण केली. पण वृषालीने एकहाती किल्ला लढवताना तुशी शाहबरोबर ३५, शेरल रोझारियोबरोबर ३९ आणि निविया आंब्रेबरोबर ३० धावांची भागी करत संघाच्या विजयासाठी शेवटपर्यंत संघर्ष केला. पण तो अपुरा ठरला. ४५ चेंडूंत ५६ धावांची संघर्षपूर्ण खेळी करून वृषाली बाद होताच वेंगसरकरचा विजय निश्चित झाला. राजावाडीला २० षटकांत ९ बाद १३५ धावांपर्यंतच मजल मारता आली. रेश्मा नायकने २२ धावांत ३ तर पूनम राऊतने २२ धावांत २ विकेट घेत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

त्याआधी पूनम राऊतने फलंदाजीतही आपली चमक दाखवताना ४४ चेंडूंत ५३ धावा काढल्या होत्या. श्वेता कलपथीसह दुसर्‍या विकेटसाठी ८२ धावांची भागी रचताना संघाच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. श्वेतानेही ५३ धावा काढल्या. तसेच पूनमने सिमरन शेखबरोबरही ३७ धावांची भागी करत संघाला दीडशेसमीप नेले. सिमरनने १५ चेंडूंत २६ धावा चोपल्या. त्यामुळेच वेंगसरकर फाऊंडेशन १५४ धावांचे लक्ष्य उभारू शकला होता. ५३ धावा आणि ३ विकेट टिपणारी पूनम राऊत संघाच्या विजयाची मानकरी ठरली.

क्षमा पाटेकर ठरली सर्वोत्तम खेळाडू

स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाजाचा पुरस्कार भारत क्रिकेट क्लबच्या केतकी धुरेला मिळाला तर वेंगसरकर फाऊंडेशनची निर्मिती राणे सर्वोत्तम गोलंदाज ठरली. स्पर्धेत अष्टपैलू कामगिरी करणार्‍या राजावाडीच्या क्षमा पाटेकरने स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा मान मिळविला. महिला संघांचे कौतुक करण्यासाठी हिंदुस्थानी संघाचे माजी कसोटीपटू बलविंदरसिंग संधू, अभिषेक नायर आवर्जुन उपस्थित होते. तसेच माहिम ज्युवेनाईलचे अध्यक्ष विजय येवलेकर, सचिव सुनील पाटील, कोषाध्यक्ष महेश शेट्ये, शिवाजी पार्क जिमखान्याचे सचिव संजीव खानोलकर, सुनील रामचंद्रन यांच्या उपस्थितीत विजेत्यांचे कौतुक करण्यात आले.

संक्षिप्त धावफलक

दिलीप वेंगसरकर फाऊंडेशन: २० षटकात ४ बाद १५३ (पूनम राऊत ५३, श्वेता कलपाथी ५३, सिमरन शेख  २६; क्षमा पाटेकर ३०/२, कोमल परब १७/१)

राजावाडी क्रिकेट क्लब: २० षटकात ९ बाद १३५ (वृषाली भगत ५६, तुशी शाह १९; रेशमा नायक २२/३, पूनम राऊत २२/२)

Continue reading

आता विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयांतच मिळणार एसटीचे पास

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी-विद्यार्थिनीसाठी “एसटी पास थेट तुमच्या शाळेत” ही मोहिम राबविण्यात येणार असून त्यामुळे आता एसटीचे पास थेट त्यांच्या शाळा-महाविद्यालयात वितरित करण्यात येणार आहेत. राज्याचे परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्ये रस्ते परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी...

रत्नागिरी, रायगड जिल्हयाला पुढच्या २४ तासांसाठी पावसाचा रेड अलर्ट

भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढच्या २४ तासांसाठी महाराष्ट्रातल्या रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांना रेड अलर्ट तर पालघर, ठाणे, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट आणि सिंधुदूर्ग यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. प्रशासनातर्फे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) व राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) पथकांना आपत्कालीन परिस्थितीकरीता सतर्क राहण्याच्या...

पंतप्रधान मोदी 4 दिवसांच्या परदेशवारीसाठी रवाना

पाकिस्तानवरच्या लष्करी कारवाईनंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तीन देशांच्या दौऱ्याकरीता रवाना झाले. या दौऱ्यात पंतप्रधान सायप्रस प्रजासत्ताक, कॅनडा आणि क्रोएशिया या तीन देशांना भेटी देतील. येत्या ते 19 जूनला पंतप्रधान मोदी मायदेशी परततील. सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्तोदौलिदीस यांच्या निमंत्रणावरुन...
Skip to content