टाईप 2 मधुमेह आणि जीवनशैलीशी संबंधित इतर अनेक विकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच स्तनाच्या कर्करोगासह अनेक कर्करोग बरे करण्यासाठी लवकरात लवकर निदान ही गुरुकिल्ली आहे, असे राष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध वैद्यकीय व्यावसायिक आणि मधुमेह तज्ज्ञ असलेले केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ जितेंद्र सिंह यांनी काल नवी दिल्लीत सांगितले.

लवकर निदान आणि देशात उपलब्ध महत्वाच्या संशोधन उपचारांच्या सुलभ उपलब्धतेमुळे भारतात स्तनाच्या कर्करोगावर त्याच्या सुरुवातीच्या टप्प्यातच मात करता येऊ शकते, असे त्यांनी सांगितले.
‘भारतीय महिलांसाठी स्तन कर्करोगाचे उपचार वाढवणे’ या शीर्षकाखालील “द वीक कनेक्ट” कार्यक्रमात ते बोलत होते. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या सीएसआयआर प्रयोगशाळा भारतातील कर्करोग संशोधन प्रयत्नांमध्ये आघाडीवर आहेत, अशी माहिती डॉ जितेंद्र सिंह यांनी दिली.

भारतात, 2020 मध्ये स्तनाच्या कर्करोगाने 37.2 टक्के महिलांचा मृत्यू झाला, हे आशियाई प्रमाण 34 टक्के, तर जागतिक सरासरी 30 टक्के आहे, असे आकडेवारीचा संदर्भ देत डॉ. सिंह यांनी सांगितले. भारतात स्तनाच्या कर्करोगाचा उच्च मृत्युदर हा प्रामुख्याने योग्य जागरूकतेच्या अभावामुळे आणि जोखीम असलेल्या लोकसंख्येसाठी तपासणी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे उशीरा निदान झाल्याशी संबंधित असू शकतो, असे त्यांनी सांगितले.

स्तनाच्या कर्करोगाला प्रतिबंध शक्य असून हा रोग अत्याधिक बरा होणारा आहे आहे, त्याचे जितक्या लवकर निदान होईल तितके प्रभावी उपचार आणि जगण्याची शक्यता अधिक असते हा एक आशेचा किरण आहे, हे मंत्र्यांनी अधोरेखित केले. संशोधनामुळे स्तनाच्या कर्करोगाचे निदान आणि उपचारांमध्ये अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या असून या कमी गुंतागुंत आणि कमी दुष्परिणाम सुनिश्चित करतात असे त्यांनी सांगितले.

या पूर्वी, रुग्णांवर शस्त्रक्रियेशिवाय केवळ केमोथेरपी आणि रेडिएशनने उपचार केले जात होते. आता उपचाराचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, हे दिलासादायक असल्याचे डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले.
आयुष्मान भारत ही आतापर्यंतची जगातील सर्वोत्कृष्ट आरोग्य विमा योजना आहे आणि ती संकल्पना मांडण्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाते, असे डॉ. जितेंद्र सिंह यांनी देशभरात निरामय केंद्रासारख्या विशेष स्तन कर्करोग क्लिनिकच्या संकल्पनेला समर्थन देत सांगितले.

आयुष्मान भारत ही कदाचित जगातील एकमेव अशी आरोग्य विमा योजना आहे की जी आधीपासूनच अस्तित्वात असलेल्या आजारासाठीही विमा संरक्षण मिळविण्याचा पर्याय देते, उदाहरणार्थ, आज जर एखाद्या व्यक्तीला कर्करोग किंवा स्तनाचा कर्करोग असल्याचे आढळून आले, तर उपचारासाठी आर्थिक मदत मिळवण्यासाठी एखादी व्यक्ती या योजने अंतर्गत स्वत:चा विमा काढू शकते. असे त्यांनी सांगितले.

