महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच असून तेच राज्याचे नेतृत्त्व करतील, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपूरमध्ये माध्यमांना दिली. सर्व विधिमंडळ सदस्यांनी आणि प्रदेश भाजपाने देवेंद्र फडणवीस यांना सरकारमध्येच राहून संघटनेला मदत करण्याची विनंती केली आहे, असेही त्यांनी सांगितले.
बुधवारी सकाळी नागपूर विमानतळावर ते पत्रकारांशी बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या पुढील पाच वर्षांच्या महाराष्ट्र विकासाच्या योजना महाराष्ट्रात आणण्यासाठी महायुतीचे सरकार काम करेल. त्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये आवश्यक आहेत. ज्या मतदारसंघात महायुतीचा उमेदवार अर्धा टक्क्यापेक्षा कमी मतांनी मागे राहिला, त्याविषयी केंद्रीय नेतृत्त्वासोबत कारणांची चर्चा व विचारविनिमय केला. जेथे कमी पडलो आहोत त्याठिकाणी अधिकचे काम करून विधानसभेत ही पोकळी भरून काढण्यासाठी काम करू, असे ते म्हणाले.

महाराष्ट्रात धन्यवाद यात्रा
लोकसभा निवडणुकीत मतदारांनी दिलेल्या पाठबळाबद्दल धन्यवाद व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रात भाजपा धन्यवाद यात्रा काढणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या पुढील ५ वर्षांत होणारी विकासकामे व योजनांचा लाभ महाराष्ट्रातील जनतेला व महाराष्ट्राच्या विकासासाठी व्हायला हवा. महाराष्ट्रातील सर्व आमदार-खासदार, संघटनेतील सर्व पदाधिकारी जुलै महिन्यात धन्यवाद आभार दौरा करणार आहे. ज्या मतदारांकडे आम्ही मत मागण्यासाठी जाऊ त्यांना मोदी सरकारच्या नवीन योजनादेखील पोहोचवणार आहोत, असे त्यांनी सांगितले.
यशाने ते थोडे हुरळले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर किती खालच्या पातळीवर टीका करण्यात आली या गोष्टीचा अभ्यास शरद पवार यांनी केला पाहिजे. अत्यंत तुच्छ आणि गलिच्छ पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वैयक्तिक टीकाटिप्पणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे. महायुतीच्या सर्व नेत्यांना एकत्र काम करत महायुतीच्या माध्यमातून पुढे जायचे आहे आणि महायुतीला पुढे नेण्यासाठी आपल्याला काम करायचे आहे, असे बावनकुळे यांनी सांगितले.
मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीवर अन्याय होणार नाही याबाबतची काळजी सरकारने घेतली पाहिजे, अशी भूमिका आमची पहिल्यापासून आहे आणि तीच भूमिका पुढेही राहिल, असेही ते म्हणाले.