६ जानेवारी १८३२ रोजी ज्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण, हे वर्तमानपत्र सुरू केले आणि मराठी वृत्तपत्रसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली, त्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या पोंभुर्ले या सिंधुदूर्ग जिल्ह्यातील जन्मगावी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे राष्ट्रीय स्मारक बनवावे तसेच हिंदी वृत्तपत्रसृष्टीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या बाबुराव पराडकर यांच्या कोकणात असलेल्या पराड गावातही त्यांच्या नांवे राष्ट्रीय स्मारक बनवावे, या मागणीचा पुनरुच्चार ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी यांनी केला.
पत्रकार उत्कर्ष समिती, मुंबईतर्फे ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक विजय वैद्य, योगेश त्रिवेदी, ज्येष्ठ पत्रकार प्रसाद मोकाशी, शिबानी जोशी, सरफराज आरझू यांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले. यावेळी केलेल्या भाषणात त्रिवेदी यांनी सांगितले की, इच्छाशक्ती असली की काम कसे पूर्ण होते हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटी, या स्मारकाची उभारणी करुन दाखवून दिले आहे.
गुजरातमधील डभोईजवळचे केवडिया हे गाव २०१४पर्यंत कुणालाही माहित नव्हते. पण २०१८मध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी तिथे उभारण्यात आले आणि आज हेच केवडिया जागतिक नकाशावर आले आहे. लाखो पर्यटक येतात आणि कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. जर केवडिया आंतरराष्ट्रीय पातळीवर सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक होऊ शकते मग आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे पोंभुर्ला का होऊ शकत नाही? असा सवालही त्यांनी केला.
पत्रकार उत्कर्ष समितीने पत्रकारांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्कार देऊन आम्हाला आणखी ऊर्जा प्राप्त करून दिली आहे. कामाठीपुरासारख्या समाजामधील उपेक्षित आणि विशिष्ट नजरेतील परिसरात राजेंद्र लकेश्रीसारखा हिरा गेल्या पस्तीस वर्षांपासून सामाजिक कार्य करीत आहे. बॅ. रामराव आदिक यांच्याकडे बत्तीस वर्षे सेवा करुनही काहीही पदरात पाडून घेण्याऐवजी समाजाला सतत देत राहण्याची त्यांची भूमिका आदर्श निर्माण करणारी आहे, अशा शब्दांत सर्वच पत्रकारांनी त्यांचा गौरव केला.
पत्रकार उत्कर्ष समिती, महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. अशोकराव म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात पत्रकारांना अपघात विमा देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. पत्रकार उत्कर्ष समिती मुंबईचे अध्यक्ष राजेंद्र लकेश्री, सरचिटणीस आनंद मुसळे, सुनील कोलगे, पत्रकार उत्कर्ष समिती मुंबईच्या महिला अध्यक्षा डॉ. संपदा कारेकर, माजी नगरसेवक जावेद जुनेजा, राजेंद्र नरवणकर, बबन गवस, शाकीर अन्सारी, सुरेश काळे, सुनील कदम, सुरेश शेट्टी, सुरेंद्र तेलंग प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सूर्य लाड हिंदु खाटिक समाज, 8 वी गल्ली, मार्केटसमोर, मानाजी राजूजी मार्ग, कामाठीपुरा, मुंबई- ८ येथे हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. पत्रकार उत्कर्ष समिती, महाराष्ट्र या संस्थेच्या २०२३च्या दिनदर्शिकेचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. समारंभाच्या प्रारंभी ज्येष्ठ संसदपटू, पत्रकार भाई डॉ. केशवराव धोंडगे आणि ज्येष्ठ चित्रपट समीक्षक सुधीर नांदगावकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

