Sunday, March 16, 2025
Homeटॉप स्टोरीलोकसभेसाठी सत्ताधारी तसेच...

लोकसभेसाठी सत्ताधारी तसेच विरोधकांकडून झाकली मूठ..!

येत्या लोकसभा निवडणुकीच्या घोषणेसाठी काही दिवसांचा अवधी राहिला असतानाच सत्ताधारी महायुती तसेच विरोधी महाविकास आघाडी यांच्या उमेदवार निश्चितीसाठी चर्चेचे गुऱ्हाळ अद्यापही सुरूच आहे. या चर्चेचे टप्पे अंतिम चरणाकडे झुकले असले तरी डावपेचाचा भाग म्हणून दोन्ही बाजू समोरून होणाऱ्या घोषणांकडे नजर लावून बसल्याचे कळते.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विरोधी पक्षांची महाविकास आघाडी लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी इंडी आघाडी स्थापन करण्याचे मनसुबे रचत होती. यासाठी त्यांच्या काही बैठकाही झाल्या. परंतु नंतर राष्ट्रीय स्तरावरील या आघाडीला भगदाडे पडू लागली. नितेश कुमार दिल्लीतल्या सत्ताधारी एनडीएमध्ये सामील झाले. त्याचबरोबर आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल तसेच तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी आपापले उमेदवार निश्चित करण्याची तयारी चालवली. बहुजन समाज पार्टीच्या मायावती यांनी आपली स्वतंत्र चूल मांडली. त्यामुळे इंडी आघाडीला घरघर लागली. यामध्ये काँग्रेसला सांभाळण्यासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भारत जोडो यात्रेचा प्रयोग सुरू केला, जो आजही चालू आहे.

सत्ताधारी

या सर्व घडामोडी सुरू असतानाच महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे बळ कायम राहो, विरोधी पक्षांची, त्यांच्या कार्यकर्त्यांची उमेद कायम राहवी हा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद्चंद्र पवार गटाचे नेते शरद पवार, शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे तसेच काँग्रेसचे नेते नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात आदींनी महाविकास आघाडीच्या जागावाटपाचे गुऱ्हाळ चालू ठेवले. त्यातच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी स्वतंत्र चूल मांडण्याची तयारी चालवली. हे सर्व पाहता मग आंबेडकरांनाही महाविकास आघाडीत सहभागी करून घेण्याचा प्रयत्न सुरू झाला. याच प्रयत्नाचा भाग म्हणून प्रकाश आंबेडकरांबरोबर चर्चेच्या बैठका आयोजित करण्याचे ठरले.

सत्ताधारी

दरम्यानच्या काळात उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकरांबरोबर युतीही केल्याचे जाहीर केले होते. मात्र त्यापुढील टप्पा म्हणजेच महाविकास आघाडीतला प्रवेश तसेच इंडी आघाडीतला त्यांचा प्रवेश रखडला होता. म्हणूनच आंबेडकर अस्वस्थ होते. त्यानंतर जेव्हा शेवटचे पाऊल आंबेडकरांनी उचलले तेव्हा काल महाविकास आघाडीच्या बैठकीत आंबेडकरांनाही सहभागी करून घेण्यात आले. आज मुंबईत फोर सीजन हॉटेलमध्ये महाविकास आघाडीचे नेते शरद पवार, बाळासाहेब थोरात, जितेंद्र आव्हाड, नाना पटोले, उद्धव ठाकरे, संजय राऊत, प्रकाश आंबेडकर आदी नेत्यांची जवळजवळ साडेचार तास चर्चा झाली. मात्र, या चर्चेनंतरही कोणता पक्ष किती जागा लढवणार हे जाहीर करण्यात आले नाही. येत्या नऊ मार्चला पुन्हा महाविकास आघाडीचे नेते चर्चेला बसणार आहेत. त्यामध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील हे निश्चित केले जाईल, असे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माध्यमांना सांगितले.

सत्ताधारी

सोमवार रात्रीपासून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. मंगळवारी रात्री तसेच बुधवारी सकाळी सह्याद्री अतिथीगृहात अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी लोकसभेच्या जागावाटपाबाबत बराच खल केला. मात्र सत्ताधारी महायुतीकडूनही जागावाटपाचे सूत्र जाहीर करण्यात आले नाही. त्याचप्रमाणे कोण किती आणि कुठच्या जागा लढवणार हे महाविकास आघाडीप्रमाणेच महायुतीच्या नेत्यांनी गुलदस्तातच ठेवले आहे.

या चर्चेनंतर काल दुपारीच भारतीय जनता पार्टीचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, प्रवीण दरेकर आदी नेत्यांनी थेट दिल्ली गाठली. आज रात्री ते दिल्लीत रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या शासकीय निवासस्थानी महाराष्ट्रातल्या लोकसभेतल्या जागांबाबत चर्चा करणार आहेत. या चर्चेनंतर हे नेते अमित शाह तसेच भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचीही भेट घेणार आहेत. यानंतर महायुतीतले जागावाटप तसेच जागानिश्चिती अंतिम आकार घेईल, असे सूत्राने सांगितले.

सत्ताधारी

डावपेचाचा भाग म्हणून सत्ताधारी महायुती तसेच विरोधी महाविकास आघाडी आपल्या गटातील कोणता पक्ष किती आणि कोणत्या जागा लढवणार हे शेवटच्या क्षणापर्यंत जाहीर करण्याची शक्यता नाही. फार फार तर ज्या जागा फक्त एका पक्षाच्याच उमेदवारासाठी खात्रीच्या असतील तेथीलच उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र जेथे एकापेक्षा जास्त पक्षांचा उमेदवारीवर दावा असेल त्या जागा अंतिम क्षणी जाहीर केल्या जातील. आपल्या पक्षाचे कार्यकर्ते किंवा नेते समोरच्या बाजूला म्हणजेच आपल्या विरोधकांच्या बाजूला सरकू नये, याची काळजी घेण्यासाठी म्हणून हे डावपेच आखले जाण्याची शक्यता आहे.

Continue reading

‘शातिर..’मधून अभिनेत्री रेश्मा वायकर करणार पदार्पण

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या महिलाप्रधान चित्रपटाला चांगले दिवस आल्याचे दिसते. मात्र मराठीत महिलाप्रधान सस्पेन्स थ्रिलर प्रकारातील चित्रपटांचा अभाव आहे. आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून श्रीयांस आर्ट्स अँड मोशन पिक्चर्सच्या वतीने ‘शातिर THE BEGINNING’ या सस्पेन्स थ्रीलर चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून या...

कुर्ल्यातल्या कबड्डी स्पर्धेत अंबिका, पंढरीनाथ संघांची बाजी

शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून मुंबईतल्या कुर्ला (पश्चिम) येथील गांधी मैदानात जय शंकर चौक क्रीडा मंडळ आणि गौरीशंकर क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित पुरुष गटाच्या कबड्डी स्पर्धेत प्रथम श्रेणी गटात अंबिका सेवा मंडळ, कुर्ला...

‘स्वामी समर्थ श्री’साठी राज्यातील दिग्गज उद्या आमनेसामने

क्रीडा क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या "स्वामी समर्थ श्री" राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेच्या माध्यमातून मुंबईकर शरीरसौष्ठवप्रेमींना जानदार, शानदार आणि पीळदार शरीरसौष्ठवपटूंचे ग्लॅमर पाहायला मिळणार आहे. आमदार महेश सावंत यांच्या आयोजनाखाली मुंबईच्या प्रभादेवीत दै. सामना मार्गाशेजारील...
Skip to content