Homeबॅक पेजपन्नाशीनिमित्त 'चतुरंग'चे सुवर्णरत्न...

पन्नाशीनिमित्त ‘चतुरंग’चे सुवर्णरत्न सन्मान जाहीर

चतुरंग प्रतिष्ठानच्या पन्नाशीनिमित्त ११ ‘चतुरंग सुवर्णरत्न सन्मानां’ची नुकतीच घोषणा करण्यात आली असून याकरीता पं. उल्हास कशाळकर (गायन), पं. हरिप्रसाद चौरसिया (वादन), अशोक पत्की (संगीत दिग्दर्शन), महेश एलकुंचवार (साहित्य), दिलीप प्रभावळकर (नाटक), रोहिणी हट्टंगडी (चित्रपट), वासुदेव कामत (चित्रकला), चंदू बोर्डे (क्रीडा), डॉ. अनिल काकोडकर (संशोधन), बाबासाहेब कल्याणी (उद्योजकता), मेजर महेश कुमार भुरे (राष्ट्रीय सुरक्षा) अशा अकरा क्षेत्रातील मान्यवरांची निवड करण्यात आली आहे. येत्या २८ – २९ सप्टेंबरला मुंबईत होणाऱ्या एका कार्यक्रमात हे सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.

कोकण खेड्यातल्या आपल्या शाळांसाठी आपण काहीतरी शालोपयोगी उपक्रम करूया अशा छोट्याशा उद्देशाने १९७४च्या अक्षय्य तृतीयेला सुरू झालेल्या चतुरंग प्रतिष्ठान, या सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक संस्थेने विविधांगी असे ६१ उपक्रम अंगीकारत, हाताळत कालच्या अक्षय्य तृतीयेला आपल्या वाटचालीची पन्नास वर्षे पूर्ण केली. मुंबईपाठोपाठ डोंबिवली, पुणे, चिपळूण, रत्नागिरी, गोवा… असा सहा केंद्रांवर आपला पसारा वाढवीत, महाराष्ट्रात सर्वदूर सुमारे २४०हून अधिक स्थळ, ठिकाणांचा वापर करीत ५० वर्षांत १८००हून अधिक कार्यक्रमांचा (इव्हेंटचा) टप्पा पार केला आहे.

अर्थातच यासाठी त्यांना भरभरून सहकार्य, पाठबळ पाठिंबा मिळाले ते सर्व क्षेत्रांतील असंख्य, अगणित लोकप्रिय कलावंतांचे! नामवंत, गुणवंत अशा अनेक मान्यवरांचे!! चतुरंग उभी राहायला, प्रस्थापित करायला ज्या ज्या सज्जन दिग्गजांनी, त्या त्या काळात चतुरंगला आधार दिला त्यांच्याप्रति जाहीर कृतज्ञता व्यक्त करणारे आनंदसोहळे प्रतिष्ठानने मुंबईखेरीज आपल्या रत्नागिरी, चिपळूण, गोवा, डोंबिवली, पुणे या अन्य केंद्रांवर मोठ्या दिमाखात साजरे केले आणि आता सुवर्ण महोत्सवी वर्षाचा सांगता सोहळा मुंबईमध्ये भव्य प्रमाणावर करण्याचे योजिले आहे.

या सोहळ्याचा केंद्रबिंदू असणार आहे चतुरंग सुवर्णरत्न सन्मान योजना. चतुरंगच्या हातून पार पडलेले सुमारे १८००हून अधिक कार्यक्रम ज्यांच्या कलावंतपणातून, प्रेरणेने, प्रोत्साहनाने चतुरंगला साकार करता आले अशा १४ विद्या, ६४ कलांपैकी किमान ११ क्षेत्रांतील नामवंत-गुणवंतांचा भाव्योत्कट असा जाहीर सन्मान आपल्या हातून घडावा. त्या किमान ११ जणांच्या उत्तुंग, लक्षवेधी, दैदिप्यमान कारकिर्दीबद्दल आपल्या हातून त्यांचे जाहीर वंदन, पूजन घडावे या सदिच्छातून सुवर्णरत्न सन्मानाची संकल्पना पुढे आली आहे.

या सन्मानासाठी सर्व नामवंत मान्यवरांनी सन्मान स्वीकृतीसाठी संमती दर्शविलेली असून ते या कार्यक्रमाला स्वतः उपस्थित राहणार आहेत. प्रस्तुत निवड करण्यासाठी ११ क्षेत्रातील प्रत्येकी ३-३ मातब्बर, अनुभवी, अभ्यासक अशा एकूण ३३ मान्यवर निवड समिती सदस्यांनी काम पाहिलेले आहे. त्या सर्वांच्या साक्षीने, त्यांच्याच उपस्थितीत हा ‘चतुरंग सुवर्णरत्न सन्मान सोहळा’ शनिवार – रविवार, दिनांक २८ – २९ सप्टेंबर २०२४ रोजी मुंबईत दादरमध्ये पार पडणार असल्याचे चतुरंग प्रतिष्ठानकडून घोषित करण्यात आले आहे. त्याप्रसंगी होणाऱ्या नाट्य, नृत्य, संगीत, साहित्य, संवाद, गायन, वादन… अशा विविध स्वरूपातील कार्यक्रमांचे तपशील लवकरच घोषित केले जातील, असे प्रतिष्ठानने कळविले आहे.

Continue reading

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...

१ ऑगस्टपासून मंत्रालयाचा प्रवेश होणार पूर्णपणे डिजिटल!

येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतल्या मंत्रालयातला अभ्यागतांचा प्रवेश पूर्णपणे डिजिटल होणार आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्णपणे डिजिटल होईल. १ ऑगस्टपासून, कागदावर आधारित सर्व प्रकारचे पास टप्प्याटप्प्याने बंद केले जातील आणि डिजिटली ओळख पटवून अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाईल. राज्याच्या डिजिटल...

हॉलिवूड नगरीत मराठी तारे-तारकांचे जल्लोषात स्वागत!

'नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म असोसिएशन' (नाफा)च्या मराठी चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनासाठी अवघे काही तास उरले असून, महाराष्ट्रातून हॉलिवूड नगरीत दाखल झालेल्या निमंत्रित कलाकारांचे सॅन होजे येथे जल्लोषात स्वागत झाले. २४ जुलैच्या रात्री 'नाफा'चे संस्थापक-अध्यक्ष अभिजीत घोलप यांच्या सिलिकॉन व्हॅली येथील...
Skip to content