केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान (स्वतंत्र प्रभार) राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह, जे स्वतः नामवंत मधुमेह उपचार तज्ज्ञ आहेत, त्यांनी सांगितले की, डिजिटल आरोग्यसेवा, टाईप 2 मधुमेहासारख्या जीवनशैलीशी निगडीत विकारांपासून ते कोविड सारख्या संसर्गजन्य आजारापर्यंतच्या अनेक रोगांवरील प्रभावी प्रतिबंधक साधन ठरू शकेल.

ते आज नवी दिल्ली येथे तिसऱ्या आरोग्य सेवा नेत्यांच्या परिषदेत, सहज उपलब्ध आणि परवडण्याजोग्या आरोग्य सेवेसह निरोगी भारतासाठी, भारताचा डिजिटल पथदर्शक आराखडा या विषयावर बोलत होते.
ते म्हणाले की, आगामी काळात प्रतिबंधात्मक उपचारांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या डिजिटल आरोग्य सेवेवर अधिक भर दिला जाईल.

डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, विशेषतः आरोग्य सेवांमधील शहरी-ग्रामीण तफावत संपुष्टात आणण्यासाठी सार्वजनिक-खासगी भागीदारीचे (पीपीपी) मॉडेल, ही काळाची गरज आहे.
शहरी आणि ग्रामीण भागातील असमानता दूर करण्यासाठी, आपण किफायतशीरपणा, समावेशकता आणि सहज उपलब्धता, यावर पुणपणे लक्ष केंद्रित करून, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करू शकतो, ते म्हणाले.

डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, भारताने देशाच्या आरोग्यसेवा पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा घडवून आणण्यामध्ये गेल्या काही वर्षांत प्रगती केली आहे. ते म्हणाले की, गेल्या अर्ध्या शतकापेक्षा जास्त काळामध्ये आजारांच्या प्रकारात आणि त्याच बरोबर आपल्याकडे उपलब्ध उपचारात्मक आणि प्रतिबंधात्मक उपचार पद्धतींमध्येही मोठा बदल घडून आला आहे.

डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांच्या दृष्टीकोनाला अनुसरून, गेल्या 9 वर्षांपेक्षा जास्त काळात, सरकारने आरोग्य सेवेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.
डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, विज्ञान आणि तंत्रज्ञान ही समाजाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि आज सर्वांना भेडसावणाऱ्या जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी महत्त्वाची साधने आहेत.

अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन (ANRF) विधेयक कंपन्यांना संशोधन आणि विकासामध्ये गुंतवणूक करण्यासाठी प्रवृत्त करेल, असे ते म्हणाले. केंद्रीय मंत्री म्हणाले की, भारत हा मधुमेहाबाबतच्या संशोधनात जगात आघाडीवर असल्यामुळे, तरुण आणि गरोदर महिलांमधील मधुमेहाचा प्रादुर्भाव रोखण्याला आपले प्राधान्य आहे.

