काश्मिरमधल्या पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने उचललेल्या पावलांना प्रत्त्युत्तर देताना पाकिस्तानने त्यांचे हवाई क्षेत्र भारतीय विमानांकरीता बंद केले आहे. हवाई क्षेत्रावरील या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची सुविधा, सुरक्षितता आणि नियामक अनुपालनाची खात्री करताना विमान कंपन्यांनी प्रवाशांना मार्गातले बदल, प्रवासाचा वाढलेला कालावधी आदी सर्व बाबींची तपशीलात माहिती द्यावी, असे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत.
अलीकडील आंतरराष्ट्रीय हवाईक्षेत्रबंदी आणि ओव्हरफ्लाइट निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर, अनेक उड्डाण मार्गांमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे उड्डाणाचा कालावधी वाढला आहे आणि अतिरिक्त तांत्रिक थांबे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांची सुविधा, सुरक्षितता आणि नियामक अनुपालनाची सुनिश्चिती करण्यासाठी, नागरी विमान वाहतूक महासंचालक (डीजीसीए) यांनी सर्व विमान कंपन्यांना त्वरित प्रभावाने वाढीव प्रवासी हाताळणीचे उपाय लागू करण्याचे निर्देश दिले आहेत.
प्रवाशांना मार्गातील बदल, वाढलेला प्रवास वेळ आणि त्यांच्या प्रवासादरम्यान कोणत्याही तांत्रिक थांब्यांविषयी माहिती दिली पाहिजे. हा संवाद चेक-इन, बोर्डिंग आणि डिजिटल अलर्टद्वारे केला पाहिजे. विमान कंपन्यांना वास्तविक ब्लॉक वेळेच्या आधारे केटरिंगमध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे. त्यामुळे संपूर्ण उड्डाणात पुरेसे अन्न, पाणी आणि विशेष जेवणाची उपलब्धता सुनिश्चित करणे आवश्यक आहे. यात तांत्रिक थांब्याचाही समावेश आहे. विमान कंपन्यांनी विमानात वैद्यकीय बाबींचा पुरवठा पुरेसा आहे याची खात्री करावी. संभाव्य तांत्रिक थांब्यावर आपत्कालीन सेवांची उपलब्धता पडताळावी, असे निर्देश विमान कंपन्यांना देण्यात आले आहेत.
कॉल सेंटर आणि ग्राहक सेवा पथकांनी विलंब, हाताळण्यासाठी आणि लागू नियमांनुसार आवश्यकतेनुसार मदत किंवा भरपाई देण्यासाठी सज्ज असले पाहिजे. उड्डाण कार्यान्वयन, ग्राहकसेवा, ग्राउंड हँडलिंग, इनफ्लाइट सेवा आणि वैद्यकीय भागीदारांमध्ये अखंड समन्वय आवश्यक आहे. सर्व विमान कंपन्यांना हे निर्देश अनिवार्य मानण्यास सांगण्यात आले आहे. या निर्देशांचे पालन न केल्यास लागू असलेल्या नागरी विमान वाहतूक आवश्यकता अंतर्गत कारवाई होऊ शकते. हे निर्देश तत्काळ लागू झाले आहेत आणि पुढील सूचना येईपर्यंत ते लागू राहतील.