महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या 9 वर्षीय मुलाला कर्करोग झाल्यामुळे त्याच्यावर बोन मॅरो ट्रान्सप्लांट करणे आवश्यक होते. परंतु उपचाराचा खर्च कुटुंबाला परवडणारा नव्हता. या संकटाच्या काळात त्याच्या वडिलांनी मुलाला स्टेम सेल्स देऊन त्याचे प्राण वाचवले, तर आर्थिक मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाने पुढाकार घेतला.
प्रकाश (नाव बदलले आहे) हा 9 वर्षीय मुलगा आपल्या आई-वडिलांसह आणि 12 वर्षीय मोठ्या बहिणीसोबत कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील एका गावात राहतो. वडील एका खाजगी फायनान्स कंपनीत काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. काही महिन्यांपासून प्रकाश सतत आजारी पडत होता. प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्याला पुढील तपासणीसाठी कल्याण येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे तपासणीतून प्रकाशला कर्करोग असल्याचे आढळून आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारासाठी बोन मॅरो प्रत्यारोपणाचा सल्ला दिला. त्याचप्रमाणे उपचारासाठी सुमारे 25 ते 30 लाख रुपये खर्चाचा अंदाज वर्तविला. या परिस्थितीत डॉक्टरांनी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून आर्थिक मदत घेण्याचा सल्ला त्यांना दिला.
प्रकाशच्या पालकांनी पुढच्या उपचारासाठी मुंबईमधले वाडिया हॉस्पिटल गाठले. त्यासोबतच आर्थिक मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षात धाव घेतली. तेथे त्यांनी कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांच्याशी संपर्क साधला. नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार तातडीने कार्यवाही केली. त्यातूनच वाडिया रुग्णालयात प्रकाशवर उपचार सुरू करण्यात आले. मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या पुढाकारातून, टाटा ट्रस्टच्या मोठ्या योगदानातून तसेच काही सामाजिक संस्थांच्या सहकार्याने एकूण 29 लाखांची मदत उभी करण्यात आली. वडिलांच्या अस्थिमज्जा (स्टेम सेल्स) दानातून आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाच्या पुढाकाराने गोळा झालेल्या आर्थिक मदतीतून प्रकाशवर यशस्वी बोन मॅरो प्रत्यारोपण करण्यात आले.
प्रकाशप्रमाणेच समाजातले इतरही अनेक गरीब व गरजू रुग्णांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार उपचार होत आहेत. पैशाअभावी कोणाचेही उपचार थांबणार नाहीत, या भूमिकेतून कक्ष मदतीसाठी तत्पर आहे. रूग्ण व नातेवाईकांनी घाबरून/गोंधळून न जाता जिल्ह्याच्या ठिकाणी असणाऱ्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाशी किंवा 1800 123 2211 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन रामेश्वर नाईक यांनी केले आहे.

