Homeहेल्थ इज वेल्थवडिलांच्या स्टेम सेल्समुळे...

वडिलांच्या स्टेम सेल्समुळे वाचले 9 वर्षीय मुलाचे प्राण

महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या 9 वर्षीय मुलाला कर्करोग झाल्यामुळे त्याच्यावर बोन मॅरो ट्रान्सप्लांट करणे आवश्यक होते. परंतु उपचाराचा खर्च कुटुंबाला परवडणारा नव्हता. या संकटाच्या काळात त्याच्या वडिलांनी मुलाला स्टेम सेल्स देऊन त्याचे प्राण वाचवले, तर आर्थिक मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाने पुढाकार घेतला.

प्रकाश (नाव बदलले आहे) हा 9 वर्षीय मुलगा आपल्या आई-वडिलांसह आणि 12 वर्षीय मोठ्या बहिणीसोबत कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील एका गावात राहतो. वडील एका खाजगी फायनान्स कंपनीत काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. काही महिन्यांपासून प्रकाश सतत आजारी पडत होता. प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्याला पुढील तपासणीसाठी कल्याण येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे तपासणीतून प्रकाशला कर्करोग असल्याचे आढळून आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारासाठी बोन मॅरो प्रत्यारोपणाचा सल्ला दिला. त्याचप्रमाणे उपचारासाठी सुमारे 25 ते 30 लाख रुपये खर्चाचा अंदाज वर्तविला. या परिस्थितीत डॉक्टरांनी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून आर्थिक मदत घेण्याचा सल्ला त्यांना दिला.

प्रकाशच्या पालकांनी पुढच्या उपचारासाठी मुंबईमधले वाडिया हॉस्पिटल गाठले. त्यासोबतच आर्थिक मदतीसाठी  मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षात धाव घेतली. तेथे त्यांनी कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांच्याशी संपर्क साधला. नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार तातडीने कार्यवाही केली. त्यातूनच वाडिया रुग्णालयात प्रकाशवर उपचार सुरू करण्यात आले. मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या पुढाकारातून, टाटा ट्रस्टच्या मोठ्या योगदानातून तसेच काही सामाजिक संस्थांच्या सहकार्याने एकूण 29 लाखांची मदत उभी करण्यात आली. वडिलांच्या अस्थिमज्जा (स्टेम सेल्स) दानातून आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाच्या पुढाकाराने गोळा झालेल्या आर्थिक मदतीतून प्रकाशवर यशस्वी बोन मॅरो प्रत्यारोपण करण्यात आले.

प्रकाशप्रमाणेच समाजातले इतरही अनेक गरीब व गरजू रुग्णांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार उपचार होत आहेत. पैशाअभावी कोणाचेही उपचार थांबणार नाहीत, या भूमिकेतून कक्ष मदतीसाठी तत्पर आहे. रूग्ण व नातेवाईकांनी घाबरून/गोंधळून न जाता जिल्ह्याच्या ठिकाणी असणाऱ्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाशी किंवा 1800 123 2211 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन रामेश्वर नाईक यांनी केले आहे.

Continue reading

सयाजी नगरी एक्सप्रेस ठरली मुंबईतली पहिली ‘कवच’धारी गाडी!

पश्चिम रेल्वेने विरार-बडोदा विभागात अपघातापासून बचाव करणारी ‘कवच 4.0’ प्रणाली कार्यान्वित केली आहे. गाडी क्रमांक 20907 दादर–भूज सयाजी नगरी एक्सप्रेस, ही मुंबईतून सुटणारी कवच प्रणालीने सुसज्ज असलेली पहिली गाडी ठरली आहे. या गाडीवर हे सुरक्षा कवच बसवण्यात आले आहे....

17 मार्चला मुंबईत टपाल पेन्शन अदालत

मुंबईच्या मुख्य पोस्टमास्टर जनरल, महाराष्ट्र परिमंडळ यांनी टपाल विभागातल्या निवृत्तीवेतनधारक आणि कुटूंब वेतनधारकांसाठी येत्या 17 मार्चला सकाळी साडेअकरा वाजता टपाल पेन्शन अदालतीचे आयोजन केले आहे. मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र परिमंडळ यांच्या कार्यालयात ही पेन्शन अदालत घेतली जाईल. महाराष्ट्र आणि...

तत्काळ पासपोर्टसाठी पुण्यात 7 तारखेला विशेष मोहीम

पुण्यातल्या प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाने तत्काळ श्रेणीतल्या अर्जदारांसाठी पुण्याच्या पासपोर्ट सेवा केंद्रात येत्या शनिवारी, 7 फेब्रुवारीला विशेष पासपोर्ट मोहिमेचे आयोजन केले आहे. पासपोर्टसाठी अपॉइंटमेंट लवकर मिळवून देण्यासाठी आणि तातडीच्या प्रवासाची गरज असलेल्या नागरिकांना पासपोर्ट सेवा पुरवण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या पुढाकाराने हा...
Skip to content