Homeब्लॅक अँड व्हाईटपाडायला घेतलाय अमिताभच्या...

पाडायला घेतलाय अमिताभच्या पिक्चरसाठी खास असलेला ‘अलंकार’!

आपल्या देशातील चित्रपट संस्कृतीतील अनेक गोष्टी अनुभवण्यासारख्या. त्या खूपच रंजक. विशेषतः एकपडदा अर्थात सिंगल स्क्रीन थिएटर्स आणि लोकप्रिय चित्रपटाचा. त्यातील काहींचा कधी पंचवीस तर कधी पन्नास आठवड्यांचा (कधी त्याहीपेक्षा जास्त) मुक्काम. आणि त्यात काही जणू विक्रम ठरले. दक्षिण मुंबईतील अलंकार चित्रपटगृह‌ व अमिताभ बच्चन हेदेखील असेच सुपरहिट नाते. अलंकारला जावे तर बच्चनचा मसालेदार पिक्चर एन्जॉय करायला.. काही वर्षांपूर्वी बंद झालेल्या या चित्रपटगृहाची इमारत आता पाडायला घेतलीय, म्हणून हा विशेष फोकस.‌

खेतवाडी परिसरातील हे चित्रपटगृह. खेतवाडी, कुंभारवाडा, गिरगाव, प्रार्थना समाज, भुलेश्वर या परिसरातील चित्रपटरसिकांना हे अगदी जवळचे. अमिताभपटाचे चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेले प्रगती पुस्तकच बघा. एस. रामनाथन निर्मित व दिग्दर्शित “बॉम्बे टू गोवा” (१९७२)चे रौप्य महोत्सवी यश. रमेश सिप्पीने “शोले”साठी अमिताभला साईन करण्यापूर्वी त्याचा फक्त हाच चित्रपट पाहिला होता, असे त्यांनीच एका मुलाखतीत सांगितले आहे. प्रकाश मेहरा निर्मित व राकेश कुमार दिग्दर्शित “खून पसिना”चे (१९७७) शंभर दिवसांचे यश. प्रकाश मेहरा निर्मित व दिग्दर्शित “मुकद्दर का सिकंदर”चा (१९७८) पन्नास आठवड्यांचा खणखणीत सुपरहिट मुक्काम.‌ या‌ यशात विनोद खन्नाही वाटेकरी. प्रकाश मेहरा निर्मित व दिग्दर्शित “लावारीस”चाही (१९८१) पन्नास आठवड्याचा मुक्काम. अमिताभ फुल्ल फॉर्मात. प्रकाश मेहरा निर्मित व दिग्दर्शित “नमक हलाल”चाही (१९८२) चाही असाच सहज वाटावा असा पन्नास आठवड्यांचा मुक्काम.‌ हा चित्रपट म्हणजे अमिताभ बच्चन वन मॅन शो होता. अमिताभ वन मॅन इंडस्ट्री झाला होता. मनमोहन देसाई दिग्दर्शित “कुली”चा (१९८३) पन्नास आठवड्यांचा मुक्काम. कुली अनेक कारणास्तव चर्चेत होताच. अमिताभचा याच चित्रपटाच्या बंगलोर येथील सेटवरचा अपघात गाजला.

के. सी. बोकाडिया निर्मित व दिग्दर्शित “आज का अर्जुन”चा ( १९९०) रौप्यमहोत्सवी, पंचवीस आठवड्याचा मुक्काम. या दिवसात अमिताभला सुपरहिट चित्रपटाची गरज होती. ऐंशीच्या दशकातील उत्तरार्ध अमिताभला बराच आव्हानात्मक होता. चित्रपट फ्लॉप होत होते. राजकारणात अपयश आले होते. एक चित्रपटगृह, एक कलाकार आणि असे यश कौतुकास्पद. महाविद्यालयीन विद्यार्थी म्हणून मी शिकत असताना आम्हा मित्रांना अमिताभचा धमाकेदार चित्रपट पाहावासा वाटला रे वाटला की, अलंकार चित्रपटगृहाची आठवण येई. आणि त्याचा पिक्चर हमखास हाऊसफुल्ल असल्याने काळ्या बाजारात तिकीट घेण्याची आर्थिक तयारी ठेवायचो. खरंतर त्या काळात अशा पद्धतीने ब्लॅक मार्केटमध्ये पिक्चरचं तिकीट काढणे हे मध्यमवर्गीय कुटुंबात चुकीचे मानले जात असे. असे तिकीट घेताना कोणी पाहिलं तर.. अशी सामाजिक भीतीदेखिल असे. पण अमिताभवरील प्रेमाखातर तेदेखील करीत असू.

लावारीसच्या वेळी अलंकारला बाल्कनीचे तिकीट सहा रुपये, अप्पर स्टॉलचे पाच रुपये व स्टॉलचे चार रुपये, असे होते. तेव्हा खिशात तिकीटापुरते पैसे असत. ते घट्ट धरुन ठेवायची सवय लागली होती. “लावारीस”च्या वेळचा अनुभव सांगितलाच हवा. अमिताभ बच्चनने गायलेले आणि वेगवेगळ्या स्त्री रुपात साकारलेल्या मेरे अंगमे तुम्हारा क्या काम है.. पडद्यावर सुरू होताच हाऊसफुल्ल गर्दीतील पब्लिक प्रचंड टाळ्या-शिट्ट्यांनी थिएटर डोक्यावर घेऊन ते एन्जॉय करणार हे ठरलेले. या लोकप्रिय गीत, संगीत आणि नृत्यासाठी अनेक फिल्मी दिवाने पुन्हापुन्हा थिएटरची वारी करत. रिपीट प्रेक्षक खूप महत्त्वाचा असतो.‌ तो टिकावा व वाढत वाढत राहावा. काही हौशी प्रेक्षक या गाण्याच्या वेळेस पडद्यावर नाणी उडवत.

आपल्या देशात चित्रपट पाहणे हे एकप्रकारचे सेलिब्रिशन असते. आणि अशाच फिल्मी दिवान्यांनी आपल्या देशात चित्रपट रुजवला, वाढवला, जगवाला.‌ त्यानंतर प्रयोगशीलता वगैरे.. वगैरे.. येते. पटेल न पटेल. अलंकार चित्रपटगृह व अमिताभ बच्चन यांचे घट्ट नातेसंबंध हे असे. त्याचे आणखी काही चित्रपट येथे प्रदर्शित झाले. पण आपण यशाकडे पाहावे. असेच आणखी एक भारी उदाहरण, सत्तर व ऐंशीच्या दशकातील रॉक्सी चित्रपटगृह व राजेश खन्नाच्या चित्रपटांंचे आहे. त्यावर कधीतरी फोकस. म्हटलं ना, आपल्या देशातील चित्रपटरसिकांची व जुन्या काळातील अनेक चित्रपटगृहांची संस्कृती जगावेगळी आहे म्हणून!

Continue reading

‘आलिया’ भोगासी…

जे तुम्हाला दिसत होते, जे सर्वांच्या समोर होते, ते कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील रेड कार्पेटवरील जगभरातील अनेक देशांतील अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त कॅमेरा हाती असलेल्या मीडियातील फोटोग्राफर्स, पाप्पाराझी, इन्फ्लुअन्सर यांना दिसलं नाही? आणि त्या गर्दीला जे दिसले नाही, त्याचीच बातमी झाली....

राजेश खन्नाच्या मर्जीमुळे डब्यात गेली ‘नौकरी’!

काळ बदलला.. अनेक गोष्टी बदलल्या... संदर्भ, तपशील बदलले. एकेकाळी एखादा चित्रपट काहीना काही कारणास्तव रखडला रे रखडला की, पब्लिकचा त्या चित्रपटातील रस उतरत, घसरत, संपत जात असे आणि असा एखादा चित्रपट पडद्यावर येई तो उतरण्यासाठीच! अशी उदाहरणे अनेक आहेत....

आमिर खानकडून दादासाहेब फाळके चरित्रपट तूर्त स्थगित

निर्माता म्हणून आमिर खान प्रयोगशील आहे. व्यावसायिक चौकट, मनोरंजनमूल्य प्रभावी ठेवत वेगळा विषय रुपेरी पडद्यावर आणतो हे त्याच्या आमिर खान प्राॅडक्शनच्या आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित 'लगान' (२००१)च्या वेळीच दिसून आले. 'लगान'ला ऑस्करच्या स्पर्धेत विदेशी चित्रपट विभागात नामांकन मिळाले आहे आणि...
Skip to content