“निचली जात है ससूरे.. तुम्हारी हिमंत कैसे हुई, बारात निकालनेकी.. ** मस्ती आवे क्या? चलो सथी, ये बारातीयोंकी जमके मारो..” हा डायलॉग काही कुठल्या वेबसिरीजमधला नाही. परंतु असं घडलंय मात्र नक्की!! तेही उत्तर प्रदेशमधील मथुरा (तेच ते अब मथुरा बाकी है.. मधले) जिल्ह्यातील बुरेखा गावातील. घटनाही फार जुनी नाही. 22 मे 2025ची! जवळजवळ दीड महिना जुनी. परंतु जखम अजून भलभळतेय. आक्रमक जाट समुदायासमोर गरीब बापुढे दलित अजूनही नवरा-नवरीच्या प्राणांची भीक मागतायत. उत्तर प्रदेशचे हे सामाजिक दृश्य थरकाप उडवणारे आहे यात शंकाच नाही आणि तेही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राज्यातील.. तेच हल्ली सांगत असतात की, काही वर्षांतच सर्वजण उत्तर प्रदेशात यायला रांगा लावतील!!
22 मे रोजी मुनीश देवी (50) यांची मुलगी कल्पना हिचा विवाह अलिगढच्या आकाश (21) युवकाशी झाला. विवाह सोहळ्यानंतर बारात काढायची ठरले. बारातीतील घोड्याचा रथ सजवण्यात आला. जोडीला डीजेवर सपना चौधरीची थिरकवणारी गाणी लागली हॊती. मनात असो-नसो सर्वच बारातींचे पाय थिरकायला लागले होते. दलित समाजातील लग्न, त्यात बारात व तिथेही डीजे आणि नाचगाणे… हे दृश्य पाहून जाट समुदाय रागाने लालबुंद झाला नसता तरच नवल! झाले.. जाट युवक बारातीत घुसले. त्यांनी रथावरील नवरा मुलाला म्हणजे आकाशला खाली खेचला. ‘भोसडीवाले हमारे सामने बारात निकालानेकी सोची कैसी तुने? तुम्हाला माज आलाय, आम्ही हे चालू देणार नाही. बारात बिरात कुछ नही, जान बक्षी है, चुपचाप घर जाव..” नंतर थोडी हातापायीही झाली. काहीजण जखमीही झाले. नवऱ्या-नवरीकडील ज्येष्ठानी आपापसात विचारविनिमय केला व बारात तिथेच विसर्जित करून टाकली. बारातीपेक्षा नवरा-नवरीचा तसेच बाराती मंडळींचा जीव महत्त्वाचा असे मनाशी बोलून त्यांनी व्यवहारीपणे नमते घेतले. नंतर याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर नोंदवून घेतला असून सहा जणांना अटकही केली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सन 2022मध्ये उत्तर प्रदेशात 15 हजारांहून अधिक गुन्हे आट्रोसिटी कायद्याखाली नोंदवण्यात आल्याचे नॅशनल क्राईम रेकॉर्डच्या अहवालात नमूद केले गेले आहे. (23/24 अहवाल अपेक्षित आहे.) दरम्यान राज्यात इतर ठिकाणीही दलितांवरील वरिष्ठ जातीनी केलेल्या अत्याचाराच्या अनेक तक्रारी नोंदवण्यात आल्या असून तपासात मात्र म्हणावी तशी प्रगती झालेली नाही असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सूचित केले. आकाश-कल्पनाचा विवाह झाल्यानंतर लगेचच त्याच गावातील राम खिलाडी (50) यांच्या मुलीचा विवाह राजस्थानमधील पालीवालमध्ये होणार होता. तो झालाही. परंतु रामजींनी मुलीची ‘बारात’ काढलीच नाही. बुरेखा गावातील मुखीया भावेश शर्मा हा ब्राह्मण समाजातील असून त्यांनी या बारातप्रकरणी दलितांना काहीच मदत केली नसल्याचा आरोप दलित तरुणांनी केला.
बारात प्रकरण येथेच थांबले नाही. 21 जुन रोजी इटाह जिल्ह्यातील धाकपुरा गावात आरती कुमारी व विकास सिंग यांचा विवाह संपन्न झाला. त्यांची बारात जाटबहुल वस्तीतून जाताना दगडफेक केली गेली आणि दमदाटी तर फ्रीच होती. अखेर पोलीस बंदोबस्तात बारात काढण्यात आली. या परिसरात जाट समुदायची इतकी दहशत आहे की दलित तरुण साध्या मिशाही ठेवू शकत नाहीत. या बारातप्रकरणी अधिक बोलताना अकोला (आग्रा) येथील बँडवाले पुष्पेंद्र चाहरा म्हणाले की, आम्ही हल्ली जाटबहुल वस्तीतून बारात घेऊनच जात नाही. आम्ही गडबडीचा रस्ताच बदलतो. जाट समुदायच केवळ आमच्या बारातीला विरोध करतो असे नाही, यादव समुदायही यात आघाडीवर आहे. आमरोहा जिल्ह्यातील रेहाद्रा गावातील एका शिंप्याच्या मुलींच्या विवाहसोहळ्याप्रसंगीही यादव समुदायानेही बारात काढण्याला विरोध केला होता. कशीबशी बिदाई केली असे त्या शिंप्याने सांगितले. याप्रकरणीही पोलिसांनी कारवाई केली.
येत्या काही दिवसात वा महिन्यांत काही राज्यांच्या व महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांनाच्या (महापालिका, नगर परिषदा) निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. तेथे या उत्तर प्रदेशातील प्रमुख नेते राजकीय भाषणबाजी करायला येतीलच. तेव्हा त्यांना याप्रसंगी कोणी जाब विचारणार की नाही? “छुतीही जेवन, छुतीही अचवन, छुतीही जग उपजाया। कहे कबीर ते छुती विवरजीत, जाके संग न माया।।” एवंमच छुताछूत निरर्थक आहे हे खुद्द कबीरजींनी सांगितले असताना उत्तर प्रदेश अजून मागेच कसा? आणि हाच अपमान टाळण्यासाठी उत्तर प्रदेशातून हजारोंच्या झुंडी परराज्यात जात आहेत हे राज्यकर्त्यांना कधी समजणार?
(मूळ बातमी दैनिक हिंदूमधील.)