Skip to content
Homeएनसर्कलकाय करू शकते...

काय करू शकते एक ग्रॅम मीठ?

तू मला मिठासारखी आवडते असे सांगून मिठाची महानता जगाला पटवून देणारी पुराणातली कथा सोडून दिली तरी आजही एखाद्या पदार्थात मीठच नसेल तर तो पदार्थ कितीही श्रम करून बनवला गेला असला तरी त्याला चविष्ट म्हणता येत नाही. आहारातील मीठ तर कायम वाढत्या रक्तदाबाची सूचना आपल्याला देत असते. रक्तदाब वाढला की त्यातून अनेक मोठे विकार होऊ शकतात ही भीतीही मीठ या सहज मिळणाऱ्या पदार्थामधून दाखवली जाऊ शकते हे आणि ही भीती दोन्ही खरेच आहेत. या संबंधात अलीकडेच झालेले संशोधन आणि त्याचे निष्कर्ष यामधून विज्ञानाने यावेळी मिठाची मात्रा म्हणजे साधारण वजन आणि माणसाचे आरोग्य यांचा प्रत्यक्ष संबंध यांचा खुलासा केला आहे.

आरोग्याच्या माहितीसाठी या संशोधनात सुरुवातीला चीन हा देश निवडला गेला. तेथे असे दिसले की आहारातील केवळ एक ग्रॅम मीठ कमी केले गेले तर या अतिशय सोप्या उपायामुळे आजपासून २०३०पर्यंतच्या काळात विविध हृदयरोगांमुळे होणारे किमान ९० लाख मृत्यू वाचवता येतील. यापैकी ४० लाख रोगी हे कदाचित धोक्याच्या छायेत असू शकतील. या अभ्यासासाठी चीन निवडला गेल्याचे कारण असे दिसते की जेथे जागतिक आरोग्य संघटनेने रोजच्या एका आहारातील मीठ ५ ग्रॅम असावे अशी शिफारस केली आहे. तेथे चिनी माणसाच्या प्रत्येक आहारातील सरासरी मीठ ११ ग्रॅम आहे. भारतातील परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही. २०२३मधील माहितीनुसार येथेही मिठाचे आहारातील प्रमाण १० ते १२ ग्रॅम असेच असल्याचे दिसले. याचा अर्थ दरवर्षी माणशी ३.६ किलोग्राम ते ४.४ किलोग्राम मीठ आपल्यापैकी अनेकांच्या आहारात असते. मोठ्या आजारांना निमंत्रण देणारी ही बाब आहे.

भारताने यासंदर्भात काही पावले उचलली असून त्यामधून २०२५पर्यंत मीठ वापराचे प्रमाण किमान ३० टक्के कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. देशोदेशीचे मिठाचे प्रमाण पाहिले तर ते प्रत्येक देशात वेगवेगळे असते. त्यापेकी अधिक सधन देश असतात. आहारातील बहुतेक मीठ हे प्रक्रिया केलेल्या अन्नातून आलेले असते. कारण या अन्नाचा वापर अधिक होतो. याउलट मध्यम आणि कमी उत्पन्न गटाच्या देशांमध्ये आहारातील बहुतेक मीठ अन्न तयार करताना घातलेले मीठ असते. पश्चिमी देशांच्या अनुकरणातून आज भारतातील अनेक घरांमध्ये बाहेरून जेवणाचे पदार्थ मागवण्याची पद्धत रूढ झाली आहे. यात प्रक्रिया केलेले अन्न असतेच, त्याशिवाय बाहेर जे पदार्थ शिजवले जातात त्यात मुळातच मीठ थोडे अधिक टाकण्याची पद्धत असते. परिणामी या आहारातून मिठाचे प्रमाण वाढते.

आहारात सर्वाधिक मीठ असणाऱ्या ५० देशांमध्ये भारताचेही नाव आहे. जागतिक आरोग्य संघटनेने प्रकाशित केलेल्या एका अहवालात समतोल पोषणावर भार दिला असून कमी प्रतीच्या आहारामुळे होणाऱ्या संभाव्य मृत्यू संख्येबद्दल काळजी व्यक्त केली आहे. सोडियम या मूलद्रव्याऐवजी पोटॅशियम असणारे मीठ कमी उपद्रवी असते. त्याचा उपयोग करायला हवा.
‘मर्यादित मिठाचे कारण, आरोग्याचे रक्षण’ अशी एक नवी म्हण तयार करावी आणि त्यावर अंमल करावा असे वाटते.

Continue reading

दोन बापांच्या उंदराला पिल्ले…

या जगातले विज्ञान आजचे कोणतेही आश्चर्य प्रत्यक्षात घडवून आणते, हे जरी खरे असले तरी ‘दोन बापांचा’ ही मराठीत चक्क शिवी समजली जात असताना माणसाच्या दीर्घायुषी जीवनासाठी जे काही संशोधन होत आहे त्यासाठी उंदीर हाच प्राणी वापरला जातो. याचेही कारण...

आता अवकाशात भ्रमण करणार माणसाच्या अस्थी!

माणसाचे मन फार विचित्र आहे. त्याला एखादी गोष्ट ‘भावली’ की त्याच्यासाठी तो वाट्टेल ते करायला तयार होतो. इतकेच नव्हे तर आपल्या मुलाबाळांना पढवून ठेवतो की, माझे जेव्हा केव्हा बरेवाईट होईल त्यानंतर तुम्ही माझ्यावर अंत्यसंस्कार तर करालच, पण मी आजच्या...

आता होणार खग्रास सूर्यग्रहणही कृत्रिम!

काय काय कृत्रिम होणार कुणास ठाऊक? बुद्धिमत्ता कृत्रिम झाली. माणसेही कृत्रिम रीतीने तयार होण्याची सुरुवात झाली आहे... आता विज्ञानाचा रोख थेट सूर्यापर्यंत पोहोचला आहे. “सूर्यग्रहणाची वाट कशाला बघायची? आम्ही विज्ञानाची करामत करून केवळ दोन उपग्रह अवकाशात सोडणार आणि सूर्यग्रहण होईल......