Homeहेल्थ इज वेल्थहिवतापमुक्त मुंबईसाठी परिसंवादामार्फत...

हिवतापमुक्त मुंबईसाठी परिसंवादामार्फत जनजागृती

मुंबईला हिवतापमुक्त करण्यासाठी जनजागृती करतानाच नागरी सहभाग वाढवण्यासाठीचे विशेष प्रयत्न बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहेत. जागतिक हिवताप दिनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेमार्फत नायर दंत रूग्णालय आणि महाविद्यालय येथे नुकतेच हिवताप प्रतिबंधक उपाययोजना, उपचार, मार्गदर्शन तसेच मलेरिया निर्मूलन या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.

हिवताप नियंत्रण करण्यासाठी डासांची उत्पत्तीस्थाने प्रतिबंध करणे, तसेच पालिकेचे दवाखाने, रुग्णालये येथे तापाच्या रुग्णाकरिता आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अतिरिक्त पालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी केले आहे.

मलेरिया

नायर दंत रूग्णालय आणि महाविद्यालय येथे पार पडलेल्या परिसंवादासाठी संचालक, वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये तथा अधिष्ठाता (नायर दंत महाविद्यालय) डॉ. नीलम अन्द्राडे, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. जयंती शास्त्री, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मलेरिया रिसर्च संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. श्रीनिवास बी. एम., सेठ गोकुलदास शामल वैद्यकीय रूग्णालय आणि राजे एडवर्ड स्मारक रूग्णालयाच्या प्राध्यापिका डॉ. कविता जोशी,  बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कीटक नियंत्रण अधिकारी चेतन चौबळ, मुंबई शहर (इंडियन मेडिकल असोसिएशन) अध्यक्ष डॉ. लाड आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

हिवताप (मलेरिया) प्रसारसाखळी तोडण्यासाठीच्या संशोधनावर अधिकाधिक भर देण्याची गरज आहे. हिवताप नियंत्रणाकरिता उपचार कालावधी कमी करण्यासाठी जागतिक पातळीवर संशोधन होत आहे. त्यामुळे उपचार कालावधी कमी करण्यासाठी भारतातही त्याच उद्देशाने प्रयत्न व्हायला हवेत. तसेच वैद्यकीय चाचण्यांवर भर देण्याची गरज असल्याचे मत डॉ. श्रीनिवास बी. एम. यांनी मांडले.

यावर्षीच्या जागतिक हिवताप दिनाचे घोषवाक्य “हिवताप निर्मूलन:  हिवतापाविरुद्ध जगाच्या संरक्षणासाठी, गतिमान करूया लढा हिवतापाला हरविण्यासाठी’ असे आहे. त्यामुळे मुंबईला हिवतापमुक्त करण्याच्या वचनबद्धतेबद्दल समाजातील सर्व घटकांनी एकत्र प्रयत्न केल्यास आपण त्यात यशस्वी होऊ, असे मत डॉ. नीलम अन्द्राडे यांनी मांडले.

यावेळी डॉ. दक्षा शहा म्हणाल्या की, हिवतापाच्या रुग्णांनी वेळीच उपचार तसेच वैद्यकीय सल्ला घ्यावा. खासगी डॉक्टरांनी हिवतापाचा रुग्ण आढळल्यास संबंधित विभागीय आरोग्य अधिकाऱ्यांना संपूर्ण माहितीसह त्वरित कळविणे गरजेचे आहे. हिवताप (मलेरिया) तपासणीस (इन्वेस्टीगेटर) व आरोग्य कर्मचारी यांनी वस्तीपातळीवर सातत्याने गृहभेटी देऊन सर्वेक्षण करावे. रुणांनी हिवतापाचे उपचार अर्धवट सोडू नये. संपूर्ण उपचार घ्यावे. घरात व घराच्या आसपास पाणी साचू न देणे. डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करणे यावर नागरिकांनी भर द्यावा.

प्राध्यापिका डॉ. कविता जोशी यांनी हिवतापाच्या निमित्ताने वैद्यकीय पैलू, अभ्यास प्रकरपण (केस स्टडी) आणि शासकीय / राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांसह विविध उपचारांवर चर्चा केली तसेच मूलगामी उपचारांची गरज आणि प्रयोगशाळेतील निदान बळकट करण्याच्या महत्त्वावर भर दिला. चेतन चौबळ यांनी मुंबईतील डासांच्या उत्पत्ती नियंत्रणाच्या उपाययोजनांविषयी आणि समुदाय जागरूकता यावर लक्ष केंद्रित केले.

Continue reading

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...

म. गांधीजींच्या गावातच गुजरात सरकारकडून मद्यविक्रीला परवानगी!

महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये इतिहासात पहिल्यांदाच गुजरात सरकारकडून, एका आलिशान हॉटेलला मद्यविक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. गुजरात राज्य उत्पादन शुल्क आणि प्रतिबंध विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात वादाला तोंड फुटले असून, गांधीवादी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी याविरोधात...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी पूर्णपणे डिजिटल, जुनी पद्धत बंद!

कल्पना करा, तुमच्या कुटुंबातील एखाद्या गरीब रुग्णाला महागड्या उपचाराची गरज आहे. पूर्वीच्या काळात नातेवाईकांना मंत्रालयापर्यंत धावपळ करावी लागायची, कागदपत्रांची रास भरावी लागायची, दलालांच्या जाळ्यात अडकावे लागायचे आणि उपचारात विलंब होऊन रुग्णाची स्थिती बिघडायची. पण आता ती सगळी कहाणी संपली!...
Skip to content