Homeएनसर्कलखरंच राज्यसभा निवडणूक...

खरंच राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार?

महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी निवडल्या जाणाऱ्या सहा जागांसाठी आज सत्ताधारी तसेच विरोधकांकडून फक्त सहाच उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे हे सर्व उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची शक्यता आहे. उमेदवारी दाखल करण्याच्या आज अखेरच्या दिवशी अखेरच्या क्षणाला जगताप नावाच्या पुण्यातल्या एका पत्रकाराने अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे छाननीच्या दिवशी ही निवडणूक बिनविरोध होणार की नाही हे स्पष्ट होणार आहे.

दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचा हात सोडून भाजपात दाखल झालेले अशोक चव्हाण, पुण्यातल्या माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि नांदेडचे अजित गोपछडे यांनी विधान भवनात भारतीय जनता पार्टीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केले. साडेचार वर्षांची मुदत शिल्लक असताना राष्ट्रवादीतल्या फुटीमुळे तांत्रिक अडचण टाळण्यासाठी प्रफुल्ल पटेल यांनी सध्याच्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत राष्ट्रवादीच्या वतीने पुन्हा उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेनेच्या वतीने अलीकडेच पक्षात दाखल झालेले काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेकऱ बावनकुळे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आदी नेते यावेळी उपस्थित होते.

काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात तसेच पक्षाचे बहुसंख्य आमदार यावेळी उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल करायची वेळ संपत असतानाच जगताप यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज वैध ठरण्यासाठी त्यावर किमान दहा आमदारांच्या स्वाक्षऱ्या असणे आवश्यक आहे. अर्जाच्या छाननीत हे पाहिले जाईल. हा अर्ज वैध ठरल्यास काँग्रेसच्या हंडोरे यांच्या निवडीला धोका निर्माण होऊ शकतो. विधान परिषद निवडणुकीतही ऐनवेळी क्रॉस व्होटिंग झाल्यामुळे हंडोरे यांचा पराभव झाला होता.

Continue reading

इराणचे प्रमुख खामेनेई ठार, पुत्र मोजतबा उत्तराधिकारी!

गेल्या काही दिवसांपासून तोंडी असलेला अमेरिका-इराण संघर्ष आता प्रत्यक्षात उतरला. काल सकाळी अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्त कारवाई करत इराणच्या सर्व प्रमुख ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले. इराणच्या सहा शहरांवर हल्ले करण्यात आले. यात इराणचे प्रमुख नेते तसेच परमाणू केंद्रांना लक्ष्य करण्यात...

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...
Skip to content