पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात देशातील सर्वोच्च अशा राष्ट्रपतीपदावर द्रौपदी मुर्मू यांच्या रूपाने एक आदिवासी परिवारातील सुपुत्री विराजमान झाली. यामुळे आदिवासी समाजाचा बहुमान वाढला. मोदींच्या कार्यकाळात आदिवासी समाजातील बंधू-भगिनींना आपल्या हक्काचे जमिनींचे पट्टे मिळाले. येत्या काळात उर्वरित 5000 पट्ट्यांचे वाटप होईल, अशी ग्वाही भारतीय जनता पार्टीचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.

नंदुरबार लोकसभेच्या भाजपा उमेदवार डॉ. हिना गावित यांच्या प्रचारार्थ शिरपूर, धुळे येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. आ. अमरिश पटेल यांच्या प्रयत्नांनी दुष्काळावर मात करण्यासाठी शिरपूरमध्ये पाण्याचे नियोजन झाले व शिरपूर पॅटर्न तयार झाला. संपूर्ण महाराष्ट्राने हा पॅटर्न स्वीकारला आणि यामुळे शेतीमध्ये पाणी पोहोचून अनेक भाग दुष्काळमुक्त झाले. शिरपूर शिक्षणाचे हब झाल्यामुळे धुळे व नंदुरबार जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांना येथे शिक्षण मिळाले. आदिवासी समाजातील युवक-युवतींना उच्चशिक्षण मिळावे यासाठी अमरिशभाई यांनी मोलाचे कार्य केले, असेही ते म्हणाले.

या भागात अनेर धरणाचे पाणी कालव्याच्या माध्यमातून मिळणे, अरुणावती नदीवर 5 बंधारे बांधणे आणि शिरपूरमध्ये एमआयडीसी सुरु करणे अशा सर्व विकासकामांबद्दल राज्य सरकारद्वारे प्रयत्न केले जातील. मजबूत भारताच्या निर्मितीसाठी नंदुरबारची जनता मोदींच्याच मागे उभी राहील. डॉ. हिना गावित यांचे लोकसभा सदस्य म्हणून केलेले काम लक्षात घेण्यासारखे आहे, असेही फडणवीस म्हणाले.
यावेळी आ. अमरिश पटेल, आ. राजेश पाडवी, आ. काशिराम पावरा, आ. आमश्या पाडवी, आ. मंजुळा गावित, विजया रहाटकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.