Details
राजकारण बदलणारी निवडणूक!
24-May-2019
| 0
”
विनय गजानन खरे, ज्येष्ठ पत्रकार
kharevinay196509@gmail.com
देशभरात १७ व्या लोकसभेसाठी झालेल्या निवडणुकीत मतदानोत्तर चाचणीपेक्षा कितीतरी अधिक जागा भाजपच्या वाट्याला येत आहेत. काही राज्यात सत्ता गमवूनही तिथे दणदणीत यश मिळालं आहे तर उ प्रमध्ये सपा-बसपामुळे मोठा फटका बसेल असा अंदाज असताना तिथेही नि महाराष्ट्रात ३०-३४ चा अंदाज असताना ४० च्या पुढे उडी गेलीय. मात्र, असं असलं तरी भविष्यातील देशाच्या राजकारणात फार मोठे बदल होऊ घातलेत असं म्हंटलं जातं. भाजपची एकहाती सत्ता परत लोकांनां सतावणार की लोकहिताचे निर्णय घेऊन अंमलबजावणी करणार हा औत्सुक्याचा विषय असेल.
कलचाचणीत आलेल्या अनुमानाची खिल्ली उडवणाऱ्या लोकांची तर निकाल पुढे सरकत असताना दातखिळीच बसलेली पाहयला मिळाली. याआधी अनेक विरोधी पोस्ट टाकणाऱ्यांच्या हातात भर उन्हाळ्यात थंडीने यावी तशी बधिरता आलेली दिसत होती. पोस्टचं टाकणं बंद झालं होतं. लाडूवाटप नि दुष्काळाचा संबंध जोडत भाजपच्या आनंदावर विरजण घालण्याचा प्रयत्न काहींनी करून पहिला. दुष्काळ आहे हे खरेच पण कोणी आनंद साजरा करूच नये का? की उलट अधिक जोमाने कामं करा हे बजावलं पाहिजे नि पाणी, पाऊस कसे हो सरकार पाडणार? कोणी विचार करण्याच्या मनःस्थितीतीच नाही.
मध्य प्रदेश, कर्नाटक, राजस्थानात गेल्या वर्षी सत्ता आल्याने येथे भाजपचा सुपडासाफ होणार या अविर्भावात असलेल्या विरोधी नेत्यांना दाती तृण धरण्याची पाळी लोकांनी आणलीय. ममता राज्यात भाजपने घेतलेल्या जागा पाहता ही मोदी-शाह नेतृत्त्वात ऐतिहासिक कामगिरीच म्हणावी लागेल. अमित शाह यांच्या रोड शोवेळी झालेल्या हिंसाचाराने त्यांना प्रचार वीस तास आधीच थांबवावा लागला होता. उ प्रत मुख्यमंत्री योगींना जेरीस आणण्याची भाषा करणाऱ्या बुआ-भतीजाला रोखण्यात यश आल्याने ते खुश आहेत, महागठबांधनासाठी धावपळ करणाऱ्या चंद्राबाबू नायडू यांना तर धरणी फाटून पोटात घेईल तर बरे असं मनात म्हणायची वेळ या निकालाने आणलीय.
मोठ्या प्रमाणात भाजपला कौल देणाऱ्या चाचण्या “तयार” करून घेतल्याचं पसरवण्यात आलं. काहींनी घरबसल्या चाचण्या केल्याचं भरभरून लिहिलं. काहीही असो, देशाने कौल तर दिलाय. एकूणच पाहता ज्या अपेक्षेने काँग्रेस मैदानात उतरली त्याला लोकांनी साथ दिली नाहीये. मात्र, स्थानिक पक्ष भाजपला काही प्रमाणात टक्कर देण्यात यशस्वी झालेले दिसतात. समोरासमोरच्या लढाईत त्या तयारीने काँग्रेस लढली नाही असं लोकांना वाटतं. भ्रष्टाचाराचे आरोप केले. पण पुरेसे पुरावे समोर आणू शकली नाही, इव्हीएम घोटाळा हे तुणतुणे शेवटपर्यंत सर्वच नेते वाजवत राहिले. यात त्यांनी सर्व यंत्रणाच बरबटलेली आहे असं सांगण्याचा प्रयत्न केल्याचे लोकांच्या लक्षात आले असेलच.
अँटी इंकम्बसी याचा आधार घेऊन, मोदी लाटबीट काही नसून लोक वैतागलेले आहेत हे ठसवायचा अनेकांनी प्रयत्न केला. तर पंतप्रधान मोदी मात्र काही सभांमधून प्रो इंकम्बसी असल्याचं सांगत होते. भावनात्मक मुद्द्यांना लोकांनी साथ देत मूलभूत मुद्द्यांना नजरेआड केल्याचं राजकीय विश्लेषकांना वाटत आहे. यात हिंदुत्वाच्या राजकारणाने धर्मनिरपेक्षतेचा मुद्दा सोडून दिला आहे. बंगालमध्ये काट्याची टक्कर देत आलेल्या जागा, प्रज्ञा सिंह ठाकूर याचा विजय, अशा बाबीवरून देशाचं राजकारण वेगानं बदलत असून पुढील काळात राष्ट्रवादाची मोठी नांदी असेल! गेल्या पाच वर्षांत मोदींनी केलेली जीवतोड मेहनत लोकांनी पहिली, यात काही प्रमाणात यश आलं नाही हेही ते मान्य करतात. पण मतदानात त्यांनाच मत देताना दिसतात. यात मोदींच्या लोकप्रियतेचा मोठा हात असून काही राज्यात खातं उघडल्यानं त्याची प्रचिती दिसून येते. २०१४ हा एक अपवाद होता असं प्रचारात जोरानं सांगणाऱ्या काँग्रेससह विरोधी पक्षांना काय चुकलं याचा विचारही करता येणार नाही अशी ही परिस्थिती आहे.
एकीकडे काँग्रेसच्या नवज्योत सिद्धू यांनी अकलेचे तारे तोडत भाजप-मोदींवर केलेली टीका, केरळमध्ये मिळालेलं यश ही काँग्रेसच्या जमेची बाजू म्हणता येईल. राजधानी दिल्लीत काँग्रेसला तोंड दाखवायला जागा नाही तर इतर मोठे नेते मल्लिकार्जुन खरगे, दिगिराजा, हरीश रावत, सलमान खुर्शीद, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, शीला दीक्षित यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. गुजरात, उत्तराखंड, हिमाचल, हरियाणा इथे जनतेने विरोधकांचा खरपूस समाचार घेतला आहे. निवडणूक कलचाचण्या कोणीच बरोबर देऊ शकले नसले तरी सत्ता भाजपची येणार या भाकिताने विरोधकांची हवा मात्र तेव्हाच ‘गुल’ झाली होती. त्यांनी मनाची नि लोकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला नि नियतीने तसंच दान त्यांच्या झोळीत टाकलं. केदारनाथ ध्यानधारणेवरून पुढील काळात मोदी झोळी घेतलेले दिसतील वगैरे टीकाही यथेच्छ झाली. आता जनतेने कोणाला झोळी घेऊन फिरवायचं हे आधीच निश्चित केलं होतं. एकूणच पाहता देशात मोदी राज येणार हे अनेकांनी सांगितलं होतं. समजा बहुमत नाही आलं तरी मोदीच पंतप्रधान व्हावेत ही अनेकांची इच्छा होती. ती सुफळ, संपूर्ण झाली. त्याचबरोबरीत घवघवीत मिळालेलं यश देशाच्या राजकारणात दिशा बदलविणारं असेल हे निश्चितच!”

