Details
‘मोनो’ दुसर्या टप्प्यातही बावरते!
06-Mar-2019
| 0
”
विनोद साळवी, मुख्य उपसंपादक, महाराष्ट्र दिनमान
vinodsalvi1@gmail.com
वर्षभरापासून बंद असलेली मोनो रडतरखडत पहिल्या टप्प्यात सुरू झाली. पुन्हा सुरू झालेली मोनो आता जोमात धावेल, असं मनोमन प्रवाशांना वाटलं. अगदी मोनोचा प्रवास दुसर्या टप्प्यापर्यंत आला. मुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस यांनी फीत कापण्याची घाई करून मोनोच्या दुसर्या टप्प्याचेही उद्घाटन उरकून घेतले. लोकसभा निवडणूक तोंडावर असल्याने कधीही आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे मुख्यमंत्री व यंत्रणेची घाईगडबड सामान्य मुंबईकर समजू शकतो. पण, मेट्रोच्या तुलनेत सुरुवातीपासून दुर्लक्षित राहिलेल्या मोनोच्या पडझडीकडे, सुरक्षित प्रवासाकडे पाहण्यासाठी प्रशासन, सरकार कुणाला वेळ मिळाला का? हे मोनो रेल व तिला दुसर्या टप्प्याच्या पहिल्याच दिवशी भरभरून प्रतिसाद देणार्या प्रवाशांचं दुखणं.
पहिल्याच दिवशी 27 हजार प्रवाशांनी मोनोतून प्रवास केला. संत गाडगे महाराज चौक, लोअर परळ, मिंट कॉलनी, आंबेडकर नगर, नायगाव, दादर पूर्व, वडाळा पूल, आचार्य अत्रे नगर, अँटॉप हिल जी. टी. बी. नगर आणि वडाळा ही स्थानके या टप्प्यात असल्याने मोनोला तुफान प्रतिसाद लाभत आहे व भविष्यात ती सूरळीत सुरू राहिल्यास मोनोचा गल्ला भरून वाहील, हेच प्रवाशांनी दिलेला कौल सांगतो. मोनोच्या दुसर्या टप्प्यात लोअर परळ, नायगाव, दादर, अॅन्टॉप हिल, जी. टी. बी. नगर हा वर्दळीचा भाग असल्याने मध्य रेल्वेच्या लोकलसेवेवरील ताण कमी होण्यास निश्चित मदत होईल. पण, उद्घाटनानंतर दुसर्या दिवशी अवघ्या काही तासांत मोनोची गाडी तांत्रिक बिघाडामुळे अडली. त्यामुळे लटकंती, रखडंती, बिघाडसत्र हा मोनोचा मागील पानावरून कार्यक्रम पुन्हा सुरूच राहिला. तिकिट दरवाढीनंतरही सूरळीत सुरू असलेला मेट्रोचा प्रवास मोनो रेल प्रशासनाला का करता आला नाही? पुरेसे मनुष्यबळ, तांत्रिक बिघाड, गाड्यांची कमतरता हे अंतर्गत प्रश्न मोनो रेल्वे प्रशासन, एमएमआरडीए अथवा सरकारी पातळीवर सोडवता येऊ शकत नाही का? मुख्यमंत्री जातीने लक्ष पुरवून हे प्रश्न सोडवू शकत नाही का?
फेब्रुवारी 2014 मध्ये मोनोचा चेंबूर ते वडाळा हा पहिला टप्पा सुरू झाला होता. देशातील ही पहिलीच मोनो असल्याने सुरुवातीचे काही दिवस कौतुकापोटी मोनोला तुफान प्रतिसाद लाभला. पण, पुढे मोनोचा रखडलेला विस्तार हे गेली पाच वर्षे तोट्याचे गणित दाखवत आहे. दरमहा किमान 80 लाख ते एक कोटींचा तोटा मोनोला सहन करावा लागत आहे. त्यानंतर 2017 मध्ये लागलेल्या आगीत मोनोला अधिक तोटा सहन करावा लागला. त्यामुळे जवळपास दहा महिने मोनोची सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली. या काळात बेरोजगारीच्या खायीत लोटले गेलेल्या मोनोच्या सेवेतील कर्मचार्यांचे बळ आजही आहे का? रविवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या मोनोची गाडी काही बिघाडामुळे ठप्प झाली. येत्या काळात तरी ही रखडगाडी लाईनवर येईल, ही आशा मुंबईकरांना आहे. सोमवारी मोनोचा दुसरा टप्पा सर्वसामान्यांसाठी खुला होतो काय नी रविवारी उद्घाटन सोहळ्यासाठी लावलेली एक वायर मोनोमध्ये अडकते काय, इतकी बेपर्वाई कशासाठी? मोनो प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारात येत्या काळातही सुधारणा न झाल्यास प्रवाशांचा या सेवेवरील विश्वास टिकून राहील का?
कुठलीही नवीन सेवा सुरू झाल्यानंतर तिचा प्रवास हा अडखळत होतो. पण, कालांतराने त्यात काहीतरी सुधारणेला वाव असतो. परंतु, मोनो रेलचा हा प्रवास पाच वर्षांनंतरही जैसे थे सुरू असल्याने प्रवाशांनी याचा जाब कुणाला विचारावा? मुंबईत एकीकडे मेट्रो-2च्या टप्प्याचे काम युद्धपातळीवर सुरू असताना मोनोला फॉर्मात आणण्यासाठी सरकारी स्तरावर प्रयत्न का होऊ नयेत? पहिल्याच दिवशी विस्तारित मोनो रेल्वे मार्गाचा वापर 16 हजार प्रवाशांनी केला. सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक (सातरस्ता) पर्यंत मोनो रेलने 53 फेर्या मारल्या व तिकिटांपोटी तीन लाखांचा महसूल गोळा केला. हे व्यावसायिक गणित निश्चित समाधानकारक आहे. मात्र बेस्टच्या धर्तीवर वारंवार तोट्यात दाखवली जाणारी मोनो कधीतरी, कुठेतरी आणि केव्हातरी सावरेल का? चेंबूर ते दादर पूर्वपर्यंत विस्तारलेल्या दुसर्या टप्प्यातील मोनोचे प्रवाशांनी पहिल्याच दिवशी जोरदार स्वागत केले. पण, उद्घाटन सोहळ्यासाठी लावलेला सजावटीचा दोर मोनोच्या खालील भागात गुंतल्याने अडथळा निर्माण होतो, मोनो रेलच्या डब्यांना आग, तांत्रिक बिघाड ही सातत्याने पुळढ कारणे प्रवाशांचा ओघ वाढवतील का?”

