Details
केएचएल न्यूज ब्युरो
“माओवाद्यांना उपेक्षित, शोषित यांचे भले करायचे आहे, हे ठाम खोटे असून त्यांना मदतीला घेऊन रक्तरंजित क्रांती करून या देशावर राज्य करायचे आहे. त्यासाठी बुद्धिभेद करणारी सर्व पारंपरिक आणि आधुनिक माध्यमं ते उपयोगात आणत आहेत. त्यापासून सावध राहिलेच पाहिजे, पण त्यापुष्ट्यर्थ पुरावेदेखील मागितले पाहिजेत. म्हणजे त्यांचा चेहरा समाजापुढे येईल, असे प्रतिपादन कॅप्टन स्मिता गायकवाड यांनी नुकतेच केले.”
मुंबईतल्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि नंदादीप समिती यांच्या वतीने सावरकर घराण्यातील महिलांचा एकत्रित स्मृतिदिन आयोजित करण्यात आला. त्यावेळी माओवाद्यांचे प्रचारतंत्र या विषयावर त्या बोलत होत्या.
चौथ्या पिढीतील युद्धाची सज्जता
“माओवादी विचारसरणी ही दीर्घकाळ लढा देणाऱ्या विचारसरणीची असून चौथ्या पिढीला युद्धासाठी तयार करण्याची त्यांची मानसिकता आहे. त्यादरम्यान, लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे कडवे योद्धे तयार केले जात आहेत. शत्रू हा अदृश्य राहिला पाहिजे. समाजावर त्याचा प्रभाव असावा. समाजातील अनेकजण त्याच्या नियंत्रणात असावे. एखादे बंड किमान ५२ दिवस तरी चालवले गेले पाहिजे, अशी त्यांची तत्त्वप्रणाली आहे, याबाबतही त्यांनी सविस्तर विवेचन केले.”
नक्षलवादी तयार करण्याचे अनेक मार्ग
“माओवादाच्या विरोधात जाणाऱ्या उपेक्षितांना जाहीर शिक्षा देताना इतरांच्या मनात घबराट पसरविण्याचा त्यांचा हेतू असतो. त्याशिवाय माओवाद्याच्या दिशेने न वळल्यास दहशत किंवा दडपशाहीचा मार्ग अवलंबिणे. बंदुकीच्या नळीतूनच राजसत्ता मिळवता येते, हे माओचे तंत्र अवलंबिण्याची शिकवण प्रत्यक्षात आणण्यासाठी वाट्टेल ते करणे, माओच्याच विचारातून क्रांती होऊ शकते. त्यासाठी हिंसा अपरिहार्य आहे, हे मनावर बिंवबणे. आपणच रॉबिनहूड असल्याचे भासवणे, खोट्या तक्रारी करणे, खोटे आरोप करणे, गोबेल्स नीती, वृत्तपत्रांमध्ये चुकीचे वृत्त पसरवणे आणि आता तर समाजमाध्यमांचा त्यासाठी पुरेपूर उपयोग करून घेणे, असे अनेक मार्ग नक्षलवादी तयार करण्यासाठी अवलंबिले जात आहेत. हेच त्यांचे प्रचारतंत्र आहे, या मुद्द्यांवरदेखील कॅ. गायकवाड यांनी भर दिला.”
कुजबूज मोहीम प्रभावी
“एखाद्या घटनेविषयी समाजमाध्यमांवर चर्चा करण्याबरोबरच गावोगावी होणाऱ्या गप्पांमधून सत्ताधाऱ्यांबद्दल अपप्रचार करणे व त्यातून मिळणारा प्रतिसाद तपासणे. जी व्यक्ती आपल्या विचारांशी समरस आहे, त्यांना हेरून संघटनेत खेचणे, ही मोहीमदेखील प्रभावीपणे राबविली जात आहे. नाटक तसेच गाण्यांच्या कार्यक्रमातदेखील हाच मार्ग अवलंबिणे. या सगळ्या क्लृप्त्या आपण समजून घेतल्या पाहिजे.”
“माओवाद्यांचे समर्थन करणाऱ्यांकडून आपण विरोधी गोष्टीचे पुरावे मागितले पाहिजेत. वस्तुस्थिती तपासून घेतली पाहिजे. भूलथापांना बळी पडता कामा नये तसेच त्यांची सामोपचाराची भूमिका कधीच नसते किंवा यंत्रणा सुधारण्याऐवजी ती अधिक विस्कळीत करण्यावर त्यांचा भर असतो. यातून अंदाज घेत त्यांना ओळखले पाहिजे, असे आवाहनदेखील कॅ. स्मिता गायकवाड यांनी केले.”

