Details
“बेफिकीर सरकार, सुन्न मुंबईकर!”
18-Mar-2019
| 0
”
विनोद साळवी, मुख्य उपसंपादक, महाराष्ट्र दिनमान
vinodsalvi1@gmail.com
रविवारची सुट्टी संपल्यानंतर नेहमीप्रमाणे पायाला भिंगरी बांधून, घड्याळाचा काटा बघून अन् मोबाईलचा टच स्क्रीन खालीवर सरकवून सोमवारच्या वेळापत्रकाप्रमाणे मी, मुंबईकर म्हणून तुमचा-आमचा दिवस एव्हाना सुरूही झाला असेल. मुंबई आणि आसपासच्या उपनगरांत कुठेही कोणतीही दुर्घटना घडली तर नाही ना? जीव मुठित धरून आपण चालतो आहोत त्या रेल्वे अथवा पादचारी पुलावरून आपण मार्गक्रमण करत असू. दुर्घटना घडली, इतके मुंबईकर ठार-टीव्हीवर झळकलेल्या ब्रेकिंग न्यूजचा फोटो काढून फेसबुक, व्हॉट्सअॅपवर टाकून मोकळे. मृतांसाठी श्रद्धांजलीचा हा कार्यक्रम घर-कार्यालयांतूनच सुरू होईल. अधिकाअधिक कव्हरेज देणार्या पोस्ट, दुर्घटनेचे व्हीडिओ, फोटो अगदी वर्तमानपत्र, चॅनलपेक्षाही ‘आँखो देखा हाल’ या गटातून त्या गटाकडे फेकायचा.
अरे मी तिथचं होतो पण.. थोडक्यात बचावलो. अगदी तेलमीठ लावून पोस्टवर पोस्ट टाकून आपल्या आतला माणूस रिर्पोटरची भूमिका गाजवतो. अनेक घटनांत तोच प्रत्यक्षदर्शी. एखाद्या दुर्घटनेनंतर घटनास्थळी जखमी अवस्थेत विव्हळत पडलेला माणूस रूग्णालयापर्यंत पोहोचवून त्याचा जीव वाचवण्यापेक्षा त्याचे फोटो मोबाईलमध्ये टिपण्याच्या स्पर्धेत हल्ली आपण आघाडी घेतली आहे. त्यातही उरलीसुरली माणुसकी दिसली तरी तो टक्का किती? ज्यांच्या आतला आवाज नि माणूस आजही जिवंत आहे, त्याला भविष्यात, वर्तमानात अशा दुर्घटना टाळण्यासाठी एक दिवस तरी सरकार आणि इथल्या भोंगळ यंत्रणेविरोधात उठाव करण्यासाठी सवड मिळावी?
मी, किती दिवस असं कीडामुंगीप्रमाणे मरायचं. सुबह घर से निकलो, भीड का एक हिस्सा बनो.. शाम को घर जाओ.. आत्मा और अंदर का इन्सान मर चुका है! जिने के लिए घिनौने समझोते कर चुका है! खरंतर अभिनेता नाना पाटेकर यांचा हा 90 च्या दशकातील डायलॉग वरवर फिल्मी वाटत असला तरी तो आजही तुमच्या-आमच्यासारख्या सर्वसामान्य मुंबईकरांना लागू पडतो आहे. सालं मुंबईत कधी कुठं नि कसं मरण येईल, याचा आता काहीच नेम नाही. खड्ड्याखुड्ड्यांतून गाडी चालवताना भररस्त्यात, तुंडूंब गर्दीच्या लोकल अथवा रेल्वेतून खाली कोसळून, पादचारी पूल नसल्याने रेल्वे रूळ ओलांडताना, पावसाळ्यात उघडी गटारे व मॅनहोलमध्ये पडून, मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडीसह नजीकच्या उपनगर, शहरांत जुन्या व जीर्ण झालेल्या इमारती पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळून, ब्रिटिशकालीन पुलानंतर मुंबईच्या रेल्वेस्थानकांतील पादचारी, रेल्वे पूल कोसळून सामान्य मुंबईकर मरतोच आहे.
एल्फिन्स्टन रोड पुलावरील चेंगचेंगरीत 23 मुंबईकरांचा बळी गेल्यानंतरही मी, मुंबईकर म्हणून माझ्या स्पिरिटचीच चर्चा रंगते. माझी छाती गर्वाने, अभिमानाने फुलते. पण, ज्यांनी या दुर्घटनेत आपला भाऊ, बहीण, आई, वडील, मित्र, मैत्रीण यांना कायमचं गमावला तो आपलं दु:ख कुणाला सांगणार? ते हुंदके, तो आक्रोश कुणाला कळणार? सरकारची लाख मदत माझं माणूस मला परत देईल का? सुस्तावलेली, गेंड्याचं कातडं पांघरून बसलेली, जखमींच्या जखमेवर मीठ चोळणारी इथली यंत्रणा, सरकार, महापालिका, रेल्वे प्रशासन दररोज एकाच पटरीवर चालणार्या मुंबईकरांना का गणतीत धरत आहे. इथल्या निर्ढावलेल्या, मुर्दाड पडलेल्या आणि सामान्य माणसाच्या टाळूवरचे लोणी खाणार्या व्यवस्थेला कितीही शिव्याशाप घाला, कुणाला काहीचं पडलेलं नाही. काही झालचं नाही, अशा थाटात पुन्हा पूर्वपदावर येणारी मुंबई शून्य, सुन्न झाली आहे.
माझी सत्ता, माझं राजकारण, आमचे किती निवडून येतील, तुमचे किती पडतील याचं स्ट्रक्चरल ऑडिट मात्र न चुकता सुरू आहे. मुंबईचं नाकं असलेल्या डी. एन. रोड, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील पादचारी पूल कोसळून सहा मुंबईकरांनी हकनाक जीव गमावला. 34 हून अधिक मुंबईकर जखमी झाले. त्याचवेळी राज्याचे पालक असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अतीव दु:खात बुडाले. अपेक्षेप्रमाणे त्यांनी या दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीची घोषणाही करून टाकली. अगदी स्ट्रक्चरल ऑडिटचंही राजकारणही रंगलं. तिथं सामान्य मुंबईकर हा नेहमीप्रमाणेच बळीचा बकरा म्हणून बळी गेला. दुसर्या दिवशी माझ्या मोबाईलमधील मेमरी कार्ड हरवल्याप्रमाणे मी थंड पडतो तिथं आमचे मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सोयरसुतक ते काय?
सहा मुंबईकरांचा बळी गेल्यानंतरही शिवसेना-भाजपा युतीचा महामेळावा महत्त्वाचा. ठाकरे, फडणवीसाचं जोरदार भाषण व त्यांच्या चेहर्यावरील दु:खद भाव आपण वृत्तवाहिन्यांच्या सौजन्याने टीव्हीवर पाहिलेच. शेवटी मुंबई, ठाणेकरांनी आता नशिबावर भरवसा ठेवूनच पादचारी पुलावरून आणि पुलाखालून जाताना पुढचं पाऊल टाकावं. अहो, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला लागून असलेला हिमालया पूल पादचार्यांमुळेच पडला, हा शोधही भाजपाची एक महिला कार्यकर्ती संजू वर्मा घेते, यावरून तरी मुंबईकरांना समज घ्यावी. मुंबईत गेल्या सात वर्षांत सहा पूल कोसळून 28 मुंबईकरांचा बळी गेला आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली परिसरात असे अनेक धोकादायक पूल आजही मुंबईकरांचा बळी मागत आहेत. गर्दीत हरवलेला मुंबईकर आणि माणूस मेल्यानंतर फक्त मदत जाहीर करणारं बेफिकीर सरकार मुंबईकरांच्या मृत्यूचे हे तांडव थांबवेल का?”

