Details
विनय गजानन खरे..
ज्येष्ठ पत्रकार
येथील एका वृत्तपत्राच्या बातमीनुसार चीनने दुसऱ्या महायुद्धात महत्त्वाची भूमिका बजावलेले तुलागी बेट ७५ वर्षांसाठी भाड्याने घेतले आहे. हे द्वीप ब्रिटन आणि जपानचे त्या काळात मुख्यालय होते. सभोवरचा खोल समुद्र हे वैशिष्ट्य असल्याने याचा वापर सैन्यतळ म्हणून होण्याची शक्यता संरक्षण तज्ज्ञांना वाटते. यापूर्वी चीनने अशी बेटं भाडेतत्त्वावर घेत त्याचा लष्करी वापर सुरू केला आहे. सलोमनने तायपेईशी असलेले संबंध तोडल्यानंतर बीजिंगशी सूत जुळवले आणि आपले नाते जोडले. दक्षिण प्रशांत क्षेत्रात तैवानच्या प्रमुख सहकाऱ्यांपैकी सलोमन एक होता. चीनच्या मागील सरकारने मालदिवच्या दहा बेटांना असंच भाड्याने घेतलं असून सध्या तिथे मोठी जहाजे ठेवण्याबरोबरच सैन्य हालचालींसाठी केंद्र बनत आहे.
हिंद महासागर क्षेत्रात ४० पेक्षा जास्त देश आणि ४०% लोकसंख्येचे वास्तव्य आहे. समुद्री चाचेगिरीला आळा घालण्याच्या हेतूने दहा वर्षांपूर्वीच हिंद महासागरात एडनच्या आखातात आपले समुद्री सैन्य पाठवण्यास सुरूवात केली. त्यामुळे मालदिवचे महत्त्व वाढण्यास मदत झाली. आता सध्या ते आंतरराष्ट्रीय राजकारणाचे केंद्र झालेय. गेल्या काही वर्षांत चीनचा दबदबा वाढविण्यासाठी मागील सरकारने इथे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. इतकंच नव्हे तर मोठ्या प्रकल्पासाठी या देशाला कर्जही दिलं.
भारत आणि चीन गतीने वाढणारी अर्थव्यवस्था
जागतिक मंदीवरून भारतातील मंदीबाबत विरोधकांनी मोदी सरकारला घेरलं असलं तरी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने मात्र भारत आणि चीनला यंदाच्या वर्षी वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेत स्थान दिले आहे. सद्यस्थितीत भारताचा विकास दर ६.१ टक्का राहील तर पुढील वर्षात तो ७% होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे नाणेनिधी अर्थतज्ज्ञ मोठे की देशी हा वाद पेटण्याची शक्यता व्यक्त होतेय. ताज्या अंदाजनुसार विकास दरात १.२ % घट सांगितली जाते. याच वर्षीच्या एप्रिलमध्ये विकास दर ७.३ % राहील अस सांगितल्यावर तो अंदाज मागे घ्यायला लागला होता. कॉर्पोरेट आणि पर्यावरण धोरणातील अनिश्चितता यामुळे विकासदर गती मंदाऊ शकते. बँकिंगच्या बाहेरील वित्तीय संस्थांचे बिघडते आरोग्य याचाही यात वाटा आहे.
“यंदा चीनचा विकास दर ६.१ % असून तो पुढील वर्षात ५.८% राहण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी तो ६.६ % होता. जागतिक अर्थव्यवस्था यंदा ३.३% तर पुढे ३.४% इतकीच प्रगती करेल हादेखील अनुमान आहे. अमेरिका चीन व्यापार युद्धामुळे आगामी वर्षात ढोबळ विकास दर ०.८ % इतका घसरू शकतो. विश्व व्यापार आणि उत्पादनात झालेल्या घसरणुकीमुळे विकास कमजोर झाल्याचे अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांनी म्हटले आहे. उच्च शुल्क, दीर्घकालीन व्यापारात अनिश्चितता यातून गुंतवणूक आणि मागणीला नुकसान होत आहे. धोरण ठरवणाऱ्यांनी विकासात तेजी आणण्यासाठी प्रतिबंध हटवून दीर्घकालीन करार केले पाहिजेत यासह प्रादेशिक तणाव कमी करून घरगुती नितीतील अनिश्चितता दूर झाली पाहिजे.”

