उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार या बातमीने महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले असतानाच, दोन्ही नेत्यांना भूतकाळ विसरुन, समान धोरण आखून आणि सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच मार्गक्रमण करावं लागेल. कधी मोदींना पाठिंबा, कधी विरोध, पुन्हा मोदींना बिनशर्त पाठिंबा, असे मुद्दे स्पष्ट करण्याचे आवाहन उद्धव ठाकरेंनी राजला आधीच केले आहे. याचबरोबर उद्धव ठाकरेंनाही त्यांचा वक्फ कायद्याला विरोध आणि इंडिया आघाडीचे काही धर्मनिरपेक्षवादी मुद्दे याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी लागेल. अभिनेते महेश मांजरेकर यांना दिलेल्या एका मुलाखतीत आमची भांडणे, वाद हे किरकोळ असून महाराष्ट्र हितासाठी सर्वानी एकत्र येण्याची गरज आहे, असे राजनी म्हणताच उद्धव ठाकरेंनीही या सूचनेला होकारार्थी प्रतिसाद दिला आणि नवीन चर्चेला सुरुवात झाली.
राज यांच्या वेळोवेळी वेगळ्या भूमिका
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची २००६मध्ये स्थापना केल्यानंतर राज ठाकरेंनी आतापर्यंत वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळ्या भूमिका घेतल्या आहेत. २०११मध्ये गुजरातला भेट देऊन त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री नरेद्र मोदींनी गुजरातमध्ये केलेल्या विकासाची वारेमाप स्तुती केली. नंतर २०१९मध्ये गुडीपाडवा मेळाव्यात आणि शिवाय खास जाहीर सभा घेऊन मोदींवर २०१४मध्ये दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याबद्दल कडाडून टीका केली. २०२४च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी मोदींना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. याचबरोबर २०२४ला महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या कितीतरी अगोदर भाजपा निवडून येणार आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असे जाहीर करुन टाकले.
रमेश किणी प्रकरण
मुंबईत दादर निवासी रमेश किणी यांचा २३ जुलै १९९६ रोजी संशयास्पद मृत्त्यू झाल्यानंतर राज ठाकरे वादाच्या भोवऱ्यात सापडले. किणींच्या मृत्यूला जबाबदार असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. पण या प्रकरणातून ते निर्दोष सुटले. त्यानंतर २००२मध्ये शिवेसेनेत उद्धव ठाकरेंचं आगमन झालं. २००३मध्ये त्यांना कार्यकारी अध्यक्ष बनविण्यात आले. याचा प्रस्ताव राज ठाकरेंनीच मांडला. मात्र दोघांत मतभेद सुरु राहिले आणि दिखाऊ मनोमीलन पार काळ टिकले नाही. नंतर बऱ्याच जबाबदाऱ्या उद्धव ठाकरेंना देण्यात आल्या आणि राज ठाकरेंचा शिवसेनेतील सहभाग हळूहळू कमी झाला. नंतर उद्धवच्या नेतृत्त्वात झालेल्या निव़डणुकांत बऱ्यापैकी यश मिळाल्यामुळे उद्धव ठाकरेंच्या नावावर कर्तबगारीचा शिक्का बसला.
शिवसेनेपासून फारकत
१८ डिसेंबर २००५ला मुंबईतील शिवाजी पार्क जिमखान्यात झालेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी शिवसेना सोडल्याची घोषणा केली. तीन महिन्यांनंतर (९ मार्च २००६) त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी हे मतभेद चर्चेने मिटतील असे म्हटले होते. परंतु शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी मध्यस्थी करुनही वाद सुटला नाही. यामुळे बाळासाहेब ठाकरे बरेच दुःखी होते. आता दोन दशकानंतर दोन्ही भावांनी मतभेद मिटवायचे संकेत दिले आहेत.

उद्धव ठाकरेंवर मर्यादा
“इंडिया आघाडी”बरोबर राहिल्यास उद्धव ठाकरे यांच्यावरही बऱ्याच मर्यादा येतील आणि त्यांना काही मुद्द्यांवर ठोस भूमिका घ्यावी लागेल. उदाहरणार्थ, छत्रपती संभाजीनगरमधील खुलताबाद येथील वादग्रस्त औरंगजेबाच्या कबरीबाबत. “औरंगजेबाची कबर उखडायची तर उखडून टाका. कोणीही शिवप्रेमी औरंगजेबीप्रेमी असू शकत नाही, पण दुतोंडी भूमिका घेऊ नका” असं आवाहन त्यांनी राज्य सरकारला केलं. याचबरोबर ”काही नवहिंदुत्ववाद्यांची अशी गर्जना आहे की, ज्याप्रमाणे बाबरी पाडली त्याप्रमाणे औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करू. हे लोक इतिहासाचे व महाराष्ट्राच्या शौर्यपरंपरेचे शत्रू आहेत. त्यांना महाराष्ट्राचे वातावरण विषारी करायचे आहे” असेही ते म्हणाले होते. म्हणून उद्धव ठाकरेना संदिग्ध भूमिकांपासून दूर राहवे लागेल.
मनसे कार्यकर्त्याची भूमिका
दरम्यान, मनसे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडेसह बऱ्याच मनसे कार्यकर्त्यानी युती करण्याच्या प्रस्तावाला आधी उद्धव ठाकरे यांनी बऱ्याचवेळा बगल दिली होती, याची आठवण करुन दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, जसे कावेरी नदीच्या पाणीवाटपाच्या मुद्द्यावर एकमेकांचे कट्टर विरोधक “डीएमके” आणि “एआयडीएमके” एक होतात, तसे दोन्ही पक्षांनी एकत्र आले पाहिजे. केवळ निवडणूकपूर्य युतीचा विचार न करता, मराठी अस्मिता आणि महाराष्ट्राच्या हिताचा विचार उद्धव ठाकरेंनी करावा.
पुनर्रचना
शिवसेना आणि मनसे एकत्र आल्यास मधल्या फळीच्या नेत्यांचं काय होणार? आदित्य ठाकरेंचं नेतृत्त्व मनसे कार्यकर्ते स्वीकारतील का? पक्षांच्या प्रवक्त्यांचं काय होणार? हे खरे कळीचे मुद्दे आहेत.
मनसेचा आलेख
२००९ विधानसभा निवडणुका
मनसेला २००९च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत लक्षणीय यश मिळाले. पुणे, मुंबई, नाशिक व ठाणे येथील एकूण १३ आमदार निवडून आले. शिवाय “मनसे’ला तेरा जागांवर क्रमांक दोनची मते मिळाली तर एकोणतीस जागांवर “मनसे’चे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होते.
२०१२ सालच्या महानगरपालिका निवडणुका
२०१२ सालच्या महानगरपालिका निवडणुकांतही मनसेला बऱ्यापैकी यश मिळाले. मुंबई २८, ठाणे ७, उल्हासनगर ०१, पुणे २९, पिंपरी-चिंचवड ०४, नाशिक ४०, अकोला ०१ आणि नागपूर ०२ अशा जागा जिंकून मनसेने महानगरपालिका निवडणुकात आपला ठसा उमटविला होता.

२०१७ सालच्या महानगरपालिका निवडणुका
फेब्रुवारी २०१७मध्ये झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसे २८ जागांवरुन ०७ जागांवर घसरली.
२०१९ सालच्या विधानसभा निवडणुका
मात्र २०१९च्या विधानसभा निवडणुकीत कल्याण ग्रामीणमधून मनसेचे एकमेव उमेदवार राजू पाटील निवडून आले. २०२४च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचा एकही आमदार निवडून आला नाही.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे २०१२मध्ये निधन झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी २०१४च्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर ६३ जागा जिंकल्या. शिवाय फेब्रुवारी २०१७मध्ये झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला ८४ तर भाजपाला ८२ जागा मिळाल्या (भाजपाने ३१ जागांवरून ८२ जागांवर झेप घेतली ही वेगळी बाब). २०१९च्या विधानसभा निवडणुकीत भाजप बरोबर युती करुन ५६ जागा जिंकल्या. मात्र नंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर “धर्मनिरपेक्ष” पक्षांशी हातमिळवणी करुन राज्याचे मुख्यमंत्रीपद मिळविले. नंतर भाजपाने शिवसेना पक्ष फोडून जून 2022मध्ये एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले आणि १०५ जागा जिंकूनही अडीच वर्षे सत्तेशिवाय राहिल्याचे उट्टे काढले. उद्धव ठाकरेंनी “इंडिया आघाडी”शी हातमिळवणी करुन २०२४च्या लोकसभा निवडणुकीत ०९ आणि विधानसभा निवडणुकीत २० जागा मिळविल्या.
सध्या भाजपा मंत्री नितेश राणे, भाजपा नेते आणि मंत्री आशिष शेलार, शिंदेंच्या शिवसेनेचे नेते संजय निरुपम आणि इतर शिवसेना-मनसेच्या संभाव्य युतीविरुद्ध तोंडसुख घेत आहेत. कारण, दोन्ही भाऊ एकत्र आल्यास मोठी उलथापालथ होईल या कल्पनेनेच बऱ्याचजणांना धडकी भरली आहे तर मूळ शिवसैनिक सुखावले आहेत. आता उद्धव आणि राज एकत्र आल्यास एकमेकांचे कार्यकर्ते पळविणे, खोचक वक्तव्यं अशा बाबींना तिलांजली द्यावी लागेल. दरम्यान, परदेश दौऱ्यावर गेल्यानंतर संभाव्य युतीबाबत ते परत येईपर्यंत भाष्य करु नये असा आदेश राज ठाकरेंनी आपल्या नेत्यांना दिला आहे. राजपाठोपाठ उद्धवही सहकुटूंब परदेशवारीवर आहेत. दोन दिवसांनंतर राज परततील तर उद्धवना मुंबई गाठेपर्यंत पाच मे उजाडणार आहे. राजकारणात एक अधिक एक दोनच होतात असे नाही तर ते एकावर एक अकराही होऊ शकतात. पाहूया..