त्रिनिदाद टोबॅगोने भारतीय स्वातंत्र्यलढ्यातून प्रेरणा घेतली आहे. आता भारतीय उद्योजकांनी त्रिनिदाद टोबॅगोच्या विकासात सहभागी व्हावे. आज मुंबईत दहा प्रसिद्ध उद्योगपतींशी चर्चा झाली. त्रिनिदाद येथे क्रिकेट अकादमी स्थापन करण्याच्या दृष्टीने या भेटीत उद्योजकांशी चर्चा झाली. हे भारतीय उद्योजक त्रिनिदाद टोबॅगो येथे गुंतवणूक करण्याबाबत सकारात्मक असल्याचे त्रिनिदाद टोबॅगोचे पंतप्रधान डॉ. किथ राऊली यांनी सांगितले.
भारतभेटीवर आलेले त्रिनिदाद आणि टोबॅगोचे पंतप्रधान डॉ. किथ राऊली व त्यांच्या पत्नी शेरॉन राऊली यांनी काल राज्यपाल रमेश बैस यांची मुंबईत राजभवन येथे औपचारिक भेट घेतली. त्यानंतर ते बोलत होते. राज्यपालांच्या पत्नी रामबाई बैस यादेखील यावेळी उपस्थित होत्या. डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रात भारताकडून सहकार्य होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
त्रिनिदाद टोबॅगोच्या पंतप्रधानांचे स्वागत करताना राज्यपाल बैस म्हणाले की, त्रिनिदाद ही महान फलंदाज ब्रायन लाराची भूमी आहे. तसेच ड्वेन ब्रावो, सुनील नरेन व किरोन पोलार्ड हे त्रिनिदादचे क्रिकेटपटू भारतात लोकप्रिय आहेत. भारत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था असून तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने देश वाटचाल करीत आहे. त्रिनिदाद टोबॅगो देशाने भारताशी कृषी, आरोग्यसेवा, औषधीनिर्माण, ऊर्जा आणि माहिती तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रांमध्ये भागीदारीला चालना द्यावी.
त्रिनिदाद आणि टोबॅगोमधील विद्यापीठांनी महाराष्ट्र राज्यातील विद्यापीठांशी सहकार्य प्रस्थापित करावे अशीही अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली. यावेळी त्रिनिदाद टोबॅगो शिष्टमंडळाच्या सन्मानार्थ राज्यपालांनी प्रीतीभोजनाचे आयोजन केले. त्रिनिदाद आणि टोबॅगो प्रजासत्ताकाचे कार्य आणि वाहतूक मंत्री रोहन सिनॅनन व पामेला सिनॅनन, क्रीडा आणि समुदाय विकास मंत्री शम्फा कुडो – लुईस, त्रिनिदादचे भारतातील राजदूत डॉ. रॉजर गोपॉल, प्रशासकीय सहयोगी, उच्चायुक्त कार्यालय शर्लिन रामसुंदर, आंतरराष्ट्रीय संबंध आणि राजशिष्टाचार अधिकारी किर्क फ्रँकोइस, माध्यम उपसचिव ॲबी ब्रेथवेट आदी सदस्य यावेळी उपस्थित होते. शासनाच्या वतीने मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, एअर वाईस मार्शल रजत मोहन, मे. जन. विक्रमदीप सिंह, रिअर ऍडमिरल मनीष चड्ढा, अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा आदी उपस्थित होते.