Homeटॉप स्टोरीउपराष्ट्रपती धनखड यांचे...

उपराष्ट्रपती धनखड यांचे राहुल गांधींना खडे बोल!

घटनात्मक पदावरील व्यक्ती जेव्हा परदेशात जाऊन राज्यघटनेच्या शपथेचा अवमान करते, राष्ट्रीय हिताकडे दुर्लक्ष करते आणि आपल्या संस्थांच्या प्रतिष्ठेला ठेच पोहोचवते, तेव्हा जग आपल्यावर हसते, असा टोला उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी काँग्रेसचे नेते व लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना त्यांचे नाव न घेता लगावला.

राजस्थानच्या अजमेरमधल्या केंद्रीय विद्यापीठात काल एका मेळाव्याला संबोधित करताना धनखड बोलत होते. आपल्या राष्ट्रासाठी योग्य आचरणाला साजेसे नसलेल्या, आपल्या राष्ट्रवादाला चालना न देणाऱ्या कृती करण्याची आपण कल्पनादेखील करू शकतो का? आपल्या विरोधकांच्या महत्त्वाकांक्षेसाठी काम करण्यापेक्षा राष्ट्रीय आकांक्षा पूर्ण करण्यावर त्यांनी भर देण्याची गरज आहे. देशहिताविरोधात काम करणाऱ्यांना इतिहासाने कधीही माफ केले नाही, असेही ते म्हणाले.

राहुल

राहुल गांधी यांनी नुकत्याच केलेल्या अमेरिकेच्या दौऱ्यात भारताची प्रतीमा मलिन होईल, अशा स्वरूपाचे भाष्य केले होते. त्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून भारतीय जनता पार्टीच्या अनेक नेत्यांनी राहुल गांधींवर सडकून टीका केली होती. याचा पार्श्वभूमीवर उपराष्ट्रपतींनी केलेल्या भाष्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.

राज्यघटनेचे पालन करण्याची शपथ घेऊनही काही लोक देशाला त्रास देत आहेत आणि राष्ट्रवादाशी तडजोड करत आहेत. हे घृणास्पद, निंदनीय, दोषास्पद देशविरोधी वर्तन आहे. कोणत्याही परिस्थितीत आपण आपल्या शत्रूंच्या स्वार्थाला प्रोत्साहन देऊ शकत नाही, असेही धनखड म्हणाले.

देशाच्या सीमेपलीकडे पाऊल टाकणारा प्रत्येक भारतीय हा आपल्या संस्कृतीचा, आपल्या राष्ट्रवादाचा राजदूत असतो. तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांच्या कार्यकाळात विरोधी पक्षनेते असलेले वाजपेयी यांनी जागतिक व्यासपीठावर संवेदनशील आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर भारताच्या हिताचे प्रभावीपणे प्रतिनिधित्व केले होते. या पदावरील माझे कर्तव्य राजकारण करणे हे नाही. राजकीय पक्षांनी त्यांची स्वतःची कामे करावीत. विचारधारा भिन्न असतील, दृष्टिकोन भिन्न असतील आणि शासनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन भिन्न असेल. पण एक गोष्ट कायम राहिली पाहिजे की राष्ट्र सर्वोच्च आहे. आम्ही राष्ट्रीय भावना दाबू शकत नाही. जेव्हा देशासमोर आव्हाने येतात तेव्हा आपण एकजुटीने उभे असतो. आपला रंग, धर्म, जात, संस्कृती किंवा शिक्षण काहीही असले तरी आपली एकजूट आहे आणि आपण एक आहोत, असे उपराष्ट्रपतींनी अधोरेखित केले.

Continue reading

विलेपार्ल्यात साकारतोय मुंबईतील पहिला शहरी शेतीप्रकल्प

मुंबईतल्या विलेपार्ले विधानसभा क्षेत्राचे भाजपा आमदार पराग अळवणी यांच्या संकल्पनेतून मुंबईतील पहिल्या शहरी शेती प्रकल्पाचे उद्घाटन महापौर रितू तावडे यांच्या उपस्थितीत होणार असून उपमहापौर संजय घडी आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे तसेच महापालिकेतील विविध समिती अध्यक्ष व अधिकारी यावेळी...

नारीवंदन राहिले! सीमांकन जिंकले!! मोदी आणि गांधी आता मैदानात आमनेसामने!!!

महिलांना लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत ३३ टक्के आरक्षण देणारे त्याचप्रमाणे यादृष्टीने मतदारसंघाची पुनरर्चना (सीमांकन) करणारी घटनादुरूस्ती विरोधकांच्या प्रबळ एकजुटीमुळे आज संध्याकाळी फेटाळली गेली. याकरीता झालेल्या मतदानात घटनादुरूस्तीसाठी लागणारे दोनतृतियांश बहुमत मिळवण्यात सरकार अपयशी ठरले. लोकसभेत उपस्थित असलेल्या एकूण ५२८...

युद्धविरामापर्यंत होर्मूझ पूर्णपणे खुले, इराणकडून घोषणा!

जगाच्या तेलवाहतूक तसेच इतर व्यापारात महत्त्वाची भूमिका बजावणारी होर्मूझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करण्याची घोषणा इराण सरकारने केली आहे. इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अरागची यांनी नुकतीच ही घोषणा केली. लेबनान आणि इस्त्रायलमध्ये झालेल्या युद्धविरामानंतर इराण सरकारने हा निर्णय घेतल्याचे...
Skip to content