दिवंगत ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांनी मुंबईतल्या बोरीवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगर येथे गेली ४२ वर्षे चालविलेली जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमाला त्यांच्या निधनानंतर यंदाही, ४३व्या वर्षी सुरू राहणार आहे. सोमवार, २८ एप्रिल ते बुधवार, ३० एप्रिल असे तीन दिवस ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. याच व्याख्यानमालेत मंगला खाडिलकर, रुचिरा दिघे आणि हेमंत पाटकर यांना जय महाराष्ट्र नगर भूषण, शारदा आणि प्रेरणा हे तीन पुरस्कारसुद्धा समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहेत.
सोमवार, २८ एप्रिलला या व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प जीवनविद्या मिशनचे व्याख्याते प्रा. शैलेश रेगे ‘मनाचे व्यवस्थापन’ या विषयावर गुंफणार असून मंगळवार, २९ एप्रिलला हत्तीमित्र आनंद शिंदे ‘एक संवाद हत्तीशी’ या विषयावर अत्यंत वेगळा विषय मांडणार आहेत. सामान्य माणसाला भेडसावणाऱ्या बॅंकिंग क्षेत्रातील अडचणीसंदर्भात बॅंकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ विश्वास उटगी ‘आज अर्थव्यवस्थेत आपले उत्पन्न, खर्च, गुंतवणूक व बचत सुरक्षित आहे का?’ या विषयावर बुधवार, ३० एप्रिलला मार्गदर्शन करणार आहेत. एकता विनायक चौक, टाटा पॉवर हाऊससमोर, जय महाराष्ट्र नगर, बोरीवली पूर्व येथे रोज सायंकाळी ७.३० वाजता ही वसंत व्याख्यानमाला होणार आहे.
विजय वैद्य यांनी सुरु केलेल्या परंपरेप्रमाणे यंदा जय महाराष्ट्र नगर भूषण पुरस्कार मागाठाणे मित्र मंडळाचे खंदे कार्यकर्ते हेमंत पाटकर यांना, शारदा पुरस्कार आपल्या सुमधूर वाणीने रसिकांना गेली ४५ वर्षे मंत्रमुग्ध करणाऱ्या ज्येष्ठ सुसंवादिनी मंगला खाडिलकर यांना तसेच प्रेरणा पुरस्कार बोरीवली पूर्व येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या मनमिळावू, मितभाषी अध्यक्षा रुचिरा दिघे यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. ही व्याख्यानमाला विनामूल्य असून मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून याचा आनंद घ्यावा, असे आवाहन कार्यकर्त्यांच्या वतीने सचिन वगळ आणि प्रा. नयना रेगे यांनी केले आहे. विजय वैद्य यांनी सुरू केलेली ही वसंत व्याख्यानमाला यापुढेही सुरू ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन वैद्य कुटुंबियांनी दिले आहे.