विश्वभरारी फाउंडेशन आणि साठ्ये महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रानकवी ना. धों. महानोर यांच्या साहित्यावर आधारित ‘महानोरांचे साहित्य संचित’ ह्या आदरांजलीच्या कार्यक्रमाचे आयोजन साठ्ये महाविद्यालयाच्या सभागृहात केले होते. ना. धो. महानोर यांच्या साहित्यावर आधारित गाणी, कविता आठवणी आणि साहित्यिक योगदानाचे विवेचन असा भरगच्च कार्यक्रम सादर झाला.

विश्वभरारी फाउंडेशनच्या संस्थापिका लता गुठे व संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमांमध्ये साठे कॉलेज मराठी विभागाचे मोठे सहकार्य लाभले. पॉप्युलर प्रकाशनाचे रामदास भटकळ यांनी महानोर यांच्या फोटोला हार घालून त्यांना आदरांजली वाहिली. महानोर यांच्या अनेक आठवणी सांगून त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक पैलू उलगडून दाखविले, कवी अरुण म्हात्रे यांनी महानोर यांची सुप्रसिद्ध गाणी सादर करून महानोर यांच्या काव्यांची वैशिष्ट्ये सांगितली. प्राध्यापक समीर जाधव यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य डॉक्टर माधव राजवाडे यांनी साठे कॉलेजच्या वतीने प्रास्तावित केले. प्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार यांनी अजंठा चित्रपटातील गाणी किस्से सांगितली. तसेच महानोर त्यांच्या भेटीगाठीतील संवाद आणि आठवणी सांगितल्या.
प्रसिद्ध दिग्दर्शक अभिजित पानसे यांनी त्यांच्या खुमासदार शैलीत महानोर यांच्या गाण्यांची काही वैशिष्ट्ये अधोरेखित केली. महानोर यांच्या शब्दांचे ऋण माझ्यावर आहेत. त्याची फेड तर नाही करता येणार, परंतु त्यांना आदरांजली म्हणून त्यांच्या कविता, गाणी इतरांपर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न करणे हे माझे कर्तव्य मी समजते, असे लता गुठे यांनी मनोगतातून व्यक्त केले.
ह्या सर्व मान्यवरांच्या सहभागाने आणि संदीप राऊत, सुवर्णा घैसास, स्मुग्धा माळी अशा गायक वृंदाने सादर केलेल्या महानोरांच्या गाण्याने एकूण कविवर्यांचे स्मरण आणि त्यांना वाहिलेली आदरांजली वेगळी ठरली. साठ्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी संगीत संयोजन छान केले. डॉ. कृष्णा नाईक, प्रकाश राणे, गुरुनाथ तेंडुलकर, प्रशांत राऊत, अशोक शिंदे, संपदा पाडगावकर तसेच विविध क्षेत्रातून अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमाला उत्तम दाद दिली. मोठ्या संख्येने कॉलेजचे विद्यार्थीही कार्यक्रमाला उपस्थित होते.

