काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर निर्बंध लादून भारत सरकारने पंजाबातील अमृतसरपासून जवळ असलेली अटारी-वाघा बॉर्डर बंद केल्यामुळे भारत-पाकिस्तान यांच्यामधील जवळजवळ 3886 कोटी रुपयांच्या वार्षिक व्यापारावर परिणाम होणार आहे. यावर उपाय म्हणून निर्यातदार आपला माल दुबई, सिंगापूर आणि कोलंबोमार्गे निर्यात करण्याची शक्यता नाकारता येत नाही. येथील बंदरांत माल पोहोचल्यावर तो गोदामात जमा केला जातो. पुढे त्यावरील भारतीय कंपन्यांचे लेबल बदलून त्याजागी दुसऱ्या देशातील कंपनीचे (उदाहरणार्थ यूएई) लेबल लावले जाते. नंतर तो माल कुठेही पाठविला जाऊ शकतो, असे ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटीव्ह (जीटीआरआई)चे म्हणणे आहे.
2019नंतर व्यापारी संबंध बदललेदले
भारत आणि पाकिस्तानमधील व्यापार जो 2017-2018मध्ये 4148.15 कोटींच्या घरात होता तो फेब्रुवारी 2019मध्ये पुलवामा अतिरेकी हल्ल्यानंतर बराच कमी झाला. पुलावामा अतिरेकी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर 200 टक्के कर लागू केल्यामुळे आयात बरीच कमी झाली. पुलवामा अतिरेकी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान व्यापारी संबंध बदलले. या हल्ल्यानंतर, भारताने पाकिस्तानकडून मोस्ट फेव्हर्ड नेशनचा (MFN) दर्जा काढून घेतला. यानंतर पाकिस्तानने भारतासोबतचे व्यापारी संबंध स्थगित केले. दोन्ही देशांमधील तणावपूर्ण राजकीय वातावरण भारताने जम्मू-काश्मीरमधले कलम 370 हटवल्यानंतर व्यापारी संबंध आणखी बिघडले. 2023-2024मध्ये भारत-पाकिस्तान यांच्यातील व्यापार 3886.53 कोटी रुपयांपर्यंत खाली आला. आता तो आणखी किती कमी येईल हे सांगता येत नाही.
निर्यात/ आयात
भारतातून सोयाबीन, भाज्या, लाल मिरची, ताजी फळे, चहा पावडर, कॉफी, मसाले, कापूस, सूती धागा, साखर, मिठाई, प्लॅस्टिक यार्न यासारखे पदार्थ पाकिस्तानला निर्यात केले जातात, तर चामड्याच्या वस्तू, चप्पला, कपडे, बिनानी सीमेंट, चुना, गंधक, सौंदर्य प्रसाधनांत वापरली जाणारी मुल्तानी माती, चश्म्यांचे ऑप्टिकल्स, तांबे, स्टील, सुका मेवा, खजूर, सिमेंट, सैंधव मीठ, औषधी वनस्पतींसारखे पदार्थ पाकिस्तानातून भारतात 120 एकरवर पसरलेल्या “अटारी लॅण्ड पोर्ट”च्या माध्यमातून आयात केले जातात. या व्यापारावर “लॅण्ड पोर्ट्स ऑथोरीटी ऑफ इंडिया”चे नियंत्रण असते.
पाकिस्तान
औषधनिर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालासाठी पाकिस्तान साधारण 30 ते 40 टक्के भारतावर अवलंबून आहे. यामुळे द्विपक्षीय व्यापार बंद झाल्यामुळे आता पाकिस्तानमधील औषधं महाग होणार आहेत. माहितीनुसार सध्या पाकिस्तानात महागाईने उच्चांक गाठला आहे. चिकन 798.89 पाकिस्तानी रुपये, दूध 224 रुपये प्रति लिटर, अंडी 332 रुपये प्रति डझन, टोमॅटो 150 रुपये प्रति किलो, तांदूळ 339.56 रुपये प्रति किलो असे भाव आंतरराष्ट्रीय माध्यमातून पुढे आले आहेत. यामुळे भारताबरोबर व्यापारी व्यवहार बंद झाल्यानंतर पाकिस्तानला सर्वात जास्त नुकसान होईल असे आर्थिक तज्ज्ञांचे मत आहे.

भारत
याचबरोबर पाकिस्तातून आयात पूर्णपणे थांबल्यास त्याची झळ भारतालाही लागू शकते. भारत पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात सुका मेवा खरेदी करतो. सर्व व्यवहार बंद झाल्यास भारतात सुक्या मेव्याच्या किंमती वाढू शकतात. भारतात सैंधव मीठ फक्त पाकिस्तानमधून येतं जे भारतात उपवास आणि सणांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जाते. जर पाकिस्तानसोबतचा व्यापार थांबला तर या मिठाच्या किंमती वाढू शकतात. भारत पाकिस्तानमधून चष्म्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या ऑप्टिकल लेन्स आणि काही कच्चा माल आयात करीत असल्यामुळे त्यांच्या किंमती वाढू शकतात. पाकिस्तानातील हस्तनिर्मित चामड्याच्या वस्तू आणि भरतकाम केलेल्या कपड्यांना भारतात मोठी मागणी आहे. जर हा व्यवहार थांबला तर बुटीक क्षेत्राला त्याचा फटका बसू शकतो. याचबरोबर सिमेंट, दगड आणि चुन्यासारखी उत्पादने पाकिस्तानमधून आणून ती सरकारी बांधकाम प्रकल्पांमध्ये वापरली जातात. यामुळे याही वस्तूंच्या किंमती वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
एकात्मिक चेक पोस्ट
अटारी बंदरातील उलाढालीमुळे वाहतूकदार, दुकानदार यांच्या उद्योगाला चालना मिळण्याबरोबरच हमाल, कामगार आणि इतरांना नियमित रोजगाराची संधी उपलब्ध होते. अटारी बंदरातून व्यापार करणे सुलभ व्हावे म्हणून तिथे “एकात्मिक चेक पोस्ट” स्थापन करण्याची मागणी गेली कित्येक वर्षे पंजाबातील काँग्रेस, शिरोमणी अकाली दल आणि व्यापारी करीत आहेत. एकात्मिक चेक पोस्टमुळे सीमा भागात एकाच ठिकाणी कस्टम, इमिग्रेशनसारख्या विविध विभागांद्वारे तपासणी करता येते. अशी एकात्मिक चेक पोस्ट सीमावर्ती भागांतील व्यापाराला सुलभ करण्यासाठी आणि प्रवासाला सोयीस्कर करण्यासाठी उभारल्या जातात.
एकंदर व्यापार
भारताचा एकंदर विदेशी व्यापार 430 बिलियन अमेरिकन डॉलर्स (36,88,110000 कोटी रुपये) असून पाकिस्तानचा एकंदर विदेशी व्यापार 100 बिलियन अमेरिकन डॉलर्सच्या (8538475000) कोटींच्या घरात आहे. कोविडचा विपरीत परिणाम पाकिस्तानी अर्थव्यवस्थेवर झालाच होता. शिवाय गेल्यावर्षी पाकव्याप्त काश्मीरमध्ये मे महिन्यात इंधन, अन्नधान्यांचे चढे भाव आणि प्रचंड महागाईविरुद्ध व्यापाऱ्यांनी केलेल्या उठावात एक पाकिस्तानी पोलिस अधिकारी ठार झाला आणि “जॉईंट अवामी एक्शन कमिटी”चे 70हून अधिक सदस्य जखमी झाले. त्यानंतर तेथील व्यापाराची गाडी रुळावर आलेली नाही. त्यात अमेरिकेने नुकत्याच केलेल्या करवाढीमुळे पाकिस्तानचा विकासदर 2.6 टक्क्यांनी खुंटला, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या ताज्या अहवालात म्हटले आहे.
भारताची अर्थव्यवस्था
भारताची अर्थव्यवस्था मोठी आणि सक्षम आहे. याउलट पाकिस्तान आधीच आर्थिक मंदी, महागाई आणि राजकीय संकटांशी झुंजत आहे. पाकिस्तानमधून आयात केलेल्या वस्तूंऐवजी इतर देशांमधून आयात केलेल्या पर्यायांचा वापर भारताला करणे कठीण नाही. याचबरोबर स्थानिक पातळीवर उत्पादित वस्तूंचा वापर करून देशांतर्गत उद्योगांना पाठिंबा देण्याची संधी भारताला मिळू शकते.
भारत आणि पाकिस्तानमधील संबंध
1947मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारत आणि पाकिस्तानमधील संबंध तणावपूर्ण आहेत. दहशतवाद, सीमेवरील चकमकी आणि राजकीय मतभेद यांचा दोन्ही देशांमधील संबंधांवर अनेकदा परिणाम झाला आहे. तरीही शत्रुत्व असले तरी दोन्ही देशांमधील व्यापारी संबंध आतापर्यंत अबाधित राहिले आहेत. राजकीय तणाव कमी झाला तरच दोन्ही देशांमधील व्यापारी संबंध सुधारू शकतात. सध्या व्यापारात घट झाली असली तरीही दोन्ही देशांतील व्यापारी संबंध सुधारण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण राजकीय मतभेद जरी तीव्र असले तरी काही वस्तूंची परस्पर गरज दोन्ही देशांना व्यापार करण्यास भाग पाडू शकते…
संपर्कः 9820640702