पीक विमा भरण्यासाठी काही ठिकाणी तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने राज्य सरकारने केंद्र सरकारकडे केलेली विनंती केंद्राने मान्य केली असून पीक विमा ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी आता आणखी तीन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विटद्वारे दिली आहे.
पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी एक रुपयात पीक विमा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. आजपर्यंत राज्यात तब्बल १ कोटी ५० लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी एक रुपयात आपला विमा अर्ज नोंदवून यात सहभाग घेतला आहे. मागील २४ तासांत ७ लाख २० हजार शेतकऱ्यांनी आपला विमा अर्ज भरला आहे. मात्र काही ठिकाणी सर्व्हर डाऊन होणे व तत्सम तांत्रिक अडचणी येत असल्याचा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार शेतकरी कोणत्याही तांत्रिक बाबीमुळे विमा भरण्यापासून वंचित राहू नये, यादृष्टीने केंद्रसरकारकडे विनंती करून आता पीकविमा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी ३ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी शेतकऱ्यांनी या वाढीव वेळेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही कृषीमंत्री मुंडे यांनी केले आहे.

