सत्तेच्या स्वार्थासाठी एकत्र आलेल्या महाविकास आघाडीत शिवसेनेच्या उबाठा गटाची अवस्था उठबस सेना झाली आहे. सिल्व्हर ओक म्हणाला की उठ आणि काँग्रेस म्हणाला की बस, अशी केविलवाणी अवस्था उद्धव ठाकरेंची झाल्याची टीका शिवसेनेचे मुख्य नेते, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
बुलढाण्यातील महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारासाठी आयोजित पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, विरोधी पक्षांत स्वत:वर प्रेम करणारे स्वार्थी नेते आहेत. त्यांना त्यांचीच पडलेली आहे. ‘मला पाहा आणि फुले वाहा’, यात विरोधक मग्न आहेत. विदर्भात एक म्हण आहे, ‘मले कोन माने मीच माने’, अशी अवस्था विरोधकांची झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनी नकली शिवसेना आणि असली शिवसेनेतील फरक स्पष्ट केला आहे. शेवटी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण कोणाकडे आहे तीच खरी शिवसेना आहे.

लोकशाहीमध्ये ज्याच्यांकडे बहुमत असते तो पक्ष मोठा असतो. ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा केली, पक्षाच्या ध्येयधोरणांवर पाणी सोडले आणि स्वतःच्या स्वार्थ आणि खुर्चीसाठी तडजोड केली अशांना जनता माफ करणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.
महाविकास आघाडी सरकारने बंद पाडलेल्या विकासकामांना महायुती सरकारने चालना दिली. मराठवाडा, विदर्भ या दुष्काळग्रस्त भागातले पाणी त्यांनी बंद केले होते. मोठमोठे प्रकल्प बंद केले होते. राज्यात सत्तांतर होताच सर्व कामांवरील स्थगिती उठवली. त्यामुळे आज समृद्धी महामार्गाने इथल्या शेतकऱ्यांना एका दिवसात शेतमाल घेऊन मुंबईत पोहोचता येते, असे शिंदे यांनी सांगितले.
काँग्रेस पक्षानेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा निवडणुकीत पराभव केला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी काँग्रेसला जळक्या घराची उपमा देऊन जनतेला या पक्षापासून सावध राहण्याचा सल्ला दिला होता. बाबासाहेबांनी तयार केलेली राज्यघटना कोणी बदलणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.