मराठा आरक्षणाचे खरे मारकरी कोण आहेत, यावर चर्चा व्हायला हवी ही, अशी अपेक्षा व्यक्त करून आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे सरकारवर मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकवण्यात अपयश आल्याचा आरोप केला. सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याला आमचा विरोध आहे, हे स्पष्ट करून मराठा हा शब्द मिटवून टाकायचा हा प्रयत्न आहे का, असा सवालही त्यांनी केला.
मुखपत्रातून मराठा मोर्चांचा उल्लेख मुका मोर्चा असा करणाऱ्या लोकांचे सरकार मराठा आरक्षण देतील का, असा सवालही राणे यांनी केला. माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना व्हिलन करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे सांगून राणे म्हणाले की, मनोज जरांगे यांचा आज उदोउदो करणारे जरांगे अडचणीत होते, तेव्हा कुठे होते. त्यांना वकील आम्ही दिला होता, हे सांगून राणे म्हणाले की, देवेन्द्रजींनी आरक्षण टिकून दाखवले. त्याप्रकारे प्रामाणिक प्रयत्न या लोकांनी केले असते तर हिंसक प्रकारही झाले नसते आणि मराठा युवकांना जीवही गमवावे लागले नसते.

एक व्यक्ती आरक्षणासाठी उपोषणाला बसतो, तो स्वतः बोलतोय की त्याच्या हातात कोणी स्क्रीप्ट दिलीय, हा प्रश्न उपस्थित करून राणे म्हणाले की, एकाच व्यक्तीवर टीका केली जातेय. एका बाजूला नेत्यांना गावबंदी आणि दुसरीकडे संघर्षयात्रा, हे कसे होते, हा सवाल करून राणे म्हणाले की, ही मँचफिक्सिंग आहे का… याचे उत्तर मिळाले पाहिजे.
भुजबळसाहेब, एक व्यक्ती म्हणजे मराठा समाज नाही. बहुजन समाज म्हणून सर्व जातींचे लोक सलोख्याने राहतो. त्यामुळे उगाच वातावरण बिघडता कामा नये आणि आपण एकत्र व्यासपीठ तयार करू. इतर कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण हवे, हे सांगू. ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण दिले जावे, हेच आमचे मत आहे, असेही ते म्हणाले.
पडघा गावात गावाचे नाव अल शान केले आणि इस्लामीकरण सुरू झाले, असे सांगून राणे म्हणाले की, आपण जातीजातींमध्ये भांडतोय आणि तिकडे अतिरेकी दहशतवादी कारवाया करताहेत, याकडे लक्ष द्यायला हवे, अशी मागणीही राणे यांनी केली.